एक तत्त्व नाम दृढ धरी मना। हरिसी करुणा येईल तुझी।। असे संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगात म्हणतात. हे मना तू केवळ एकाच तत्त्वावर विश्वास ठेव, ते म्हणजे ‘हरि नाम.’ तू मनोभावे नाम घेतलेस की, त्या विठ्ठलाला तुझी करुणा आल्याशिवाय राहणार नाही. एकतत्त्व असणारे नाम सतत दृढतेने घेतले तर हरिला त्या जीवाची करुणा येते. ते नाम घेणे हे सहज सोपे आहे, परंतु जिव्हेवर सतत ते घेतले पाहिजे. नामाशिवाय अन्य दुसरे तत्त्व नाही, दुसरा पंथ दुसरे तत्त्व नाहीच. मी सतत मौनात जपमाळ, अंतरात श्रीहरिचे नाम जपत असतो असे माऊली सांगतात. नामस्मरणाची ताकद काय आहे हे यातून ज्ञानदेव सांगतात. ही ताकद आपल्याला पंढरीच्या वारीत दिसते. शतकानुशतके चाललेली ही वारी या ताकदीवर चालते. त्या ताकदीनेच वारीत चालण्याचा शीण कुठल्याकुठे निघून जातो. कारण ती एक प्रकारची समाधी अवस्थाच प्राप्त झालेली असते.
ज्ञानेश्वर म्हणतात की, समाधी हरिची सम सुखेंवीण। न साधेल जाण द्वैतबुद्धि॥ १॥ बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे। एका केशवराजे सकळ सिद्धि॥ २॥ ऋद्धि सिद्धि निधि अवघीच उपाधी। जंव त्या परमानंदी मन नाही॥ ३॥ ज्ञानदेवी रम्य रमले समाधान। हरिचे चिंतन सर्वकाळ॥ ४॥ यातून संत ज्ञानदेव म्हणतात की, सृष्टीतील लहान मोठे वगैरे भेदरूपी वैषम्य विचाराने काढून शिवापासून तृणापर्यंत एकरूपाने वास्तव्य करणाºया हरिचे समबुद्धीने ग्रहण केले असता समाधी (आत्मस्थिती) प्राप्त होते. जर बुद्धीतील सजातियादी भेद गेले नसतील तर भेदात्मक बुद्धीस हरिची समाधी कधीही प्राप्त होणार नाही. समाधीत समाधान आहे. केशवास (आत्म्यास) यथार्थत्वे करून जाणणे हेच बुद्धीचे ऐश्वर्य आहे, यावाचून दुसरे नाही. त्यानेच जगातील सर्व सिद्धीचा लाभ होतो. ऋद्धी म्हणजे ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे अणिमा गरिमा इत्यादी अष्ट प्रकारच्या सिद्धी, यांचा निधी म्हणजे ठेवा प्राप्त झाला, तरी जोपर्यंत परमानंदरूप हरिच्या ठिकाणी मन नाही, तोपर्यंत त्या पीडादायकच आहेत. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, प्राणिमात्राला रमविणारे असे समाधान माझे ठिकाणी सुस्थिर झाले असून हरिचे चिंतन सर्वकाळ चालले आहे. हे एकतत्त्व आहे. ते दृढ करण्याचे आवाहन ज्ञानदेव करतात.
संत ज्ञानेश्वर पुढे म्हणतात की, नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी। कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी॥ १॥ रामकृष्णी वाचा अनंतराशी तप। पापाचे कळप पळती पुढे॥ २॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा। म्हणती जे वाचा तया मोक्ष॥ ३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम। पाविजे उत्तम निज स्थान ॥ ४॥ हा फार महत्त्वाचा संदेश ज्ञानदेव देतात. ते येथे म्हणतात की, खºया अपरिमित हरिचा जप निरंतर करणाºयाकडे कळीकाळ दृष्टीने देखील पाहत नाही. वाचेने निरंतर रामकृष्णाचा जप केल्याने तपाच्या अनंत राशी घडतात व त्या योगाने पापाचे समुदायचे समुदाय पुढे पळून जातात. हरि, हरि, हरि हा शिवाचा नित्य जप करण्याचा मंत्र आहे. या मंत्राचे जे कोणी वाचेने ग्रहण करतील त्यास मोक्षाची प्राप्ती होईल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, मी निरंतर नारायणनामाची आवृत्ती करतो, त्यायोगे देहत्रयातीत अतिउत्तम आत्मस्वरूप स्थानाची मला प्राप्ती झाली आहे. अशा तºहेने नामस्मरणाची ताकद येथे ज्ञानेश्वर दाखवून देतात. म्हणून ते म्हणतात एकतत्त्व नाम. हे तत्त्व लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
प्रफुल्ल फडके/संतकृपा