नुकतेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत कर आकारणी आणि इतर कायदे (सुधारणा) विधेयक, २०२६ सादर केले. जागतिक भांडवल आणि व्यवसायासाठी भारताला अधिक आकर्षक आणि विश्वासार्ह ठिकाण बनवणे, तसेच आॅफशोअर गुंतवणूक निधी आणि निधी व्यवस्थापकांसाठी नियम सोपे करणे, हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, करप्रणालीत स्पष्टता आणण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादन मजबूत करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. परकीय भांडवलाचा वाढलेला ओघ देशाची आर्थिक स्थिरता मजबूत करेल आणि बाह्य आर्थिक धक्के सहन करण्याची क्षमता वाढवेल.
भारत परकीय भांडवल आकर्षित करण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. आरबीआयच्या नुकत्याच लागू केलेल्या नवीन सवलतीच्या स्वॅप सुविधेला व्यापक जागतिक पाठिंबा मिळाला आहे. देशाचा परकीय चलनसाठा वाढवणे आणि व्यवहार तोल मजबूत करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत, बँकांना तीन प्रमुख मार्गांनी परकीय चलन उभारता आले आहे. आॅफशोअर ठेव योजना (Offshore Deposit Scheme), परकीय चलन कर्ज आणि बाह्य व्यावसायिक कर्ज (Externel Commercial Borrowings).
सध्या, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भारतीय शेअर बाजारात परत येण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. दीर्घकाळ चाललेल्या विक्रीच्या सत्रानंतर, परकीय गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतासारख्या स्थिर आणि सुरक्षित बाजारांना प्राधान्य देत आहेत. रुपयाची स्थिरता, कंपन्यांच्या नफ्यात झालेली सुधारणा, भूराजकीय चिंतांमध्ये झालेली घट आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उत्कृष्ट संधी ही यामागील प्रमुख कारणे आहेत. भारताचा परकीय चलनसाठा ६८२ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. यामुळे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे, जागतिक कर्ज परतफेड आणि व्यवस्थापन सुलभ झाले आहे, तसेच देशांतर्गत बाजारातील महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली आहे.
१९९१च्या आर्थिक संकटानंतर, आर्थिक सुधारणांची एक नवीन फेरी सुरू करण्यात आली. तेव्हापासून, परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलण्यात आली आहेत. विमा, दूरसंचार आणि किरकोळ विक्री यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. काही अटी आणि नियमांच्या अधीन राहून संरक्षण क्षेत्रातही १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. बहुतेक क्षेत्रांमध्ये पूर्व सरकारी मंजुरीशिवाय (स्वयंचलित मार्गाने) गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. कालबाह्य आणि कठोर फेरा कायदा रद्द करून त्याच्या जागी लवचिक फेमा कायदा आणण्यात आला आहे, ज्यामुळे परकीय चलन प्रवाह आणि व्यवहारांना चालना मिळाली आहे.
देशाला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी आणि परदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना कर सवलती, सुलभ नियम आणि आधुनिक पायाभूत सुविधा देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्रे (SEZ) विकसित करण्यात आली आहेत. प्रमुख उत्पादन क्षेत्रांमध्ये उत्पादन वाढवणाºया कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादनाअधारित प्रोत्साहन (PLE) सारख्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. व्यापाराला चालना देण्यासाठी, रुपया चालू खात्यावर पूर्णपणे परिवर्तनीय करण्यात आला आहे आणि भारतीय शेअर बाजारातील परदेशी संस्थात्मक आणि पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी नियम सोपे करण्यात आले आहेत. विविध बहुआयामी प्रयत्नांनंतरही, शाश्वत परकीय भांडवल आकर्षित करण्यासाठी भारताला अजूनही भरीव सुधारणांची गरज आहे. केवळ मोठ्या देशांतर्गत बाजारपेठेवर आणि उच्च विकासदरांवर अवलंबून राहणे पुरेसे ठरणार नाही. देशाची नियामक चौकट, करप्रणाली आणि कायदेशीर प्रणालीमध्ये भरीव बदल करणे आवश्यक आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी स्थिर धोरणे ही एक पूर्वअट आहे. कर नियम, सीमा शुल्क आणि क्षेत्र-विशिष्ट तरतुदींमधील अचानक बदलांमुळे गुंतवणूकदार परावृत्त होतात. केंद्र आणि राज्य स्तरावरील विविध मंजुरी, परवानग्या आणि गुंतागुंतीच्या नियमांचा भार लक्षणीय आहे. शिवाय, न्यायालयांमधील विवाद निराकरणाची संथ गती आणि करारांच्या अंमलबजावणीतील विलंब हे परकीय भांडवलाच्या प्रवाहात एक मोठा अडथळा ठरतात.
गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी, सरकारने वित्तीय तूट नियंत्रित केली पाहिजे आणि महागाई आवाक्यात ठेवली पाहिजे. भारतीय चलनाच्या मूल्यातील अत्याधिक चढ-उतार गुंतवणूकदारांच्या परताव्याला हानी पोहोचवतात, त्यामुळे विनिमय दराची स्थिरता राखणे आवश्यक आहे. भारताचा शेअर बाजार मजबूत असला तरी, कॉर्पोरेट कर्ज बाजार मर्यादित आहे. पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी तो अधिक व्यापक आणि तरल बनवणे आवश्यक आहे. भांडवलाच्या हालचालींवरील निर्बंध कमी केल्याने तो अधिक लवचिक होईल. चीनवरील अवलंबित्व कमी करू पाहणाºया (चायना प्लस वन) जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी केवळ उत्पादनआधारित प्रोत्साहन पुरेसे नाही. यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा, कमी झालेला वाहतूक खर्च आणि कुशल मनुष्यबळ यांची एक एकात्मिक चौकट तयार करणे आवश्यक आहे.
ही सगळी पावले पुढे पडत असताना आपण हे परकीय भांडवल आपल्याकडे आणण्यासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही. परकीय भांडवल आल्याने आपल्याकडे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे हे पण लक्षात घेतले पाहिजे.