Friday, August 28, 2026

आकाशाला गवसणी घालण्यास सज्ज नवी पिढी


जेन-झी सध्या चर्चेत आहे. अर्थात जंतरमंतरवर असलेली जेन-झी नव्हती, ती अंदाधुंद विचारांची माणसे होती. विरोधकांचा तो बाजार होता. आम्हीच जेन-झी आहोत असे या लोकांनी भासवून जेन-झीला वेगळे रूप देण्याचे प्रकार केला, पण खरी जेन-झी ही वेगळी आहे. कोणीतरी जेन-झीच्या कार्यशैलीसाठी मोबाइल फोनला दोष दिला, तर कोणीतरी बदलत्या मूल्यांबद्दल चिंता व्यक्त केली. एका व्यक्तीने तर हे तरुण लोक... असा उल्लेख केला. तो या जंतरमंतरचा परिणाम होता. पण यामधील हे हा शब्द मनाला अस्वस्थ करत आहे. हा शब्द आपल्याला आपल्या मुलांपासून दूर का करतो? जनरेशन गॅप पिढ्यान्पिढ्या, शतकानुशतके असते. पण जंतरमंतरच्या आंदोलनजीवींनी देशातील वातावरण बिघडवून टाकले आणि जेन-झीला बदनाम केले हे नाकारता येणार नाही.


जेव्हा देशाचे पंतप्रधान तरुणांना ‘माझ्या तरुण मित्रांनो’ असे संबोधतात, तेव्हा त्यामागे एक गहन दृष्टिकोन असतो. तो दृष्टिकोन तरुणांना आपल्यासमोर खुर्चीत बसवण्याचा नसून, त्यांना आपल्या शेजारी बसवण्याचा असतो. तो तरुणांना संवादात समान भागीदार म्हणून वागणूक देण्याचा असतो. तरुणांबद्दलची आपली सर्वात मोठी द्विधावस्था म्हणजे, आपण त्यांना ज्या कालबाह्य आणि संकुचित दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो तो आहे. प्रत्येक नवीन पिढी आपल्या काळाला कठीण प्रश्न विचारत आली आहे. ते विचारतात, हे असे का आहे?

जेव्हा महान स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांनी राष्ट्राच्या स्वातंत्र्याला आपले सर्वोच्च आणि एकमेव ध्येय मानले, तेव्हा तेही तरुण होते, पण त्यांच्या मनात तीच ज्योत तेवत होती जी आजच्या तरुणांमध्ये आहे. व्यवस्था जशी आहे तशी स्वीकारण्यास तीव्र नकार देणे हे स्वाभाविक आहे. तरुणांना जाणून घ्यायचे आहे की, नियम जसे आहेत तसे का आहेत. हेच प्रश्न जुन्या पिढीलाही टोचताना दिसतात. जेव्हा आपण तरुण होतो, तेव्हा आपण विचारलेले प्रश्न आपल्या वडीलधाºयांना त्रासदायक ठरले असते. आपण या अंतराला केवळ पिढीतील अंतर म्हणतो. जनरेशन गॅप म्हणतो. पण ते कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.


नवीन पिढी मोबाइलच्या पडद्यांमध्ये मग्न असल्याचा आरोप केला जातो, पण या आरोपाचा एक पैलू आपल्यावरच रोखलेला दिसतो. आपली मुले आपल्याला हातात पुस्तक घेऊन पाहतात का? जेवताना स्मार्टफोन आपल्यापासून दूर असतात का? आपण त्यांना कधी गावातील रस्त्यांवर  फिरायला घेऊन गेलो आहोत का? आपल्या आजीच्या आठवणींमध्ये दडलेल्या कौटुंबिक गोष्टी आपण त्यांना सांगितल्या आहेत का? आपण स्वत:ला एक कठीण प्रश्न विचारला पाहिजे की, आपण त्यांच्यासाठी मोबाइल फोनच्या पलीकडचे जग किती सुंदर आणि आकर्षक बनवले आहे? त्यामुळे मुलांकडे नुसती तक्रार करणे खूप सोपे आहे, पण त्यांच्यासमोर एक खरे आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणून उभे राहणे अत्यंत कठीण आहे. कौटुंबिक संवाद महत्त्वाचा आहे.

अर्थात त्यांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे, त्यांची अभिव्यक्तीची भाषा वेगळी आहे आणि त्यांची उत्सुकताही वेगळी आहे. ते त्यामागील तर्क विचारतील आणि विचारतील का? आणि आपण त्या ‘का’ या शब्दाला घाबरता कामा नये. आपण त्यांना परंपरांमागील गहन तत्त्वज्ञान समजावून सांगितले पाहिजे, त्यांना धर्माच्या मूळ तत्त्वाची ओळख करून दिली पाहिजे आणि केवळ पुस्तकी ज्ञानाने नव्हे, तर कृतीतून आपली संस्कृती दाखवली पाहिजे.


झेन-झीला केवळ रील्स बनवण्यापुरते आणि पाहण्यापुरते मर्यादित ठेवणे अन्यायकारक ठरेल. हीच तरुण पिढी आजही सीमांवर दक्षतेने उभी आहे. हेच तरुण बुद्धिबळाच्या पटावर आपल्या बौद्धिक पराक्रमाने जगाला चकित करत आहेत. डी. गुकेशसारखे तरुण भारताच्या नव्या प्रतिभेची एक गौरवशाली ओळख निर्माण करत आहेत, ही एक अशी कामगिरी आहे ज्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. हे तरुण तंत्रज्ञान, विज्ञान आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये सातत्याने नवनवीन मार्ग खुले करत आहेत. सगळेच जंतरमंतरवर गेलेले भरकटलेले नाहीत. जंतरमंतरवर होते ते या जेन-झी पैकी एक टक्का पण नव्हते. त्यामुळे धान्यात जसे खडे असतात तसे हे भरकटलेले जंतरमंतरवर गेले. पण आपल्याला चांगल्या जेन-झीकडे लक्ष दिले पाहिजे.

नवीन पिढी केवळ स्वत:चाच विचार करत नाही, तर त्यांना इतर मानवांच्या वेदना आणि दु:खही खोलवर समजून घ्यायचे आहे. पर्यावरण संरक्षणाची गंभीर चिंता असो, मुक्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे हक्क असो, तरुणांमधील मानसिक आरोग्याच्या समस्या असो, समाजात समान संधींची मागणी असो किंवा दुर्बळ आणि असहाय्यांच्या पाठीशी उभे राहणे असो, आजचे तरुण या सर्व संवेदनशील विषयांवर अधिक सहजतेने आणि ठामपणे आपले मत मांडतात.


आधीच्या काळात गोष्टी कशा होत्या, ही जुनीच कहाणी त्यांना सतत सांगण्याची आपल्याला गरज नाही. आपले नाते उपदेशक आणि श्रोता असे नसावे, तर ते परस्पर संवादाचे असावे. म्हणूनच, हो, ते जेन-झी आहेत, पण ते ‘हे ​​लोक’ नाहीत. ती आपलीच मुले आहेत. साहजिकच, ते जे काही म्हणतील ते नेहमीच बरोबर असेल असे नाही, जसे आमच्या काळात आम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट बरोबर नव्हती. आमच्याप्रमाणेच तेही त्यांच्या आयुष्यात अनेक चुका करतील.

पण आपण हे समजून घेतले पाहिजे की, या देशाचा पुढचा प्रवास याच कणखर खांद्यांवर अवलंबून असेल. त्यांची परीक्षा घेण्याऐवजी, आपल्या पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहा. मुलांशी संवाद वाढवा. त्यांचे काळजीपूर्वक ऐका, त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण भविष्याला भूतकाळाच्या जुन्या साच्यात कधीही घडवता येत नाही. नेहमी लक्षात ठेवा की, भारताची पुढची कहाणी इतर कोणीही नाही, तर हेच हात लिहिणार आहेत.

दशक पहिला : स्तवननाम १ समास चौथा : सद्गुरुस्तवन


गुरू-शिष्य संवादाचा असलेल्या दासबोधातील पहिल्या दशकातील चौथ्या समासात सद्गुरूचे स्तवन समर्थांनी केलेले आहे. या समासात समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, श्रीसद्गुरू हे वर्णनातीत आहेत. आता सदगुरूंचे स्तवन करायचे. पण श्रीसमर्थ म्हणतात की, सद्गुरूच्या स्वरूपाला माया स्पर्श करू शकत नाही. आपले सगळे ज्ञान मायेच्या कक्षेतील असते. त्यामुळे सद्गुरूस्वरूप आपल्यासारख्या अज्ञानी माणसाला कळणे शक्य नसते. म्हणून सद्गुरूचे वर्णन करता येत नाही. श्रुती ही आत्मविद्येची आई आहे. परमात्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तिने प्रयत्न केला. पण अखेर ते स्वरूप कळत नाही; ते असे नव्हे, असे नव्हे याप्रमाणे बोलून नाईलाजाने गप्प बसली. तेथे आपल्यासारख्या मूर्खाची बुद्धी त्या स्वरूपाचे आकलन कसे करील. असे म्हणून सद्गुरूची अमर्याद व्याप्ती येथे ते दाखवतात.


समर्थ म्हणतात की, सद्गुरूस्वरूपाचा विचार मला कळत नाही म्हणून मी त्याला दुरूनच नमस्कार करतो. श्री समर्थ प्रार्थना करतात की, हे गुरुदेवा, मायेच्या कक्षेतून मला पलीकडे न्या. मुख्य परमात्मा आकलन होत नाही म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते. त्याचप्रमाणे सद्गुरूस्वरूप अनाकलनीय आहे तरी मायेची मदत घेऊन त्या स्वरूपाचा महिमा मी वर्णन करीन. जशी ज्याची भावना तशी देवाची कल्पना करून माणूस त्याचे चिंतन करतो. या नियमास अनुसरून मी आता सद्गुरूची वंदना करतो.

श्री समर्थांनी केलेले सद्गुरूचे स्तवन अतिशय सुंदर असे आहे. विश्वाला भरून उरणारा, विश्वाचे मूळ, सर्वोत्तम पुरुष. मोक्षाची विजयपताका आणि दीनांचा मित्र असा जो सद्गुरू, त्याचा जयजयकार असो. येथे ते सद्गुरूंना सूर्यप्रकाशाची उपमा देतात. सूर्याच्या प्रकाशाने अंधार पळून जातो. त्याचप्रमाणे सद्गुरूचा अभयहस्त ज्याच्या मस्तकी राहतो, त्याची कृपा ज्याच्यावर होते, त्याच्यावर असलेला या अनावर मायेचा अंमल नाहीसा होतो. याशिवाय उपमेतील उणेपणा ते दाखवून देतात. सूर्यप्रकाश असतो तर तोपर्यंत अंधार नसतो हे खरे. पण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोपला की, रात्र होते आणि पुन: अंधार ब्रह्मांडांत भरतो. सद्गुरू स्वामीराजा तसा नाही. अज्ञानाला तो मुळासकट उपटून टाकतो. त्याचा ठावठिकाणा साफ नाहीसा करतो. त्यामुळे जीव जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटतो.


या समासात समर्थ शिष्याला सोने आणि सरिता यांची उपमा देतात. सोने खराब होऊन त्याचे लोखंड कधीच होत नाही. तसे सद्गुरूच्या दासाचे मन इतके शुद्ध असते की, त्यात संशय कधीच उत्पन्न होत नाही किंवा एखादी लहान नदी गंगेला मिळते आणि मिळाल्यानंतर ती गंगाच बनते. मग तिला गंगेतून वेगळी काढायचे म्हटले तरी ती कधीच वेगळी होणार नाही. गंगेला मिळण्यापूर्वी त्या नदीला लोक एक लहान ओढा समजतात. त्याचप्रमाणे सद्गुरूची भेट व संगती होण्यापूर्वी शिष्य सामान्य माणूस असतो. परंतु सद्गुरूची गाठ फसली की, तो लगेच तद्रूप होतो. त्याला सद्गुरूचा अधिकार येतो.

उपमा द्यायची आणि त्यातील उणेपणाही दाखवून द्यायचा हे समर्थ साहित्यातील फार मोठे लक्षण आहे. येथे समर्थ परिसाची उपमा व तिचा उणेपणा दाखवतात. परीस लोखंडाचे सोने करतो, पण ते सोने दुस‍ºया लोखंडाला लावले तर त्याचे काही सोने होत नाही. म्हणजे परीस लोखंडाला परीसपणा देत नाही. पण सद्गुरूला शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून तारतो. याचा अर्थ असा की, शिष्याला गुरूपद प्राप्त होते.


येथे सागर व त्याचा उणेपणापण समर्थ सांगतात. सद्गुरू सागरासारखा आहे आहे म्हणावे तर ते योग्य नाही. सागराचे पाणी खारट असते. म्हणून ही उपमा उणी पडते. सद्गुरूंना काय उपमा द्यायची? समर्थ म्हणतात की, सद्गुरू गगनासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही. आकाश केवळ शून्य दिसते. पण सद्गुरू शून्यापलीकडील स्वरूप आहे. म्हणून ही उपमा उणी पडते. सद्गुरू पृथ्वीसारखा निश्चल, निर्भय आणि गंभीर आहे म्हणावे तर ते बरोबर नाही. कल्पांताच्या वेळी पृथ्वी विरून जाईल, पण सद्गुरू अभंग राहील.

समर्थ इथेच थांबत नाहीत. ते म्हणतात की, सद्गुरू सूर्यासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही सूर्याचा प्रकाश तो किती? शास्त्रांमध्ये सूर्यप्रकाशाच्या मर्यादा सांगितल्या आहेत. पण सद्गुरूला मात्र मर्यादा नाहीत. सद्गुरूच्या ज्ञानाच्या प्रकाशाला कुठेच मर्यादा नाहीत. म्हणून सूर्य उपमेला उणा पडतो. आता शेषाची उपमा घ्यावी तर तो डोक्यावर ओझे वाहतो. म्हणून ती उपमा उणी पडते.


सद्गुरू पाण्यासारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही पाणी चंचळ असते. आणि कालांतराने सगळे आटून जाते. परंतु सद्गुरूस्वरूप मोठे निश्चल असून, ते कधीच नाश पावत नाही. सद्गुरूंपुढे अमृतही उणे पडते. सद्गुरू अमृतासारखा आहे म्हणावे तर ते बरोबर नाही. स्वर्गांत राहून नित्य अमृत पिणारे देव अखेर मृत्यूच्या मार्गाने जातात. पण सद्गुरू ज्याच्यावर कृपा करतात तो ख‍ºया अर्थाने अमर बनतो.

सद्गुरू कल्पतरूपेक्षाही मोठा आहे हे सांगताना कल्पतरू व त्याचा उणेपणा समर्थ या समासात सांगतात. सद्गुरू कल्पतरूसारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. आपण जेवढी कल्पना करू तेवढेच कल्पतरू आपल्याला देतो. परंतु सर्व मानवी कल्पनाच्या पलीकडे असणाºया सद्गुरूपुढे कल्पतरूची किंमत राहत नाही. किंबहुना कल्पना ओलांडूनच सद्गुरूपाशी जावे लागते. म्हणून ही उपमा उणी पडते.


सद्गुरू चिंतामणीसारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. ज्याच्या मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्त्व वाटते. सद्गुरू शिष्याच्या मनात कसली चिंताच उरू देत नाही. ज्याला काही इच्छाच शिल्लक उरली नाही तो कामधेनूची धार काढायला जाणार नाही. म्हणून ही उपमा उणी पडते.

त्यानंतर समर्थ श्रीमंती व तिचा उणेपणा दाखवून देतात. सद्गुरूला श्रीमंत म्हणावे तर ते योग्य नाही. जगातील सर्व संपत्ती नाशवंत असते. पण सद्गुरूच्या द्वाराशी अविनाशी मोक्षलक्ष्मी तिष्ठत असते. स्वर्गलोक, इंद्रपद आणि त्याचे ऐश्वर्य ही सगळी कालांतरानी नाश पावतात. पण सद्गुरूच्या कृपेची प्राप्ती झाली की, ती कोणत्याही काली नाश पावत नाही. म्हणून ही उपमा उणी पडते.


सद्गुरूचे व्यापक स्वरूप समर्थांनी या स्तवनात फारच सुंदरपणे वर्णन केलेले आहे. विनाशी विश्व उपमेस उणे आहे हे पण समर्थ सांगतात. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे सगळे नाश पावतात. एक सद्गुरूचे स्थानच तेवढे सदैव अविनाशपणे टिकते. सगळी सृष्टी नाशवंत असल्यामुळे दृश्य विश्वामधील कोणत्याही वस्तूची उपमा शाश्वत स्वरूपाच्या सद्गुरूला देता येत नाही. पंचमहाभूतांची उठाठेव सद्गुरूस्वरूपात नाही.

त्यानंतर समर्थ म्हणतात की, वर्णन करता येत नाही हेच सद्गुरूचे वर्णन आहे. या कारणास्तव सद्गुरूचे वर्णन करता येत नाही. त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न करून ते करता न येणे हेच त्याचे वर्णन समजावे. सद्गुरूरूपाचा अनुभव ही आतील अवस्था आहे. जे स्वत: अंतर्यामी स्थिर झाले आहेत. त्यांनाच त्या अवस्थेच्या खुणा कळतात. म्हणून या समासांत सद्गुरूबद्दल जे मी सांगितले ते फक्त अंतर्निष्ठांनाच कळेल, असे सुंदर सद्गुरूंचे स्तवन या चौथ्या समासात समर्थ करतात.


प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा


Thursday, August 27, 2026

राहुल गांधी सत्य नाकारत आहेत


अलीकडेच राहुल गांधी भारताच्या ७० कोटी महिलांबद्दल बोलले, तेव्हा ते मुस्लीम महिलांना विसरले. मुस्लीम समाजातील धार्मिक नेते त्यांच्यावर इस्लामी वैयक्तिक कायदा लागू करतात. राहुल गांधी हिंदू स्त्रियांना कनिष्ठ मानत होते आणि त्याचे कारण त्यांनी मनुस्मृतीला दिले, जरी मनुस्मृतीचा भारतीय संविधानाच्या किंवा कायद्याच्या एकाही कलमावर प्रभाव नसला तरी. तथापि, त्याच मनुस्मृतीतून प्रेरणा घेऊन स्वामी दयानंद आणि विवेकानंद यांच्यासारख्या अनेक महान पुरुषांनी ऐतिहासिक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. हे त्यांच्या लिखाणात, व्याख्यानांमध्ये आणि सामाजिक वारशात स्पष्ट दिसते. असे निश्चितपणे दिसते की, राहुल गांधींनी मनुस्मृती वाचलेली नाही, जी स्त्रियांचा आदर करणे ही एक दैवी शिकवण असल्याचे मानते. त्यांच्या अर्धवट ज्ञानी डाव्या सल्लागारांनी त्यांची दिशाभूल केली, ज्यामुळे ते हवेतच बोलत राहिले. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारा एक नेता अभ्यास न करता कसे काय बोलू शकतो? असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडल्याशिवाय राहणार नाही.


हिंदू स्त्रियांची परिस्थिती त्यांनी आता किंवा पूर्वी जशी समजली होती तशी कधीच नव्हती. राहुल गांधी यांना खºया पीडितांची आणि त्यांना कायम ठेवणाºया विद्यमान कायद्यांची जाणीव नाही असे दिसते. भारतात, १९७८ मधील शाह बानोपासून ते २०१६ मधील सायरा बानोपर्यंत, शोषित मुस्लीम महिलांना त्यांच्यावर लादलेल्या जाचक धार्मिक प्रथांपासून दिलासा मिळवण्यासाठी न्यायालयाकडे दाद मागावी लागली. या प्रथांनुसार, मुस्लीम पुरुष आपल्या इच्छेनुसार तत्काळ घटस्फोट देतात आणि आपल्या घटस्फोटित पत्नींना त्यांच्या नशिबावर सोडून देतात. याचा आधार इस्लामी कायदा आहे. प्रत्येक धर्मगुरू त्याचे समर्थन करण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांच्या मूळ ग्रंथांचा हवाला देतो. राहुल गांधी कधीकधी अशा ग्रंथाचा हवाला देतात, जो स्त्रियांना पुरुषांची मालमत्ता आणि उपभोगाची वस्तू यापेक्षा अधिक काही मानत नाही.

शाह बानोपासून ते आजपर्यंत, चर्चा केलेल्या सर्व प्रकरणांमध्ये एक समान धागा आहे. मुस्लीम स्त्रियांमध्ये स्व-इच्छाशक्ती किंवा आत्मसन्मानाचा अभाव होता. प्रत्येक स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा उलेमांकडून मालमत्तेच्या तुकड्यासारखी वागणूक दिली जात होती. इस्लामी विवाहाच्या केंद्रस्थानी पुरुष आहे. शारीरिक सुख, उपभोग आणि उम्माच्या वाढीव्यतिरिक्त त्यात दुसरा कोणताही अर्थ किंवा आध्यात्मिक घटक नाही. मुस्लीम पुरुषांना मिळणाºया अनियंत्रित सत्तेचा स्रोत कुराण, हदीस आणि त्यावर आधारित शरिया कायदा आहे. त्यामुळे राहुल मुस्लीम स्त्रियांच्या दुर्दशेबद्दल अनभिज्ञ आहेत हे आश्चर्यकारक आहे.


ते हिंदू धर्मग्रंथांमधील असे शेर वाचत आहेत ज्यांचा आधुनिक जीवनाशी काहीही संबंध नाही. लाखो मुस्लिमांचे जीवन-मृत्यू, शिक्षण, संस्कृती आणि वैयक्तिक कायदे ठरवणाºया ग्रंथावर राहुल मौन बाळगतात, ज्या वस्तुस्थितीबद्दल खुद्द मुस्लीम महिलांनी वारंवार तक्रार केली आहे आणि जी लेखी दस्तऐवजांमध्ये सार्वजनिकरीत्या उपलब्ध आहे. राहुल त्याचे परीक्षणही करू शकतात. तेव्हा त्यांना दिसेल की, कोणत्याही मुस्लीम देशात महिलांचा दर्जा हिंदू महिलांइतका सन्मानित किंवा प्रगत नाही. हे मानवी मूल्यांमुळे आणि त्याला अनुरूप असलेल्या धर्मनिरपेक्ष संविधानामुळे आहे, जे पुरुष आणि महिलांना कोणत्याही भेदभावाशिवाय समान हक्कांची हमी देते.

हिंदू आणि मुस्लीम महिलांच्या कायदेशीर आणि सामाजिक परिस्थितीची तुलना करूनही राहुल गांधींना सत्य दिसेल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही याचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, १९३९ पर्यंत, जेव्हा भारतातील एखादी विवाहित मुस्लीम महिला इस्लाम धर्माचा त्याग करत असे, तेव्हा तिचा विवाह आपोआप रद्द होत असे आणि तिला तिच्या नवीन धर्मातील कोणत्याही पुरुषाशी लग्न करण्याचे स्वातंत्र्य होते. साठ वर्षे, भारतातील सर्व न्यायालयांमध्ये या कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जात होते. त्या वेळी मुस्लीम महिलेने इस्लाम धर्म स्वीकारणे आणि हिंदू धर्मात परत जाणे स्वीकारार्ह होते. तथापि, इस्लाम शक्य तितका लादण्याच्या दबावाखाली मौलानांनी १९३७ मध्ये शरिया कायदा लागू केला आणि १९३९ मध्ये मुस्लीम विवाह कायदा रद्द केला. हा शरिया कायदा भारतात आजही लागू आहे. त्यामुळे मुस्लीम महिलांना लागू होणाºया तिहेरी तलाक, एका पुरुषाला एकाच वेळी चार बायका ठेवण्याची परवानगी आणि हलाला यांसारख्या अन्यायकारक प्रथांचा उगम त्यांच्याच ग्रंथात आहे. मुस्लीम महिला स्वत:च याविरुद्ध लढत आहेत.


इस्लामिक जग पूर्णपणे पुरुषप्रधान आहे, ज्यात महिलांचा दर्जा स्पष्टपणे खूप कमी आहे. राहुल गांधींनी याबद्दल बोलायला नको होते का? त्यांनी त्या ग्रंथाचा संदर्भ द्यायला हवा होता, जो महिलांना पुरुषांची मालमत्ता म्हणून वर्णन करतो. पुण्यात येऊन काय मुक्ताफळे उधळली राहुल गांधींनी? पत्नींव्यतिरिक्त, दासी देखील उपभोगाच्या अतिरिक्त वस्तू आहेत. हदीसमध्येही अशाच आज्ञांचा पुनरुच्चार केला आहे. जणू काही महिला केवळ मालमत्ता आहेत, ज्यांना इच्छेनुसार आणले, वाटले आणि टाकून दिले जाऊ शकते. एका हदीसनुसार, जी स्त्री स्वत:च्या इच्छेने लग्न करते तिला अनैतिक मानले जाते. दुसºया एका हदीसनुसार, पालकाशिवाय स्त्रीचे लग्न बेकायदेशीर आणि अवैध आहे. आजही मुस्लिमांसाठी अशा असंख्य प्रथा कायद्याने पाळल्या जातात. जगभरातील मौलानांचा यावर विश्वास आहे आणि ते आपल्या परीने त्याची अंमलबजावणी करतात. अफगाणिस्तान आणि इराण ही याची सध्याची उदाहरणे आहेत. मुस्लीम महिलांची दुर्दशा केवळ मनमानी घटस्फोटापुरती मर्यादित नाही. हलाला, बहुपत्नीत्व, मुताह, स्त्रीसुंता इत्यादी सर्व गोष्टी सक्तीच्या आणि एकतर्फी आहेत. मुस्लीम महिला सतत दहशतीच्या छायेखाली जगतात, कारण त्यांच्या समाजात मनमानी घटस्फोट ही तक्रारीची बाब नाही. याकडे राहुल गांधी का डोळेझाक करतात? हिंदू महिलांना अक्कल शिकवायची गरज नाही. त्या सुजाण आहेत, हे राहुल गांधींनी लक्षात घेतले पाहिजे.

भारतासारख्या उदारमतवादी देशात, संविधानात स्पष्ट सूचना असूनही, उलेमांच्या विरोधामुळे अद्याप समान नागरी संहिता लागू करण्यात आलेली नाही. तस्लिमा नसरीन यांनी समान नागरी संहितेसाठी वारंवार आग्रह धरला आहे. त्या नेमका हाच प्रश्न उपस्थित करतात का? किंवा एखाद्या पुस्तकापेक्षा माणसाची सद्सद्विवेकबुद्धी अधिक श्रेष्ठ आहे का? तस्लिमा, तेहमीना दुर्रानी, ​​वफा सुलतान, यास्मिन मोहम्मद, अय्यान हिर्सी अली आणि इतर मुस्लीम विदुषींचा आवाज ऐकण्यात राहुल गांधी अपयशी ठरले का? आज, जेव्हा मुस्लीम महिला स्वत: मानवी न्याय आणि समान हक्कांसाठी उभ्या आहेत, तेव्हा राहुल गांधींनी त्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला पाहिजे. त्याऐवजी ते हिंदू महिलांची कीव करत आहेत, जे एक अनावश्यक आणि अवेळी शोकगीत म्हणण्यासारखे आहे. जिथे खरे दु:ख आहे अशा घरांमध्ये जाण्याऐवजी ते आनंदी घरांमध्ये जाऊन आक्रोश करत आहेत. याचा काँग्रेस आणि राहुल गांधींना कोणताही फायदा होणार नाही.

दशक १ समास ३ : शारदा स्तवन


मनाच्या श्लोकात जसे गणाधीश जो ईश सर्वागुणांचा या पहिल्याच श्लोकात गणेशानंतर नमू शारदा मूळ चत्वारवाचा असे म्हणून शारदेचे स्मरण केले आहे. त्याचप्रमाणे दासबोधात दुसºया समासात गणेशाचे स्तवन केल्यानंतर तिसºया समासात शारदेचे म्हणजे सरस्वतीचे स्तवन केलेले आहे.


या समासात त्यांनी शारदेचे मूळ स्वरूप सांगितले आहे. तिचे वर्णन करताना रामदास स्वामी म्हणतात की, वेदांची आई, ब्रह्मदेवाची कन्या, नादाचे जन्मस्थान, वाणीची स्वामिनी आणि महामाया अशी जी श्रीशारदा तिला मी नमस्कार करतो. हे सरस्वतीचे पूर्ण स्वरूप आपल्याला या वर्णनात दासबोधात दिसून येते.

त्यानंतर समर्थ रामदास स्वामी शारदा काय करते याकडे लक्ष वेधतात. ते सांगतात की, तिच्यामुळे सूक्ष्म रूपाने शब्द उत्पन्न होतात, वैखरीने अपार शब्द बोलले जातात आणि तीच शब्दांचे अंतरंग मंजे स्पष्ट करून दाखविते. त्याचप्रमाणे या समासात समर्थ जीवनात शारदा कुठे कुठे आढळते, याबाबत भाष्य करतात. ते म्हणतात की, योग्यांच्या समाधीमध्ये व धाडसी पुरुषांच्या निर्भयतेमध्ये ती आढळते. विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी ती नाहीशा करते. आदिपुरुष जो ईश्वर त्याची ती भार्या आहे. ईश्चराशी अत्यंत निकट असता भक्ताच्या अनुभवास येणारी तुर्यावस्था ती हीच आहे. तिच्या जोरावरच साधु पुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात. थोर पुरुषांच्या शांतीमध्ये आणि ज्ञानी पुरुषांच्या विरक्तीमध्ये शारदाच प्रगत होते. ईश्वराची स्वत:ची ही शक्ती अत्यंत वासनारहित अवस्थेचे सौंदर्य समजतात.


यानंतर समर्थ या समासात शारदेचे सामर्थ्य समजावून सांगतात. शारदा अनंत विश्वे निर्माण करते आणि गंमतीने खेळ खेळावा म्हणून त्यांना मोडून टाकते. पण आपण मात्र ईश्वराच्या स्वरूपांत लीन होऊन लपून बसते. इंद्रियांनी पाहू लागले तर ती दिसते, पण विचाराने तिचा शोध घेऊ लागले तर ती आढळत नाही. म्हणून ब्रह्मादिकांना तिचा अंत लागत नाही. तिचे खरे स्वरूप आकलन होत नाही.

समर्थ सांगतात की, शारदेचे विविध रंगी रूप आहे. विश्वरूपी नाटकांतील दृश्य घटकांना त्यांच्या अंतर्यामी राहून शारदा आपल्या शक्तीने नाचविते. जाणीवेमध्ये उत्पन्न होणारी अत्यंत निर्मळ स्फूर्ती म्हणजे साक्षात तीच आहे. ज्ञानांमध्ये वास करणारे सामर्थ्य तिचेच रूप असून, तिच्या कृपेनेच परमानंदाचा विलास भोगता येतो.


शारदेचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की, विश्वातील सौंदर्याची ती सुंदर स्वामिनी शोभते, परब्रह्मरूप सूर्याशी त्याच्या तेजाप्रमाणे ती अगदी एकरूप असते. दृश्य विश्वाचा हा पसारा शब्दांच्या सहय्याने ती नाहीसा करते. शारदा म्हणजे मोक्षाचे वैभव व मंगलांत मंगल अशी अमृतरूपी सतरावी जीवनकलाच ती आहे. लावण्यखाणी शारदा जीवाला शांती देणारी सत्वगुणांची लीला आहे. अव्यक्त ईश्वराला ती व्यक्त बनवते, त्याच्या संकल्पांचा विस्तार करणारी इच्छाशक्ती तीच आहे. काळावर स्वामित्व गाजविणारी सद्गुरूकृपा ती हीच आहे. परमार्थाचे साधन करणा‍ºया साधकाला आत्मानात्मविवेकाने शारदा आत्मस्वरुपाची बरोबर कल्पना देते. शब्दांच्या मदतीने म्हणजे श्रवणमनाने ती साधकाला दृश्य संसाराच्या पलीकडे घेऊन जाते. अशा प्रकारे पुष्कळ रूपांनी नटणारी ही शारदा एकच माया आहे. ती स्वयंभू आणि पूर्ण आणि एकरूप असली तरी माणसाच्या अंतर्यामी चार प्रकारे साचलेली आढळते.

समर्थ या समासात इथेच थांबत नाहीत तर हे घडणारे कर्तृत्व सगळे शारदेचे असल्याचे सांगतात. माणसाच्या अंत:करणाला परा, पश्यंती व मध्यमा या तीन वाणींमध्ये जे स्फुरते ते वैखरीने प्रत्यक्ष शब्दांत प्रगट होते. शब्दाने सर्व व्यवहार चालतो. म्हणून जगातील सगळे कर्तृत्व शारदेच्या शक्तीने चालते. शारदा ब्रह्मादिकांची आई आहे. विष्णु शिव तिच्या पोटी जन्मतात. तीन लोक असलेली ही अफाट विश्वरचना एका शारदेचाच विस्तार आहे असे येथे वर्णन करतात.


त्यानंतर साधकाच्या जीवनात शारदेचे स्थान कुठे आहे याची जाणिव समर्थ करून देतात. ते सांगतात की, शारदा परमार्थाचे मूळच आहे, इतकेच नव्हे तर केवळ अत्म्विद्याच आहे. शारदा म्हणजे ईश्वराची निवांत, निर्मळ आणि निश्चळ अवस्था असते. योग्यांना ध्यान लावण्यास मदत करणारी, साधकांना आत्मचिंतनाची कला शिकविणारी आणि सिद्धांच्या अंत:करणात समाधीरूपाने स्थिर होणारी तीच प्रत्यक्ष शारदाच असते.

शारदेचे स्वरूप आकलन झाले की, निर्गुणाची ओळख होते व स्वस्वरूपाचा अनुभव आल्याची खूण पटते. सर्व दृश्य आकारांत ती संपूर्ण भरून राहिलेली आहे असा अनुभव येतो. शास्त्रे, पुराणे, वेद, श्रुती, इत्यादि ग्रंथ सारखे शारदेचेच स्तवन करतात. सगळी माणसेदेखील नाना रूपांनी तिलाच स्तुती अर्पण करतात. यानंतर समर्थ शारदेचे माहात्म्य वर्णन करताना, शारदेमुळे वेदशास्त्रांना मोठेपणा आहे. वास्तविक परमात्मस्वरूप कल्पनेच्या पलीकडे आहे. शब्द तेथे पोहोचूच शकत नाही. त्याला मानवी कल्पनेच्या कक्षेमध्ये आणून ‘परमात्मा’ असे नाव देणारी, उपमेच्या पलीकडे असणा‍ºयाला उपमेच्या प्रांतांत आणणारी ही शारदा आहे. परमात्मास्वरूप ‘मी आहे’ अशी केवळ ज्ञानमय शुद्ध जाणीव होणे हे शारदेचे स्वरूप समजावे. मुळात ती ज्ञानमयच असल्याने सर्व प्रकारच्या विद्या, कला, सिद्धी आणि निश्चित बुद्धीरूप ज्ञान शारदेचाच विलास असतो. त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तांची भक्ती अंतर्मुख होऊन आत्मनिष्ठ राहणा‍ºया ज्ञानी पुरुषांची आत्मस्थिती आणि जीवन्मुक्तांची सायुज्यमुक्ती ती शारदाच आहे.


शारदा म्हणजे जिचा अंत लागत नाही अशी भगवंताची किंवा ईश्वराची माया आहे. तिने मोठ्या कौशल्याने रचलेले विश्वरूप नाटक कोणालाच आकलन होत नाही. स्वत:ला ज्ञानी समजणा‍ºया मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांना ज्ञानाच्या अभिमानाने ती अधिक गुंतवते. डोळ्यांनी जे दिसते, शब्दांनी जे जाणता येते आणि मनाला जे जे कल्पिता येते ते सगळे हिचेच रूप समजावे. भगवंताचे स्तवन असो, भजन असो किंवा त्याची भक्ती असो, शारदेच्या म्हणजेच मायेच्या मदतीशिवाय ते करता येत नाही. माझ्या या वचनाचा खरा अर्थ स्वानुभवी पुरुषांनाच कळेल असे समर्थ येथे सांगतात. म्हणून शेवटी थोरांपेक्षा थोर व ईश्वराचा ईश्वर असणा‍ºया शारदेला तिच्या अंशानेच म्हणजे तादात्म्यानेच मी नमस्कार करतो असे या समासात समर्थ म्हणतात.

प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा



Wednesday, August 26, 2026

इथेनॉलच्या धोरणावर पुनर्विचार केला पाहिजे


केंद्र सरकारने १० वर्षांत प्रथमच साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता साखर परदेशातून अमेरिकन डॉलरच्या दराने आयात केली जाईल. त्याउलट २०२२ पर्यंत युरोपियन युनियन (ईयू) आणि अमेरिकेला (यूएस) निर्यातीचा ठरलेला कोटा पूर्ण झाल्यावर पुढील साखर निर्यातीवर निर्बंध लादण्यात आले, ज्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करणे सोपे झाले आणि साखरेच्या किमती वाढण्यापासून रोखल्या गेल्या. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, घरगुती वापरासाठीचा साखरेचा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी झाला आहे. या तुटवड्याचे मुख्य कारण इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा वापर सुरू असल्याचे मानले जाते. भारतात आधीपासूनच धान्यापासून अल्कोहोलचे उत्पादन होते. अन्नधान्यापासून पेट्रोल आणि अल्कोहोलचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन हे धोरणकर्त्यांच्या दूरदृष्टीचा अभाव दर्शवते.


गेल्या दोन महिन्यांत साखरेच्या किमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. रक्षाबंधन, गणेशोत्सव आणि कृष्ण जन्माष्टमी यांसारखे मोठे सण पुढे येत आहेत, ज्यामध्ये मिठाई आणि प्रसाद वाटपासाठी साखरेची मागणी असते. यानंतर लगेचच नवदुर्गा, विजयादशमी आणि दिवाळी यांसारखे मोठे सण आहेत, ज्यात साखरेचा सर्वाधिक वापर होतो. जर वेळेवर साखरेची आयात झाली नाही, तर साखरेच्या किमती गगनाला भिडतील. तथापि, सरकारचा दावा आहे की, पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण वाढवल्याने साखर महाग झालेली नाही. उलट खराब हवामानामुळे देशात उसाचे उत्पादन कमी झाले आहे. सरकारने दिलेले आणखी एक कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमतीत झालेली वाढ. सरकार ई-२० इथेनॉल पेट्रोलच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यास तयार नाही. म्हणूनच सरकारने ई-१०, म्हणजेच १०% इथेनॉल-मिश्रित पेट्रोल तयार करण्याच्या सूचना सरळ नाकारल्या आहेत.

देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता प्रति वर्ष २० अब्ज लिटरपेक्षा जास्त वेगाने वाढली आहे, तर दुसरीकडे पेट्रोल वाहनांमध्ये इथेनॉल-मिश्रित पेट्रोल वापरल्याने वाहनांच्या मायलेजवर परिणाम होत आहे. असे असूनही नवीन इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारले जात आहेत. बँकांनी या क्षेत्राला १ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. सरकारसमोर आता पेचप्रसंग आहे की, पेट्रोलमधील मिश्रण कमी केल्यास हजारो कोटी रुपयांची बँक कर्जे आणि देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक गमावण्याचा धोका वाढेल. मिश्रण म्हणजे अशी प्रक्रिया, ज्यामध्ये ई-२० किंवा ई-१० टक्के इथेनॉलसारखे विशिष्ट प्रमाणात जैवइंधन पेट्रोलमध्ये मिसळले जाते. तथापि, हे जीवाश्म इंधन पर्यावरणास अनुकूल आहे आणि हवामान बदलाला आळा घालण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अनेक देश जैवइंधनाचे उत्पादन वाढवत आहेत.


केअर एज रेटिंग्सच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत इथेनॉल उत्पादन क्षमतेत आणखी ४ अब्ज लिटरने वाढ होईल. याचा अर्थ एकूण उत्पादन क्षमता अंदाजे २.४ अब्ज लिटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. २०१४ मध्ये इथेनॉलचे उत्पादन प्रति वर्ष ४.२१ अब्ज लिटर होते, जे आता चौपट झाले आहे. चालू आर्थिक वर्षात ई-२० पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी १.२ अब्ज लिटर इथेनॉलची आवश्यकता असेल. याशिवाय उद्योग, औषध कंपन्या आणि रासायनिक क्षेत्राकडून ३५० अब्ज लिटर इथेनॉलची मागणी आहे. २०२५पर्यंत देशात ई-२० पेट्रोल विकले जाईल.

असे दिसते की, अमेरिका आणि इराण, रशिया आणि युक्रेन आणि इस्रायल यांच्यातील अलीकडील युद्धांमुळे केंद्र सरकारने इथेनॉल-मिश्रित पेट्रोलला अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नवीन इथेनॉल प्रकल्पांच्या स्थापनेमुळे ई-३० किंवा त्याहून अधिक इथेनॉल-मिश्रित पेट्रोल देशभरात विकले जावे, अशी मागणी उद्योग करत आहे. सध्या ऊस, मका आणि इतर धान्यांपासून बनवलेल्या इथेनॉलच्या निर्यातीवर बंदी घातली पाहिजे, कारण अन्नधान्यापासून बनवलेल्या इथेनॉलच्या निर्यातीमुळे देशातील धान्याचा पुरवठा तर कमी होईलच, पण त्याच्या किमतीही वाढतील. शेतीतील अवशेष आणि बायोमासपासून बनवलेल्या इथेनॉलच्या निर्यातीला सप्टेंबर २०२५ पर्यंत परवानगी देण्यात आली असली तरी, नेपाळ आणि इंडोनेशियासारख्या देशांमध्ये निर्यातीच्या शक्यता सरकारने शोधाव्यात, अशी मागणी उद्योग करत आहे.


धान्ये, फळे आणि भाज्या मानवी अस्तित्वासाठी मूलभूत आहेत, परंतु औद्योगिक उत्पादनासाठी ऊर्जा पुरवण्यासाठी आणि आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या भौतिक उपकरणांसाठी पर्यायी स्रोत म्हणून पिकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. अन्नसंकट कायम राहण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. जैवइंधनासाठी धान्याच्या वापराला पूर्ण मोकळीक दिल्यास भारतातील उपासमारीचे संकट अधिक गंभीर होऊ शकते. अशा परिस्थितीत वाहनांचे उत्पादन वाढवणे आणि बँक कर्जाद्वारे त्यांच्या विक्रीला चालना दिल्यास उपासमारीची परिस्थिती आणखी बिकट होईल. या संदर्भात ब्रिटिश स्वयंसेवी संस्था आॅक्सफॅमने जगातील वाढत्या अन्नसंकटाबद्दल इशारा दिला आहे की, जर धान्यांपासून अल्कोहोल आणि इथेनॉलचे उत्पादन थांबवले नाही, तर २०३०पर्यंत अन्नधान्याची मागणी ७० टक्क्यांनी वाढू शकते आणि धान्याच्या किमतीही दुप्पट होऊ शकतात. अशा परिस्थितीत इथेनॉल धोरणावर पुनर्विचार केला पाहिजे.

दशक पहिला : स्तवननाम समास दुसरा : गणेशस्तवन


श्री समर्थ रामदास स्वामीकृत ‘श्री दासबोध’ या ग्रंथाच्या पहिल्या दशकाचे नाव स्तवननाम दशक असे असून, त्यातील दुसरा समास म्हणजेच यात गणेशस्तवन समर्थांनी केलेले आहे. कोणताही ग्रंथ वा कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे आणि ग्रंथाची सुरुवात मंगलमय व्हावी, यासाठी भारतीय परंपरेनुसार प्रथम आराध्य दैवत श्री गणेशाचे स्तवन केले जाते. या समासात समर्थ रामदास स्वामींनी श्री गणेशाचे तात्त्विक (निर्गुण) आणि सगुण (रुपवर्णन) असे दोन्ही प्रकारे अत्यंत सुंदर व सविस्तर निरूपण केले आहे.


श्री गणेशाचे तात्त्विक व आध्यात्मिक स्वरूप (निर्गुण निरूपण) करताना समर्थ समासाच्या सुरुवातीला समर्थ गणेशाला केवळ भौतिक देवता न मानता त्याचे परब्रह्मस्वरूप स्पष्ट करतात. गणनायक व सिद्धिफळदाता असा आहे. गणेश हा सर्व गणांचा पती (नायक) आणि सर्व प्रकारच्या सिद्धी व फळे देणारा आहे. त्याचप्रमाणे तो अज्ञानभ्रांतीच्छेदक असा आहे. जो माणसाच्या मनातील अज्ञान, भ्रम आणि संशयाचे आवरण दूर करून शुद्ध बोध (ज्ञान) रूप प्रकाश देतो, तो गणेश होय.

गणेश हा काळावर विजय मिळवणार आहे असे या स्तवनात समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात की, गणेशाच्या कृपेचे सामर्थ्य इतके अफाट आहे की, त्याच्या कृपेने माणसाचे अज्ञान तर विरघळून जातेच, पण संपूर्ण विश्व गिळून टाकणारा ‘काळ’ सुद्धा त्याच्या दास्यात (गुलामगिरीत) येतो.


या स्तवनात समर्थ गणरायाच्या विघ्नहर रूपाचेही वर्णन करतात. समर्थ म्हणतात की, गणेशाच्या केवळ नामस्मरणाने सर्व प्रकारची संकटे आणि बाधा थरथर कापत दूर पळून जातात, म्हणूनच त्याला ‘विघ्नहर’ किंवा अनाथांचे माहेर म्हटले आहे.

याठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी श्री गणेशाच्या सगुण रूपाचे विलोभनीय वर्णन केलेले आहे. समर्थ रामदास स्वामींनी गणेशाच्या सगुण रूपाचे अत्यंत चित्रमय आणि सुंदर शब्दांकन केले आहे. गणेशाची प्रसन्न व भव्य मूर्ती त्यांच्या डोळ्यांपुढे आहे. श्री गणेश हे सदा आनंदात डुलणारे, गंडस्थळावरून मद (अद्भूत सुगंधी द्रव) गळणारे आणि सदैव प्रसन्न वदनाचे आहेत. त्यांची मूर्ती भव्य, महाप्रचंड आणि विस्तीर्ण मस्तकावर शेंदूर चर्चिलेली किंवा लेपलेली अशी आहे.


गणेशाच्या अलंकार व मुकुटाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की, त्यांच्या मस्तकावर रत्नखचित मुकुट झळाळत आहे, ज्यातून नानाविध रंगांच्या किरणोत्सर्गाची कीळ पसरते. कानातील कुंडले आणि नीळमणी चमकत असतात. गणेशाच्या विविध अवयवांचे वर्णन करताना या समासात समर्थ म्हणतात की, पांढरे शुभ्र सुदृढ दात, सोटासारखी लांब सरळ किंवा मुरडलेली सोंड, लहान चंचल डोळे आणि पंख्यासारखे हलणारे मोठे कान (कर्णथापा) यांमुळे त्यांचे रूप अधिकच खुलून दिसते.

गणेशाच्या भोवती असलेले नागबंध व आभूषणे याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की, त्यांच्या मोठ्या सुटलेल्या पोटाभोवती (लंबोदर) जिवंत नाग वेढा घालून बसलेला असतो आणि तो फणा काढून फुत्कार टाकत असतो. गळ्यात सुंदर फुलांच्या माळा आणि हृदयावर रत्नजडित पदक शोभून दिसते.


त्याचप्रमाणे गणेशाच्या नृत्यकला निपुणतेबाबत समर्थ म्हणतात की, गणेश हे चंचल व अत्यंत नटखट स्वरूपात विविध छंदांनी नृत्य करतात, ज्यांचे लावण्य पाहून सर्व देवही तटस्थ (थक्क होऊन) पाहत राहतात. असे अत्यंत सुंदर आणि अद्भूत असे वर्णन या गणेश स्तवन नाम समासात रामदास स्वामी करतात.

समर्थ इथेच थांबत नाहीत, तर ते या समासात गणेशोपासनेचे महत्त्व आणि फळश्रुती पण सांगतात. या समासाच्या शेवटी समर्थ गणेशाच्या उपासनेचे महत्त्व सांगताना म्हणतात की, याच्या स्तवनाने बुद्धीचा विकास होतो. हे बुद्धीचे दैवत आहे. ज्या लोकांची बुद्धी मंद असते, जे लोक अज्ञानी, हीन किंवा अवलक्षणी असतात, ते जरी गणेशाचे चिंतन करू लागले तरी ते सर्व विद्यांमध्ये (विशेषत: चौदा विद्या आणि ६४ कलांमध्ये) प्रवीण, हुशार व तार्किक बनतात.


कोणत्याही कार्यसिद्धीसाठी गणेशाचे महत्त्व खूप आहे. आपण कोणत्याही कामाची सुरुवात करताना श्रीगणेशाने केली असे म्हणतो. त्यामागे कार्य सिद्धी होणे अभिप्रेत असते. कोणतेही शुभ कार्य सुरू करताना श्री गणेशाचे ध्यान व वंदन केल्यास कोणतीही बाधा किंवा अडथळा येत नाही आणि कार्य यशस्वी होते, याचा विश्वासच समर्थ रामदास या समासात देतात. दासबोधातील पहिल्या दशकातील या दुसºया समासात समर्थ रामदास स्वामींनी श्री गणेशाच्या बाह्य सौंदर्याचे जसे डोळ्यांत भरण्यासारखे वर्णन केले आहे, त्याचबरोबर त्याच्या आंतरिक व आध्यात्मिक सामर्थ्याद्वारे मानवाचे अज्ञान कसे नष्ट होते, याचे विलक्षण दर्शन घडवले आहे.

प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा



Tuesday, August 25, 2026

दशक पहिला समास १


श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत दासबोधातील दशक पहिला हा स्तवनांचा आहे. यातील समास पहिला- ‘ग्रंथारंभलक्षण’ याचे सविस्तर वर्णन करतो. या ग्रंथाचे स्वरूप आणि नाव काय आहे असा प्रश्न उपस्थित करतच हा ग्रंथ सुरू होतो. गुरू-शिष्य संवादातून निर्माण झालेला हा ग्रंथ आहे. आपल्याकडे गुरूचरित्रही सिद्ध आणि नामधारक या गुरू-शिष्यांच्या चर्चेतून तयार झालेला ग्रंथ आहे. त्यानंतरच्या काळात समर्थांनी लिहिलेला दासबोध हा सर्वप्रकारच्या विद्या, शिक्षण, व्यवस्थापन, ज्ञान आाणि मार्गदर्शक असा ग्रंथ आहे. यातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात गुरू-शिष्य संवाद प्रकट होताना दिसतो. हा ग्रंथ सद्गुरू आणि शिष्य यांच्यातील अत्यंत सोप्या व अर्थपूर्ण संवादाच्या रूपात रचला गेला आहे.


समर्थ सांगतात की, या ग्रंथाचे नाव ‘दासबोध’ असे असून यात प्रामुख्याने भक्तिमार्ग, ज्ञान, वैराग्य आणि अध्यात्म निरोपण (अध्यात्माचे विवेचन) सविस्तरपणे सांगितले आहे. या ग्रंथाचा मुख्य उद्देश व प्रतिपाद्य विषय काय आहे तर याची यादीच येथे दिलेली आहे. या पहिल्या दशकातील पहिल्या समासात समर्थांनी ग्रंथात पुढे काय काय स्पष्ट केले आहे, याची यादी दिली आहे. यामध्ये निश्चयात्मक ज्ञान म्हणजे काय हे सांगितले आहे. नवविधा भक्ती, सायुज्य मुक्ती, मोक्षप्राप्ती, विदेहस्थिती, अलिप्तपणा आणि ‘आपण स्वत: कोण आहोत’ (आत्मा व परब्रह्म) या विषयांचा ठाम निश्चय यात सांगितला आहे.

याशिवाय चातुर्य व व्यवहार याचे शिक्षण ते येथे देतात. केवळ परमार्थच नाही, तर उत्तम उपासना, कवित्व, चातुर्य, पंचभूतांचे लक्षण आणि सृष्टीचा कर्ता कोण याबद्दलचे व्यावहारिक व अध्यात्मिक ज्ञान यात दिले आहे.


याशिवाय शंकांचे निरसन करणारा हा ग्रंथ आहे. श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय, किंतू आणि आशंका दूर करण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. त्याशिवाय प्रमाणांची (प्रमाणीकरण) विविधता येथे दिसून येते. समर्थ स्पष्ट करतात की हा ग्रंथ स्वत:च्या कल्पनेने रचलेला नाही. याला उपनिषिदे, वेद, श्रुती, भगवद्गीता, गणेशगीता, गुरुगीता, भागवत इत्यादी अनेक प्राचीन ग्रंथांचे प्रमाण (संमती) आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात ‘आत्मप्रचिती’ (स्वत:चा अनुभव) आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोड दिली आहे.

या ग्रंथाची फळश्रुती (श्रवणाचे फायदे) काय हे पण समर्थ येथे सांगतात. हा ग्रंथ मनापासून ऐकल्याने किंवा वाचल्याने मानवी जीवनात तत्काळ सकारात्मक बदल घडून येतात. आज माणसाच्या मनात सकारात्मक विचार असणे ही काळाची गरज आहे. सगळीकडे तिरस्काराची भावना, कपटाचे राजकारण चालू असताना समाजाला भरकटवणाºया प्रवृत्तीपासून प्रत्येकाचे मन सावरले पाहिजे. त्यासाठी सकारात्मक विचारांची गरज आहे. त्यासाठी हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे.


हा ग्रंथ अज्ञानाचा नाश करतो. संशय, दु:ख आणि भ्रांती नष्ट होऊन शीघ्र ज्ञानप्राप्ती होते. यामुळे माणसाच्या वर्तनात बदल घडतो. भ्रांत, अवगुणी आणि अवलक्षणी माणसे सुलक्षणी व चतुर होतात. आळशी माणसे उद्योगी बनतात आणि निंदक सुद्धा भक्तिमार्गाला लागतात. या ग्रंथामुळे मोक्ष व समाधान प्राप्त होते असे या पहिल्या समासात समर्थ सांगतात. बद्ध जीव मुमुक्षू (मोक्षाची इच्छा असणारे) बनतात, संसारातील उद्वेग शांत होतो आणि मनाला परम शांती व समाधान लाभते.

थोडक्यात सांगायचे तर दासबोधातील दशक एक समास पहिल्यामध्ये समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथाची प्रस्तावना मांडली आहे. हा ग्रंथ माणसाला अज्ञानातून काढून ज्ञानाकडे नेणारा, संशयांचे छेद करणारा आणि प्रत्यक्ष अनुभूतीवर आधारित असलेला एक महान मार्गदर्शक ग्रंथ आहे. तो प्रत्येकाने वाचला पाहिजे. आपल्याला फक्त भगवतगीता माहिती असते. ती पण पूर्ण नाही. पण दासबोधात चोवीस प्रकारच्या गीता आढळून येतात. यातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात ओवी १८मध्ये समर्थांनी स्पष्ट केले आहे की, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता तसेच वेद आणि वेदांत. त्याचप्रमाणे ओवी १९मध्ये भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे आणि श्रीमद्भगवत पुराण इत्यादी विविध ग्रंथांचा सिद्धांत आणि विचार येथे (या ग्रंथात) अगदी स्पष्टपणे आणि निश्चितीने मांडला आहे. हे सर्व भगवंताचेच यथार्थ वचन आहे. या या श्लोकांमध्ये आलेले प्रमुख ग्रंथ किंवा विविध गीता म्हणजे, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता यांचा समावेश आहे. याशिवाय इतर धार्मिक ग्रंथांपैकी वेद, वेदांत (उपनिषदे) आणि भागवत पुराणातील दाखले येथे आहेत असे समर्थ या पहिल्या समासात सांगतात. त्यामुळेच हा ग्रंथ अत्यंत परिपूर्ण असा आहे.


प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा


भारत बांग्लादेश पाणी करार: सरकारने भूमिका स्पष्ट करावी


१९९६चा भारत-बांगलादेश गंगा पाणी करार डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार असल्याने ढाका नवीन करारासाठी आपली मागणी तीव्र करत आहे आणि उन्हाळ्यात किमान पाणी प्रवाहाची हमी देणारी अट त्यात समाविष्ट करू इच्छित आहे. तथापि, केंद्र आणि बिहारमधील सत्ताधारी एनडीएचा एक प्रमुख घटक असलेल्या जनता दल युनायटेडचे ​​कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी या मुद्द्याला एक नवीन वळण दिले आहे. त्यांचा संदेश स्पष्ट आहे की, भारताने केवळ बांगलादेशसोबत नवीन कराराचा विचार करू नये, तर बदलणारे हवामान, घटणारा प्रवाह आणि वाढत्या गरजा लक्षात घेता गंगेच्या पाण्याचे वितरण भारताच्या राज्यांमध्ये विशेषत: बिहारमध्ये कसे केले जाईल यालाही प्राधान्य द्यावे. हाच तो प्रश्न आहे जो हे सुनिश्चित करेल की, २०२६ नंतरचे गंगा राजकारण केवळ पाणीवाटपाचा मुद्दा न राहता त्याला राष्ट्रीय हित, सीमा सुरक्षा, प्रादेशिक मुत्सद्देगिरी आणि सामरिक रणनीतीच्या केंद्रस्थानी आणेल.


खरे तर ढाकाला नवीन करारामध्ये एक ‘हमी कलम’ समाविष्ट करायचे आहे, जे हे सुनिश्चित करेल की, बांगलादेशला कोरड्या हंगामात किमान प्रमाणात गंगेचे पाणी मिळेल. १९७७च्या करारामध्ये अशा हमीची तरतूद होती, परंतु १९९६च्या करारामध्ये तिचा समावेश नव्हता. बांगलादेशचा युक्तिवाद आहे की, हवामान बदल, अनियमित कोरड्या हंगामातील प्रवाह आणि घटत चाललेली पाण्याची उपलब्धता यामुळे जुने सूत्र आता त्यांच्या गरजा आणि सद्य परिस्थितीचे प्रतिबिंब दर्शवत नाही.

परंतु हाच युक्तिवाद भारतासाठी विशेषत: बिहारसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. संजय झा प्रश्न विचारतात की, भारताने तीन दशके जुन्या गणितांवर आधारित आणखी एका दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय बंधनात स्वत:ला का बांधून घ्यावे? बिहारच्या अनेक भागांमध्ये गंगेचा अखंड प्रवाह विस्कळीत होत आहे, नदीचे प्रवाह बदलत आहेत, अनेक भागांमध्ये भूजल संकट अधिक गंभीर होत आहे आणि दुसरीकडे दक्षिण बिहारमधील दुष्काळग्रस्त भाग, तसेच उत्तर बिहारमधील पूरप्रवण भाग पाण्याच्या विषमतेशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा नदीचे वर्तन आधीच बदलले आहे, तेव्हा १९९६ची आकडेवारी आणि सूत्र भविष्यासाठी कायमस्वरूपी स्वीकारणे हे बिहारच्या हितासाठी हानिकारक ठरू शकते.


फरक्का वाद हा या संपूर्ण चर्चेचा सर्वात संवेदनशील मुद्दा आहे. बांगलादेशने कोरड्या हंगामात पाण्याच्या प्रवाहातील आपला वाटा कमी होण्यासाठी बºयाच काळापासून फरक्का बॅरेजला जबाबदार धरले आहे. बांगलादेशने या मुद्द्यावर कठोर भाषा वापरली आहे. भारताची भूमिका वेगळी आहे. भारत फरक्काला धरण न मानता एक वळण रचना मानतो, ज्याचा उद्देश गंगेच्या पाण्याचा काही भाग हुगळी नदी प्रणालीकडे वळवणे आहे, तर उर्वरित प्रवाह बांगलादेशकडे जातो. भारताने असेही म्हटले आहे की, पाण्याच्या प्रवाहाची आकडेवारी संयुक्त नदी आयोगामार्फत दिली जाते.

पण आता खरा मुद्दा फक्त फरक्का नाही. प्रश्न असा आहे की, गंगेबाबत आंतरराष्ट्रीय वचनबद्धता करण्यापूर्वी भारतातील गंगा खोºयातील राज्यांचे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल हक्क आणि गरजा यांचे वैज्ञानिक मूल्यांकन का केले जाऊ नये?


इथेच संजय झा यांची मागणी बिहारसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. १९९६पासून बिहारची लोकसंख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि औद्योगिक गरजांचा दबावही अनेक पटींनी वाढला आहे. जर राज्याला आपल्या कृषी, सिंचन प्रकल्प आणि जल व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन योजना आखायच्या असतील, तर गंगा खोºयातील आपला वास्तविक आणि न्याय्य वाटा त्याला आगाऊ माहीत असणे आवश्यक आहे. नवीन करारापूर्वी भारतांतर्गत शास्त्रीय पद्धतीने केलेले जलवाटप हा बिहारसाठी सर्वात मोठा सामरिक फायदा ठरू शकतो.

भारतासाठी हा केवळ बिहार विरुद्ध बांगलादेश असा प्रश्न नाही. गंगा ही भारत आणि बांगलादेश यांच्यात विभागलेल्या ५४ प्रमुख नद्यांच्या व्यापक जलसंबंधाचा एक भाग आहे. जर भारताने देशांतर्गत जलसंतुलन स्थापित न करता बांगलादेशला किमान प्रवाहाची हमी दिली, तर भविष्यातील तीव्र दुष्काळाच्या वर्षांमध्ये आपल्या राज्यांच्या गरजा आणि आंतरराष्ट्रीय जबाबदाºया यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नवीन कराराचा आधार १९५० किंवा १९९०च्या दशकातील आकडेवारी नसावा, तर सद्य जलशास्त्रीय आकडेवारी, हवामानाचे अंदाज, प्रत्यक्ष प्रवाह आणि नियतकालिक पुनरावलोकनाची प्रणाली असावी.


भारताच्या संसदीय समितीने असेही सूचित केले आहे की, कराराच्या नूतनीकरणावरील वाटाघाटींमध्ये बिहार आणि पश्चिम बंगालच्या चिंता, पाण्याची अद्ययावत माहिती आणि हवामान बदलाचे परिणाम यांचा समावेश असावा. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, जर नवीन प्रणाली स्थापित केली गेली, तर ती जुन्या गणिताची केवळ एक नक्कल असू शकत नाही.

दुसरीकडे, जर कराराची मुदत संपली आणि नवीन करार होऊ शकला नाही तर काय? अशा परिस्थितीत बांगलादेश आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करू शकतो. ढाका, संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर जलहक्क आणि दुष्काळामुळे होणाºया हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सहभागी होत आहे. बांगलादेश पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करू शकतो. यामुळे भारतावर राजनैतिक दबाव वाढेल आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन तणाव निर्माण होईल. बांगलादेश देशांतर्गत राजकारणात गंगा पाण्याच्या मुद्द्याचा वापर एक संवेदनशील राष्ट्रवादी मुद्दा म्हणूनही करू शकतो.


अशा परिस्थितीत भारतावरील परिणाम केवळ त्याच्या राजनैतिक प्रतिमेपुरता मर्यादित राहणार नाही. पाण्याच्या वादामुळे सीमापार सहकार्य, नदी व्यवस्थापन, व्यापार आणि व्यापक भारत-बांगलादेश संबंधांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नवी दिल्लीसाठी सर्वात शहाणपणाचा मार्ग म्हणजे जुन्या कराराचे आंधळेपणाने नूतनीकरण करणे किंवा पाण्याचा मुद्दा अनिश्चिततेत सोडणे हा नाही. भारताने या संधीचा उपयोग करून एक मजबूत, आधुनिक आणि संतुलित जल धोरण तयार केले पाहिजे. सर्वप्रथम आपल्या राज्यांच्या हितांचे शास्त्रीय मूल्यांकन करून त्यानंतर बांगलादेशसोबत पारदर्शक वाटाघाटी कराव्यात. नवीन करारामध्ये प्रत्यक्ष प्रवाहावर आधारित वाटप, कमी कालावधीचे पुनरावलोकन, हवामान बदलानुसार सुधारणा आणि अपवादात्मक परिस्थितीसाठी स्पष्ट तरतुदींचा समावेश असू शकतो.

तथापि, डिसेंबर २०२६ची अंतिम मुदत ही केवळ एका कराराची समाप्ती नाही; तर ती भारताला आपले गंगा धोरण पुन्हा लिहिण्याची एक संधी आहे आणि जर यावेळी बिहारचे हित, बदलणारे हवामान आणि राष्ट्रीय जलसुरक्षा यांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतला गेला, तर ही नवीन व्यवस्था केवळ एक राजनैतिक करारच ठरणार नाही, तर भारताच्या दीर्घकालीन सामरिक आणि जलसुरक्षेसाठी एक मजबूत पायादेखील बनू शकते.

नवविधा भक्ती (दशक चौथा, समास दहावा)


समर्थ रामदास स्वामी यांनी ‘दासबोध’ या ग्रंथातील चौथ्या दशकात नवविधा भक्तीचे विस्तृत निरूपण केले आहे. नवविधा भक्तीच्या नऊ पायºयांपैकी ‘आत्मनिवेदन’ ही शेवटची आणि सर्वात सर्वोच्च पायरी आहे. समास १०व्या मध्ये समर्थांनी आत्मनिवेदनाचे अतिशय सखोल, तात्त्विक आणि व्यवहारी स्वरूप स्पष्ट केले आहे. खºया भक्तिमार्गाची शिकवण देणारा हा दशक या समासाने पूर्ण होतो.


यामध्ये त्यांनी आत्मनिवेदन म्हणजे काय? हे पुन्हा सांगितले आहे. ‘आत्मनिवेदन’ या शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे स्वत:ला (आपल्या देहबुद्धीला आणि अहंकाराला) परमेश्वराच्या चरणी पूर्णपणे अर्पण करणे. भक्तीच्या पहिल्या आठ पायºया (श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य आणि सख्य) पूर्ण झाल्यानंतर साधक जेव्हा भगवंताच्या अगदी जवळ पोहोचतो, तेव्हा त्याला स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाची गरज उरत नाही.

आपल्यातील ‘मी’पणा किंवा अहंकार नष्ट करून परमात्म्याशी एकरूप होणे म्हणजेच आत्मनिवेदन होय. त्याला विवेक आणि तत्त्वज्ञानाची जोड असावी लागते. समर्थ रामदास स्वामी स्पष्ट करतात की, केवळ भावनावश होऊन आत्मनिवेदन होत नाही, तर त्यासाठी योग्य ‘विवेक’ आणि ‘ज्ञान’ आवश्यक असते.


चार देह आणि २४ तत्त्वे याठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. मानवी शरीरात स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे चार देह असतात. या देहांचा आणि वस्तूमात्राचा विचार करून ‘मी कोण आहे?’ याचा शोध घेणे गरजेचे आहे. यासाठी शोध आणि निरसन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा साधक तत्त्वज्ञानाचा विचार करतो, तेव्हा त्याला कळते की, हे शरीर आणि जग निसर्गाच्या तत्त्वांपासून बनले आहे. पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) आणि अंत:करण चतुष्टय यांचा अभ्यास केल्यावर ‘मी’ नावाची कोणतीही स्वतंत्र वस्तू शिल्लक राहत नाही.

देव आणि भक्ताचे एकत्व समजणे आवश्यक आहे. ईश्वर हा सर्वव्यापी परमात्मा आहे आणि जीव हा त्याचाच एक अंश आहे. जेव्हा साधकाला हे ज्ञान होते, तेव्हा देव आणि भक्त यांमधील द्वैत (वेगळेपणा) संपून जाते आणि अद्वैताची अनुभूती येते. त्यामुळे आपोआपच अहंकाराचा त्याग आणि ईश्वराशी एकरूपता साधता येते.


आत्मनिवेदनात सर्वात मोठा अडथळा म्हणजे ‘अहंकार’ (देहबुद्धी) हा असतो. मनुष्य जन्माला आल्यापासून ‘हे माझे शरीर, हे माझे घर, मी अमुक एक आहे’ अशा भ्रमात जगत असतो. आत्मनिवेदन साधना या अहंकाराचे समूळ उच्चाटन करते. ज्याप्रमाणे नदी समुद्राला जाऊन मिळते, तेव्हा तिचे वेगळे नाव आणि अस्तित्व राहत नाही; ती समुद्रच बनून जाते. त्याचप्रमाणे जेव्हा भक्त भगवंताला स्वत:चे निवेदन (समर्पण) करतो, तेव्हा तो स्वत: भगवन्मय होतो.

याचे मुख्य उद्दिष्ट आणि फलश्रुती अशी आहे की, समर्थांच्या मते, आत्मनिवेदनामुळे भक्ताला खालील मुख्य गोष्टी प्राप्त होतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जन्म-मरण चक्रातून मुक्ती मिळते. देहाभिमान संपल्यामुळे कर्मांचे बंधन उरत नाही आणि साधक मोक्षपदाला प्राप्त होतो. दुसरे म्हणजे अद्वैत सिद्धी प्राप्त होते. ‘सोऽहं’ (ते परब्रह्म मीच आहे) या स्वरूपाचा साक्षात्कार होतो. याशिवाय त्याला परम शांती लाभते. सर्व प्रकारच्या चिंता, भीती आणि संशयाचा नाश होऊन साधक अखंड आनंदाच्या आणि शांतीच्या स्थितीत राहतो.


थोडक्यात सांगायचे तर दासबोधातील दशक ४ समास १० हा नवविधा भक्तीचा कळस आहे. समर्थ रामदास स्वामींनी या समासात केवळ कर्मकांड किंवा बाह्य भक्तीला महत्त्व न देता, ज्ञानाधिष्ठित आणि विवेकावर आधारित आत्मनिवेदनाचा मार्ग दाखवला आहे. स्वत:चा अहंकार पूर्णपणे गमावून ईश्वराच्या विराट रूपात विलीन होणे, हीच खरी भक्तीची आणि मानवी जीवनाची परमसीमा आहे.

श्रावण हा भक्तीचा महिना. त्या निमित्ताने या चौथ्या दशकावर आपण चर्चा केली. पण असंख्य वाचकांनी पूर्ण दासबोधावर अशी माहिती द्यावी अशी मागणी केल्याने पहिल्या दशकापासूनचा प्रवास आपण इथूनपुढे करणार आहोत. समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोध’ या ग्रंथात अध्यात्म, विवेक आणि व्यवहाराची सुंदर सांगड घातली आहे. दासबोधात ‘आत्मज्ञान’ (स्वत:च्या खºया स्वरूपाचे ज्ञान) या विषयाला अत्यंत मध्यवर्ती स्थान दिले आहे. दासबोधानुसार आत्मज्ञान म्हणजे काय? तर आत्मज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी किंवा शाब्दिक ज्ञान नव्हे, तर ‘मी कोण आहे?’ (कोऽहम्) याचा शोध घेऊन स्वत:च्या अंतरात्म्याचा आणि परब्रह्माचा प्रत्यक्ष साक्षात्कार करून घेणे.


त्यासाठी देहबुद्धीचा त्याग महत्त्वाचा आहे. मनुष्य स्वत:ला केवळ हे शरीर (हाड-मांसाचा सांगाडा) समजतो. ‘मी अमुक आहे, माझे शरीर, माझा संसार’ या भावनेला ‘देहबुद्धी’ म्हणतात. आत्मज्ञान म्हणजे या देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन आपण केवळ शरीर नसून ‘अविनाशी आत्मा’ आहोत हे ओळखणे. यातील तत्त्वज्ञान आणि विवेक काय सांगतो? तर दासबोधात समर्थ सांगता की, पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) आणि चार देह (स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण) यांचा विवेकाने विचार करून, असत्य (नश्वर) घटकांचा त्याग करणे आणि सत्य (अविनाशी परमात्मा) तत्त्वाला पकडणे म्हणजे आत्मज्ञान होय. या आत्मज्ञानाची प्राप्ती कशी होते? तर समर्थ रामदास स्वामींनी आत्मज्ञान मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे मार्ग स्पष्ट केले आहेत. त्यातील प्रमुख मार्ग म्हणजे सद्गुरू कृपा. दासबोधात सद्गुरूंचे महत्त्व अपार वर्णन केले आहे. सद्गुरूंच्या उपदेशाशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय आत्मज्ञानाची उकल होऊ शकत नाही. श्रवण आणि मनन करणे. ग्रंथांचे आणि संतांच्या विचारांचे निरंतर श्रवण करणे आणि त्यावर मनापासून विचार (मनन) करणे आवश्यक आहे. विवेक आणि वैराग्य आवश्यक आहे. जगात काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे, याचा सूक्ष्म विचार (विवेक) करणे आणि नश्वर गोष्टींबद्दलची आसक्ती सोडणे (वैराग्य) हा आत्मज्ञानाचा पाया आहे.

जेव्हा साधकाला आत्मज्ञान प्राप्त होते, तेव्हा त्याच्या जीवन जगण्याच्या दृष्टिकोनात पूर्ण बदल होतो. द्वैतभाव संपतो. भक्त आणि देव किंवा स्वत: आणि जग यांमधील भेद मिटून अद्वैताची (सोऽहम्- ते परब्रह्म मीच आहे) अनुभूती येते. अहंकाराचा नाश होतो. आत्मज्ञानामुळे ‘मी’पणा किंवा अहंकार पूर्णपणे गळून पडतो. मोक्ष आणि परम शांती लाभते. जन्म-मरणाच्या फेºयातून मुक्ती मिळते. सर्व दु:ख, चिंता, भीती आणि संशय नष्ट होऊन साधक अखंड शांती व आनंदाच्या स्थितीत राहतो. थोडक्यात सांगायचे तर, दासबोधातील आत्मज्ञान म्हणजे केवळ संन्यास किंवा कर्म सोडणे नव्हे, तर जगात राहून, सर्व कर्तव्ये पार पाडत असतानाही स्वत:च्या निर्गुण-निराकार आत्मस्वरूपाशी अखंड जोडलेले राहणे होय.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


शी जिनपिंग यांचा भारत दौरा: सीमेवर सैन्य तैनात ठेवण्याची वेळ


चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौºयाच्या तयारीत आहेत. दौºयादरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील. जिनपिंग यांनी यापूर्वी २०१९ मध्ये शिखर परिषदेसाठी भारताला भेट दिली होती. चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौºयादरम्यान साहजिकच दोन्ही देशांमध्ये उच्च स्तरावर चर्चा होईल. भारत-चीन सीमेवरील विशेषत: अरुणाचल प्रदेशातील अलीकडील वृत्तांमुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. या बदललेल्या परिस्थितीत कोणतेही भारतीय सरकार शांतता आणि व्यापारी संबंध मजबूत करण्याच्या नावाखाली शेजारी देशाच्या अशा कुटिल कारवायांकडे सहजपणे दुर्लक्ष करू शकत नाही. नवी दिल्लीतील स्वागताच्या तयारीपेक्षा भारत-चीन सीमेवर सैन्य पूर्णपणे सुसज्ज आणि २४ तास सज्ज ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरते. चीनचा इतिहासही हेच दर्शवतो की, भारताला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

भारत-चीन संबंधांमधील सर्वात मोठा विरोधाभास उच्च नेत्यांच्या दौºयांदरम्यान किंवा त्या सुमारास सुरू होतो. सामान्यत: जेव्हा दोन देशांमध्ये उच्चस्तरीय दौºयाचे नियोजन केले जाते, तेव्हा दोन्ही देश दौºयापूर्वी आणि दौºयादरम्यान कोणताही तणाव निर्माण होणार नाही याची खात्री करतात. तथापि, चीन नेमके याच्या उलट करतो. चीनचा इतिहास दर्शवतो की, जेव्हा जेव्हा संबंध सुधारण्यासाठी भारताचा एखादा उच्चस्तरीय नेता चीनला भेट देतो किंवा जेव्हा जेव्हा चीनचा एखादा उच्चस्तरीय नेता भारताच्या निमंत्रणावरून भारताला भेट देतो, तेव्हा चिनी सैन्य आंतरराष्ट्रीय राजनैतिकता आणि राजनैतिक शिष्टाचाराला पूर्णपणे झुगारून सीमेवर उपद्रव सुरू करते. उच्च स्तरावर संवाद, शांतता आणि व्यापारी संबंधांचा गजर होत असतानाच, चिनी सैन्य भारतीय हद्दीत जबरदस्तीने घुसखोरी करून भारतीय सैन्याशी संघर्ष करताना दिसते. हे लक्षात घेतले पाहिजे की, चिनी सैन्य पाकिस्तानी सैन्याइतके अनियंत्रित नाही, म्हणजेच ते जे काही करतात ते राष्ट्राध्यक्षांच्या मंजुरीनेच करतात.


२००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या चीन दौºयादरम्यान चिनी सैन्याच्या एका तुकडीने अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील असफिला भागात केवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नाही, तर भारतीय सैनिकांच्या एका छोट्या तुकडीकडून शस्त्रेही जप्त केली. चिनी सैन्याने २०१३ मध्ये स्वत:चे पंतप्रधान ली केकियांग यांच्या भारत दौºयापूर्वी आणखी एक घृणास्पद कृत्य केले. मनमोहन सिंग सरकारच्या काळात २०१३ मध्ये चिनी पंतप्रधानांच्या भारत दौºयापूर्वी पीएलए (चीनचे सैन्य) केवळ पूर्व लडाखमध्ये (भारतीय हद्दीत) १९ किलोमीटर आत घुसले नाही, तर तिथे तंबू उभारून त्या भागावर कब्जाही केला. दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आणि हा तणाव सुमारे २० दिवस चालला.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर २०१४ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारताला भेट दिली होती. जिनपिंग यांच्या आगमनाच्या काही तास आधीच चिनी सैन्याने लडाखमध्ये घुसखोरी करून बेकायदेशीरपणे रस्ता बांधायला सुरुवात केली. येथेही दोन्ही देशांचे सैन्य जवळपास दोन आठवडे आमनेसामने उभे ठाकले होते. भारत आणि चीनचे सर्वोच्च नेते वाटाघाटी करत असताना किंवा वाटाघाटीची तयारी करत असताना चिनी सैन्याने कुटिल कारवाया केल्याची असंख्य उदाहरणे आहेत.


सप्टेंबरमध्ये चीन सीमेवर आणखी एक मोठी दुर्घटना घडवण्याची योजना आखत आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न यासाठी निर्माण होतो, कारण १२-१३ सप्टेंबर रोजी भारतात १८ वी ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्षही या परिषदेला उपस्थित राहतील, यासाठी तयारी सुरू आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी असे संकेत दिले आहेत की, शी जिनपिंग यांच्या भेटीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, त्यांच्या पथकाच्या भेटी आणि इतर तयारीवरून ते भारताला भेट देऊ शकतात असे सूचित होते.

जर हे खरे असेल, तर भारत-चीन सीमेवर दक्षता आणखी वाढवण्याची वेळ आली आहे. प्रत्येक भारतीय सीमा चौकीवर भारतीय लष्कर पूर्ण ताकदीनिशी आणि साधनसामग्रीसह तैनात करावे लागेल. दळणवळण आणि वीजपुरवठा सर्वकाळ उपलब्ध राहील याची खात्री करण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. आणीबाणीच्या परिस्थितीत तत्काळ मदत पुरवण्यासाठी राखीव सैनिकांनाही सज्ज ठेवावे लागेल. दोन्ही देशांमध्ये सीमेवर शस्त्रे न वापरण्याचा करार असल्याने संघर्ष झाल्यास विशेष तयारी करावी लागेल हे उघड आहे. हिंदी चिनी भाई भाई म्हणून पाठीत खंजीर खुपसण्याची प्रवृत्ती चीनची कायम राहिलेली आहे. पंडित नेहरूंच्या काळात याचे फार मोठे नुकसान आपल्याला सहन करावे लागले होते. म्हणूनच आता आपल्याला सावधच राहावे लागेल. कधी चीन घात करेल हे सांगता येत नाही.


अशा परिस्थितीत लष्करी उपकरणे, शस्त्रे, सुधारित दळणवळण प्रणाली, २४ तास वीजपुरवठा, सुधारित रस्ते आणि मुबलक अन्नसाठा, यांसोबतच मोठे, धारदार खांबही आवश्यक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चिनी सैन्याच्या कुटिल कारवायांना कसे आणि कोणत्या मर्यादेपर्यंत प्रत्युत्तर द्यायचे, याबद्दल त्यांना नवी दिल्लीकडून स्पष्ट आदेश मिळायला हवेत.

Sunday, August 23, 2026

लोकशाही म्हणजे जमावशाही नव्हे


दिल्लीतील जंतरमंतर येथील ‘झुरळ’ विद्यार्थी-युवा आंदोलनाला ज्या पक्षांनी, नेत्यांनी आणि प्रमुख व्यक्तींनी उघडपणे किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता, ते रांचीच्या मुंडा स्टेडियममध्ये अनुपस्थित होते. किंवा असे म्हणता येईल की, एका ठिकाणी एका प्रकारचा पक्ष सत्तेवर होता, तर दुसºया ठिकाणी दुसरा गट सत्तेवर होता. दोन्ही ठिकाणी मुद्दा शैक्षणिक परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात होता. या तुलनात्मक विश्लेषणातून काय दिसून येते?


युवा शक्तीबद्दल किंवा आजच्या भाषेत ‘जेन-झी’बद्दल, होणाºया एकतर्फी टीकाटिप्पणीला सारासार विचार करूनच पारखणे चांगले. प्रत्येक युगात तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा, आदर्श आणि न्यायाची भावना असते. त्यामुळे, कधी कधी, वारंवार होणाºया गोंधळांविरुद्ध किंवा अन्यायकारक घटनांविरुद्धचा त्यांचा असंतोष ‘युवा चळवळी’चे रूप घेतो. जेव्हा प्रस्थापित राजकीय पक्षांकडे चांगल्या नेत्यांची कमतरता असते, तेव्हा असे अनेकदा घडते. मग, एखादी घटना अनपेक्षितपणे काही तरुणांना समोर आणते.

जसे अलीकडेच घडले, जेव्हा सरन्यायाधीशांनी एका विशिष्ट संदर्भात ‘झुरळ’ हा शब्द वापरला. जर इतर कोणत्याही राष्ट्रीय नेत्याने अशा शब्दाला विरोध केला असता, तर ‘झुरळ जनता पार्टी’ला मिळालेल्या उपहासात्मक प्रतिसादाला कदाचित इतका अनपेक्षित पाठिंबा मिळाला नसता. अशा प्रकारे, ‘झुरळ चळवळी’चा उदय हा देखील आपल्या राजकीय पक्षांच्या सामूहिक उदासीनतेचाच परिणाम होता.


राष्ट्रीय राजकारणातील जनता पक्षापासून ते आसाममधील आसू आणि आम आदमी पक्षापर्यंत, हे दिसून आले आहे की, विद्यार्थी आणि तरुणांचे शोषण हे व्यावसायिक नेत्यांकडून प्रामुख्याने केले जाते. एकदा का त्यांचे काम झाले आणि त्यांना सत्ता मिळाली की, नेते अगदी प्रमुख विचारवंत आणि कायदेतज्ज्ञांनाही दुधातील माशीप्रमाणे फेकून देतात. त्यामुळे, राजकारणात दूरदृष्टी, दृढनिश्चय आणि विवेक यांना चिरस्थायी महत्त्व आहे.

जर कोणत्याही चळवळीत विवेकी नेत्याचा अभाव असेल, तर ती चुकीच्या दिशेने जाण्याचा खरा धोका असतो. तथापि, दृढनिश्चय, समर्पण आणि साधनसंपन्नता यांसारखे गुण कट्टरतावादी आणि मूलतत्त्ववाद्यांमध्येही आढळू शकतात. त्यामुळे, गर्दीच्या प्रभावाखाली येण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण ती अनेकदा अविचारी असते.


तिला नेहमीच कोणीतरी दुसºयाकडून हाताळले जात असते. एकदा का गर्दीच्या मनात खोट्या कल्पना रुजल्या की, ती गर्दी आपल्यातील व्यक्तींवरही नियंत्रण ठेवू शकते. जेपी चळवळीपासून ते कॉक्रोच पार्टीच्या संसद मोर्चापर्यंत, बहुतेक गर्दीच्या आंदोलनांमध्ये हे दिसून आले आहे. एकंदरीत, हे प्रकरण ना सरळ आहे ना एकतर्फी. हीच राजकारणाची गुंतागुंत आहे. जे दिसते त्यापेक्षा बरेच काही लपवलेले असते. यातील बहुतेक छुपे हेतू आणि प्रेरणा अयोग्य असतात. म्हणूनच त्या लपवल्या जातात, पण केवळ निष्पाप विद्यार्थी आणि तरुणच नव्हे, तर सामान्य लोकही त्याबद्दल अनभिज्ञ राहतात. म्हणूनच, विशेषत: लोकशाहीमध्ये, आमिष दाखवणे, चिथावणी देणे, मोठी आश्वासने देणे आणि स्वप्नांचे वचन देण्याची प्रथा आहे. कोणत्याही मार्गाने अधिक लोकांना आकर्षित करणे हे सामान्य नेत्यांचे ध्येय असते. जमावाची मानसिकता भडकवून हे सर्वात सहजपणे साध्य केले जाते.

म्हणूनच नेत्यांचा गट गर्दीची खुशामत करतो. याचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे प्रत्येक वेळी ‘जनतेची’ स्तुती करणे. तरीही, जनता कधीही कोणतेही धोरण ठरवत नाही. केवळ चांगले किंवा वाईट नेतेच त्यांच्या नावाने हे करतात. हे एक निर्विवाद सत्य आहे की, कोणतीही जनसमुदायाच्या नेतृत्वाखालील चळवळ तिची घोषित ध्येये साध्य करत नाही. तिची शक्ती केवळ सत्ता बदलाकडे नेते. ज्याप्रकारे या गर्दीत घुसायचा विविध विरोधी पक्षांचे नेते प्रयत्न करत होते ते अत्यंत हास्यास्पद होते. या पक्षांमध्ये कोणताही दम राहिलेला नाही, गर्दी जमत नाही म्हणून हे मिळेल त्या गर्दीत घुसतात असा तो प्रकार होता.


नवीन सरकार चांगली धोरणे लागू करते की, परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक बिघडवते, हे पूर्णपणे नवीन नेत्यांच्या विवेकबुद्धीवर आणि क्षमतेवर अवलंबून असते. हा कल पन्नास वर्षांच्या भारतीय अनुभवाने सिद्ध झाला आहे. जेपींच्या विद्यार्थी चळवळीने आणि आॅल आसाम स्टुडंट्स युनियनने अखेरीस सरकार पाडले, परंतु ‘भ्रष्टाचार संपवणे’ किंवा ‘परकीय घुसखोरी थांबवणे’ ही त्यांची घोषित उद्दिष्ट्ये साध्य झाली नाहीत. इतकेच नव्हे तर, परिस्थिती आणखी बिघडली.

केवळ गर्दी, घोषणा आणि आवेशावर अवलंबून राहणे व्यर्थ आहे. राजकारणात शॉर्टकटने धोरणात्मक यश मिळवणे अशक्य आहे. असे यश केवळ नेते आणि पक्षांऐवजी, मुद्द्यांवर शांतपणे विचार करूनच मिळवता येते. तथापि, यासाठी संयम आणि सामाजिक जाणीव आवश्यक असते, तर व्यावसायिक नेते आपल्या पक्षीय जाणिवेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे, उत्स्फूर्त आंदोलनांमध्येही, ते उघडपणे किंवा गुप्तपणे स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांचा गैरफायदा घेण्याच्या संधी शोधतात. यामुळेच मोठी आंदोलनेसुद्धा आपली घोषित उद्दिष्ट्ये साध्य करण्यात अयशस्वी ठरतात. त्यांची सुरुवात एका वैध समस्येने होते, परंतु त्यावर वैज्ञानिक उपाय केवळ सामाजिक भावनेतूनच मिळू शकतो, तर पक्षीय स्पर्धा त्यांना अपरिहार्यपणे एका किंवा दुसºया बाजूला खेचते. त्यानुसार, समस्येवर योग्य विचार करून योग्य उपायावर सहमत होण्याऐवजी, पक्षीय गट एकमेकांना कमी लेखण्याचा मार्ग अवलंबतात. वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांना एक सोपा मार्ग दाखवला जातो.


अशा प्रकारे, सत्ता बदलते, पण समस्या तशीच राहते. कोणत्याही चळवळीत घोषणाबाजीने क्वचितच काही साध्य होते. याउलट, जमावाला बळ देणे आणि त्याच्यापुढे झुकणे हे एका मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरू शकते. मूठभर धूर्त व्यक्ती जनतेच्या नावाखाली सामान्य लोकांचे शोषण करतात. कोणत्याही चळवळीची उघड स्तुती करणे किंवा सहजपणे निंदा करणे अयोग्य आहे. राजकारणात सर्व काही निर्णायक व्यक्तींवर अवलंबून असते. केवळ सुज्ञ आणि वचनबद्ध व्यक्ती निर्णायक पदांवर असतील तरच सकारात्मक परिणाम साधता येतात.