Saturday, July 25, 2026

विठ्ठल रुक्मीणीचा गजर आणि भक्तीची ताकद


ज्याला आपण महाराष्ट्रातील एक महोत्सव म्हणतो, त्यातला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस आज आहे. आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक धार्मिक सण किंवा तिथी नव्हे; तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अन् आत्मिक चैतन्याची एक भव्य अनुभूती आहे. तप्त उन्हाळ्यानंतर पडणाºया पावसाच्या पहिल्या सरी जशा धरणीला तृप्त करतात, तशीच आषाढीची वारी थकलेल्या आणि रोजच्या धकाधुकीत अडकलेल्या मानवी मनाला शांतता अन् आशेचा किरण देते. लक्षावधी वारकरी, डोक्यावर तुळशीवृंदावन आणि हातात चिपळ्या घेऊन ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या गजरात पंढरपूरच्या दिशेने पाऊल टाकतात, तेव्हा तो प्रवास केवळ भूगोलाचा राहत नाही, तर तो अंतर्मनाचा प्रवास बनतो.


महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ‘समता.’ पंढरपूरच्या वाटेवर श्रीमंत-गरीब, उच्च-नीच, जात-पात असा कोणताही भेदच उरत नाही. रिंगणात धावणारा अश्व असो वा हातात पताका घेऊन चालणारा सामान्य वारकरी, सगळे एकाच विठुरायाचे लेक असतात. आजच्या जगात जिथे विषमता, द्वेष आणि दुरावा वाढताना दिसतो, तिथे वारी ही जगाला समतेचा आणि बंधुत्वाचा शांततापूर्ण संदेश देणारे एक अद्वितीय व्यासपीठ ठरते. संतांनी दिलेली ही शिकवण आजच्या सामाजिक पर्यावरणात अधिकच प्रासंगिक ठरते.

आपल्या दैनंदिन आयुष्यात सुख आणि दु:खाची चक्रे सतत फिरत असतात. कधी परिस्थिती अनुकूल असते, तर कधी संघर्षाची. परंतु, वारकरी तत्त्वज्ञान आपल्याला शिकवते की, संकटांनी खचून न जाता आणि सुखाने हुरळून न जाता जीवनाकडे एका ‘साक्षीभावाने’ पाहिले पाहिजे. जसे वारकरी शेकडो मैल अनवाणी चालताना पायाचे फोड किंवा थकवा विसरून केवळ ध्येयावर (विठ्ठलावर) लक्ष केंद्रित करतात, तसेच माणसानेही आयुष्यातील ताणतणावांना बाजूला सारून अंतर्मनातील आनंदाचा शोध घेतला पाहिजे. हेच आपल्याला वारी आणि आषाढी सांगते.


आजची तरुण पिढीसुद्धा मोठ्या संख्येने वारीत सहभागी होताना दिसते, ही अत्यंत आशादायक गोष्ट आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल युगात जगणारा तरुण जेव्हा चिपळ्यांच्या तालावर तल्लीन होऊन नाचतो, तेव्हा हे स्पष्ट होते की, महाराष्ट्राच्या या भक्ती परंपरेची मुळे अत्यंत खोलवर रुजलेली आहेत. ही परंपरा केवळ जुन्या विचारांची नाही, तर ती प्रत्येक युगात माणसाला जगण्याचे बळ देणारी जिवंत ऊर्जा आहे.

आषाढी एकादशीच्या या पावन प्रसंगी केवळ पंढरपूरला जाणे किंवा उपवास करणे पुरेसे नाही; तर संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे, समाजात प्रेम, करुणा आणि बंधुभाव जपणे हीच खरी विठ्ठलपूजा ठरेल. विठुरायाच्या चरणी हीच प्रार्थना की सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सुबुद्धी लाभो! आज सगळीकडे राजकीय पक्षांनी, विरोधकांनी द्वेषाच वातावरण निर्माण केलेले असताना बंधुभावाची आणि समतेची शिकवण देणारी हीच वारी समाजाला तारक ठरेल. कारण विठ्ठल-रखमाईची भक्तीची ताकद आणि गजर फार मोठा आहे. हा गजर राजकीय आंदोलक आणि गोंगाट घालणाºया प्रवृत्तींना दूर करेल यात शंका नाही.


काळ बदलला, पिढ्या बदलल्या आणि जीवनशैली गतिमान झाली, तरीही महाराष्ट्राच्या आषाढी वारीची मुळे आणि भक्तीचा गोडवा तसाच कायम आहे. उलट, आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात वारीचे स्वरूप अधिक व्यापक आणि जागतिक पातळीवर पोहोचलेले दिसते. आजची वारी ही केवळ ज्येष्ठांची राहिलेली नाही. आयटी क्षेत्रातील व्यावसायिक, तरुण-तरुणी, विद्यार्थी आणि कॉर्पोरेट जगतातील लोक मोठ्या संख्येने हातात टाळ-चिपळ्या घेऊन वारीत सहभागी होत आहेत. लॅपटॉप आणि स्मार्टफोन हाताळणारी ही नवी पिढी रिंगणात पळताना, फुगड्या खेळताना आणि अभंग गाताना तितक्याच तन्मयतेने रमून जाते. हे पाहिल्यावर खरेच समाधान वाटते. एकीकडे झुरळांच्या नावाने अनागोंदी आणि हिंसाचार करू पाहणारी बिघडलेली तरुणाई आणि दुसरीकडे वारीतील ही तरुणाई. इन्स्टाग्राम रील्स, यूट्युब व्हीलॉग्स, फेसबुक लाईव्ह आणि ब्लॉग्सच्या माध्यमातून तरुण वारकरी वारीचा प्रत्येक क्षण जगासमोर मांडत आहेत. वारीतील शिस्त, बंधुभाव आणि निसर्गरम्य दृश्ये थेट जगभरातील लोकांपर्यंत पोहोचत आहेत. यामुळे परदेशात राहणाºया भारतीयांना आणि परदेशी नागरिकांनाही या अलौकिक सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे.

वारीचे व्यवस्थापन अधिक सुटसुटीत आणि सुरक्षित करण्यासाठी आता GPS ट्रॅकिंग, वारी अ‍ॅप्स आणि डिजिटल नकाशांचा GOOGLE Maps वापर केला जात आहे. दिंडीचे लाईव्ह लोकेशन, वैद्यकीय मदतीची ठिकाणे आणि अन्नछत्रांची माहिती अ‍ॅपद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होते. आजच्या डिजिटल युगातही वारीचा मूळ गाभा- ‘समता, भक्ती आणि शांतता’ अबाधित राहिला आहे. तंत्रज्ञानाने वारीचे बाह्य रूप आधुनिक केले असले, तर तिच्या आत्म्यातील भाव आणि निष्ठा आजही तीच आहे. ही डिजिटल वारी दाखवून देते की, महाराष्ट्राची ही प्राचीन संस्कृती नवीन तंत्रज्ञानाला नाकारत नाही, तर त्याला आत्मसात करून अधिक समृद्ध होते.


भक्तिमार्गाबरोबरच अर्थकारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम आमची वारी करते. वारी ही केवळ एक धार्मिक किंवा सांस्कृतिक सोहळा नसून, महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारा एक महत्त्वाचा आर्थिक कणा आहे. आषाढी वारीच्या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, ज्यामुळे ग्रामीण भागातील विविध क्षेत्रांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो.

वारीच्या मार्गावर आणि पंढरपूर परिसरात लागणारी लहान-मोठी दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पूजा साहित्य, तुळशीच्या माळा, टाळ-पखवाज निर्माते आणि स्थानिक हस्तकला वस्तूंना खूप मोठी मागणी असते. यामुळे ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक आणि कारागिरांचा वर्षभराचा रोजगार किंवा मोठा आर्थिक फायदा या काळात होतो. लाखो भाविकांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस, खासगी वाहने, ट्रॅव्हल्स आणि लॉजिस्टिक क्षेत्राला खूप मोठा व्यवसाय मिळतो. याशिवाय पंढरपूर आणि वारीच्या मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी लॉज, मठ, धर्मशाळा आणि घरगुती निवासाच्या सोयींमधून स्थानिक लोकांना चांगला आर्थिक रोजगार उपलब्ध होतो. वारीच्या काळात भाजीपाला, दूध, धान्य, फळे आणि उपवासाच्या पदार्थांची मागणी प्रचंड वाढते. यामुळे थेट शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळून बाजारपेठ उपलब्ध होते. वारीतील अर्थकारण हे कोणत्याही एका मोठ्या कॉर्पोरेट घराण्याभोवती केंद्रित नसून ते अत्यंत विकेंद्रित आणि सर्वसमावेशक आहे. रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यापासून ते मोठ्या व्यापाºयापर्यंत सर्वांनाच या उत्सवाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळतो. थोडक्यात सांगायचे तर, विठ्ठलभक्ती ही केवळ आत्मिक तृप्ती देत नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्याचे कामही करते.

संत निवृत्तीनाथांची ओढ


निवृत्ती प्रसादे विठ्ठल देखिला। निमाली ही त्रिकुटी मनाची।। असे संत निवृत्तीनाथ म्हणतात. गुरूंच्या कृपेने जेव्हा विठ्ठलाचे दर्शन घडते, तेव्हा मनातील सर्व संभ्रम, सुख-दु:खाचे खेळ संपून मन शांत होते. संत निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायाचे आद्यप्रवर्तक आणि संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव व संत मुक्ताबाई यांचे थोरले बंधू आणि गुरू मानले जातात. त्यांनी आपल्या अभंगांतून भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि गुरुकृपेचे महत्त्व अत्यंत सोप्या शब्दांत शिकवले आहे.


गुरुकृपेचे महत्त्व म्हणजे गुरू हीच खरी दिशा आहे हे त्यांनी दाखवून दिले. संत निवृत्तीनाथांच्या शिकवणीचा मुख्य गाभा म्हणजे गुरुभक्ती. ते मानतात की, गुरूंशिवाय ईश्वराची किंवा ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. आपल्या एका अभंगात निवृत्तीनाथ म्हणतात की, अमृताची फळे अमृताचे झाड। गुरुकृपा गोड निरंतरी॥ निवृत्ती म्हणे गुरुकृपेचा प्रकाश। तेणे प्रकाशे दिसे हा जगदाभास॥ म्हणजे, जसे अमृताच्या झाडाला अमृताचीच फळे येतात, तशी गुरूंची कृपा माणसाचे आयुष्य गोड आणि समृद्ध करते. गुरूंनी दिलेल्या ज्ञानरूपी प्रकाशामुळेच जगाचे आणि जीवनाचे खरे स्वरूप स्पष्ट दिसते.

आषाढी वारीचा मुख्य गाभा हा नामस्मरण भक्तीचा आहे. त्याबाबतही निवृत्तीनाथ म्हणतात की, नामस्मरणाची ताकद म्हणजे विठ्ठल नाम हेच सार आहे. संसारातील दु:खांमधून आणि भवसागरातून तरुण जाण्यासाठी संत निवृत्तीनाथ हरिनाम किंवा विठ्ठल नामाचा सोपा मार्ग सांगतात. ते म्हणतात की, हरि उच्चारितां दोष जातील लया। क्षणे एका तथा न लगती॥ निवृत्ती म्हणे हरि हाचि माझा प्राण। बीज हे प्रमाण सकळीकांचे॥ म्हणजे ते सांगतात की, मुखाने ‘हरि’ (विठ्ठल) नामाचा उच्चार करताच मनातील सर्व वाईट विचार आणि दोष एका क्षणात नष्ट होतात. निवृत्तीनाथ म्हणतात की, हरिनाम हाच माझा प्राण आहे आणि सर्व साधनांचे मूळ बीज तेच आहे. केवळ बाह्य कर्मकांड न करता अंत:करणापासून भक्ती करणे महत्त्वाचे आहे, अशी त्यांची शिकवण होती.


एका अभंगात ते म्हणतात की, कृष्ण नामाचा गजरू। तेणे निवाले हे शरीरू॥ निवृत्ती म्हणे भाव धरी। विठ्ठल राहे त्याच्या अंतरी॥ जेव्हा माणूस भगवंताच्या नामात तल्लीन होतो, तेव्हा त्याच्या शरीराला आणि मनाला परम शांती मिळते. ज्याच्या मनात सच्चा भाव असतो, त्याच्या अंत:करणात विठ्ठल कायम वास करतो. त्यांनी आपल्या बंधू-भगिनींना दिलेला ज्ञानाचा वारसा फार महत्त्वाचा आहे. संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. त्यांनी ज्ञानेश्वरांना भगवद्गीतेवर मराठीत टीका (ज्ञानेश्वरी) लिहिण्याची आज्ञा दिली, ज्यामुळे सामान्य माणसाला ज्ञानाचा मार्ग खुला झाला.

निवृत्तीनाथांच्या मते ज्ञान हे गुप्त ठेवण्यासाठी नसून ते सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी असते. गुरू निष्ठा म्हणजे गुरूच्या चरणी समर्पण वृत्ती ठेवणे. नामस्मरण म्हणजे विठ्ठल नामाचा विसर न पडू देणे. सदाचार व नम्रता याचा अर्थ अहंकार सोडून सर्व प्राणिमात्रांशी प्रेमाने वागणे. ही त्यांची सहज अशी शिकवण होती. निवृत्तीनाथांच्या शिकवणुकीतून उभी राहिलेली पंढरीची वारी सर्व संतांचा मेळा घेऊन चंद्रभागेच्या वाळवंटात येते तेव्हा सर्व वातावरण विठ्ठलमय होते.


मग आमचे तुकोबाराय म्हणतात की, खेळ मांडियेला वाळवंटी घाई। नाचती वैष्णव भाई रे।। चंद्रभागेच्या वाळवंटात आता भक्तीचा खेळ रंगला आहे. सर्व वारकरी भाऊ एकत्र येऊन आनंदाने नाचत आहेत. आता विठू माऊलीच्या दर्शनाचा महासोहळा आहे! त्यानंतर आषाढी एकादशीचा महाप्रसाद व कृतज्ञता भाव मनात उमटतात. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय! अशा घोषणांनी वातावरण पवित्र होते. आज आषाढी एकादशी! विठ्ठल माऊलीने आपल्या सर्व लेकरांना सुखात ठेवले. वारीचा हा प्रवास जरी संपला, तरी मनातील विठ्ठल नामाची वारी अखंड चालू राहो, हीच माऊली चरणी प्रार्थना. हीच प्रार्थना सर्व संत करत आले त्यालाच संतकृपा असे म्हणता येईल.

संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठातील शेवटच्या अभंगात म्हटले आहे, सर्व सुखाची लहरी हरिनाम बोहरी। प्रपंच नास करी क्षणाधारे॥ १॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥ २॥ हरिविण देव कोठेही न दिसे। चराचरी वसे हरि एकू॥ ३॥ ज्ञानदेवा पुसशी हरिची प्रचिती। संतांचे संगती लाभे हरि॥ ४॥ हरिचे नाम हे सर्व सुखांची लहरी (लाट) आहे, जे संसारातील सर्व दु:खांचा नाश करते. हे नाम एका क्षणाच्या आधाराने प्रपंचाची आसक्ती नष्ट करून टाकते. या जगामध्ये हरिशिवाय दुसरा कोणताही देव नाही, तो एकटाच संपूर्ण चराचरात भरून राहिला आहे. माऊली म्हणतात की, जर तुम्हाला हरिची खरी प्रचिती हवी असेल, तर ती केवळ संतांच्या संगतीतच मिळू शकते, कारण संतांच्या माध्यमातूनच हरिचा खरा अनुभव येतो.


यानंतर ते हरिपाठाची फलश्रृती काय ते सांगतात. हरि नामे पावन जाले हे प्रपंच। नामेचि हा साच पार पावे॥ १॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥ २॥ हरिपाठी सुटला संशयाचा पाश। हरि चरणी वास निरंतर॥ ३॥ ज्ञानदेवा चित्त हरिपाठी गेले। तेणे रूप जाले हरिचे पै॥ ४॥ हा हरिपाठाचा शेवटचा अभंग असून, ही एक प्रकारे फलश्रुती आहे. माऊली म्हणतात की, हरिनामाच्या प्रभावाने हा प्रपंचसुद्धा पावन (पवित्र) होतो आणि नामाच्याच बळावर माणूस खºया अर्थाने पैलतीराला (मोक्षाला) पोहोचतो. हरिपाठाच्या सततच्या अभ्यासाने मनातील सर्व संशयांचे पाश तुटून जातात आणि हरिच्या चरणांशी निरंतर वास मिळतो. ज्ञानेश्वर महाराज शेवटी सांगतात की, माझे चित्त आता पूर्णपणे हरिपाठात विलीन झाल्यामुळे माझे संपूर्ण अस्तित्वच आता हरिमय झाले आहे. हे हरिमय होणे म्हणजे वारी पूर्ण होणे.

प्रफुल्ल फडके/संतकृपा



Friday, July 24, 2026

शिक्षण हे राजकारणाचे साधन बनले


जेव्हा लडाखी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि नीटसह केंद्रीय परीक्षांमधील अनियमितता दूर करण्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतरवर बसलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या गटासोबत उपोषण सुरू केले, तेव्हा त्यांच्या वक्तव्यावरून असे सूचित झाले की, ते दूरचा विचार करत होते; शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा ही केवळ सुरुवात आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर काही कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते त्यांना भेटू लागले. सोनम वांगचुक यांनी जंतरमंतर येथील सुरू असलेल्या मोहिमेचे राजकारण करण्यास सुरुवात केली. त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर सोमवारी हा गट संसदेच्या दिशेने मोर्चा घेऊन गेला. उपस्थितांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले. या सर्व प्रकारामुळे असा संशय निर्माण होतो की, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या नावाखाली एक राजकीय आंदोलन सुरू केले जात आहे आणि सरकार बदलण्याचा हा एक प्रयत्न आहे.


राजकीय आंदोलन सुरू करण्यात किंवा सत्तापालट साधण्यात काहीही चुकीचे नाही, परंतु यासाठी शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थ्यांना साधन म्हणून वापरणे ही दुहेरी चूक आहे. यामुळे शिक्षणासारखा गंभीर विषय पक्षीय राजकारणाचा बळी ठरतो. ज्या विषयाला राजकारणापासून दूर ठेवून सुधारण्याची आणि व्यवस्थापित करण्याची गरज आहे, तो केवळ दुर्लक्षितच राहत नाही, तर त्याची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असते.

१९७४ पासून विद्यार्थी आणि तरुणांचा पक्षीय राजकारणासाठी वापर केला जात असल्याचे वारंवार दिसून आले आहे. जर सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाºयांचा हा हेतू नसेल, तर त्यांनी शैक्षणिक विषयावर लक्ष केंद्रित करायला हवे होते आणि त्याच्या विविध पैलूंवर पूर्ण लक्ष द्यायला हवे होते. शिक्षण क्षेत्राने पक्षीय राजकारणापासून स्वत:ला पूर्णपणे वेगळे ठेवून, सुधारणेचा आराखडा तयार करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता. यामुळे धोरणकर्त्यांनाही मदत झाली असती. याउलट केवळ शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. शैक्षणिक संस्थांची पवित्रता, शैक्षणिक साहित्याचा दर्जा, प्रतिभेला योग्य प्रोत्साहन, पात्र शिक्षकांची नियुक्ती आणि सर्व समस्यांचे निराकरण याकडे लक्ष दिले गेले तरच कोणताही खरा प्रयत्न अर्थपूर्ण ठरेल.


याउलट राजीनाम्याचा आग्रह, विविध लोकांचे एकत्र येणे, हास्यास्पद चिथावणीखोर वक्तव्ये आणि राजकीय आंदोलन सुरू करण्याचे उघड व छुपे संकेत, या सर्वांमधून भोळ्या विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे शोषण करण्याचा हेतू दिसून येतो. हे शिक्षणाच्या दृष्टीने हिताचे नाही. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी तर याच मुद्द्यावर गांधीजींनाही फटकारले होते. जर शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणायची असेल आणि ते गुणवत्तापूर्ण बनवायचे असेल, तर त्याला पक्षीय राजकारणापासून दूर ठेवणे ही पहिली अट आहे. अन्यथा, पक्षीय राजकारण आणि सत्तापालटाची इच्छा सर्व लक्ष इतर गोष्टींकडे वळवेल. मूळ मुद्दा बाजूला सारला जाईल. भारतात आणि परदेशातही अनेक ठिकाणी यापूर्वीही असे अनेकदा घडले आहे. जेपी आंदोलन आणि अण्णा आंदोलन या दोन्हींचा इतिहास हे स्पष्टपणे दाखवून देतो. दोघांनीही सामाजिक प्रश्न उपस्थित केले, ज्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण सामील होते, ज्यांच्यात आदर्शाची तीव्र भावना होती. तथापि, दोन्ही वेळेस केवळ सत्तेच्या लालसेने प्रेरित झालेल्या नेत्यांनी या आंदोलनांचा गैरफायदा घेतला.

स्वार्थी नेते जेपी आणि अण्णांच्या पाठीवर स्वार झाले. जेपी म्हणजे जयप्रकाश नारायण आणि अण्णा हजारे लगेचच त्यातून मागे पडले. त्यांच्या आधीही तो मुद्दा सोडून दिला गेला आणि बाजूला सारला गेला. सत्तालोभी घटकांनी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा गैरफायदा घेतला, तर मूळ मुद्दा तसाच न सुटलेला राहिला. अण्णा हजारे यांनी १५ वर्षांपूर्वी याच जंतरमंतरवर सुरू केलेल्या भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनाचे काय झाले? तेव्हापासून भ्रष्टाचारात काही बदल झाला आहे, असे आज कोणी म्हणू शकेल का? अण्णा आंदोलन निष्फळ ठरले, कारण समस्येच्या तपशिलाचे गांभीर्याने परीक्षण करून वास्तववादी तोडगा काढण्याऐवजी केवळ प्रसिद्धी, गदारोळ आणि आवेशावर लक्ष केंद्रित केले गेले, ज्याचा अनुभवी नेत्यांनी गैरफायदा घेतला.


तो मुद्दा आणि अण्णा आंदोलन दोन्ही पार्श्वभूमीवर ढकलले गेले. वांगचुक आणि त्यांच्या सहकाºयांना या अलीकडच्या इतिहासाची जाणीव नाही का? याचे उत्तर फक्त त्यांनाच माहीत आहे, पण हे निश्चित आहे की कोणत्याही सामाजिक-सांस्कृतिक मुद्द्याला पक्षपाताशी जोडल्यास त्याचे विकृतीकरण अटळ आहे. शिक्षणाच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण होणे हे तर अधिकच दुर्दैवी ठरेल, कारण त्यामुळे हजारो निरागस विद्यार्थ्यांचा साधा विश्वास भंग पावतो. मग, पुढची पिढी आशेने उभी राहीपर्यंत जवळजवळ एक संपूर्ण पिढी निराशेच्या गर्तेत लोटली जाते.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याला ‘सुरुवात’ म्हणणे हे राजकीय पक्षपातीपणाचा संकेत देण्यापलीकडे काहीही करत नाही. जर सीजेपीला राजकीय पक्षपातीपणा करायचा असेल, तर त्यांनी शिक्षणाचा साधन म्हणून वापर करू नये. जर सरकारला खरोखरच दर्जेदार आणि गैरव्यवहारमुक्त शिक्षणाची काळजी असेल, तर त्यांनी त्या चिथावणीखोर समर्थकांना निरोप दिला पाहिजे, जे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने केवळ सध्याच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढू इच्छितात.


जंतरमंतर येथे दूरदूरवरून आलेल्या आदर्शवादी विद्यार्थी आणि तरुणांसोबतच असेही काही जण होते जे चिथावणी देण्याच्या आणि पोलीस व प्रशासनाशी हेतुपुरस्सर संघर्ष करण्याच्या उद्देशाने आले होते. चिथावणी आणि संघर्षामुळे अनेकदा मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित होण्याचा धोका असतो. काही आंदोलकांची नेमकी हीच इच्छा असते. त्यांना केवळ प्रसिद्धी मिळवायची असते आणि सरकारला अस्थिर करायचे असते. असा उद्देश शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. खरे तर, केवळ वांगचुक आणि त्यांच्या सहकाºयांनीच नव्हे, तर सर्व जबाबदार नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, शिक्षणाचे क्षेत्र हे चिकित्सक विचारांचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. हा एक गंभीर मुद्दा आहे, जो सर्व नागरिकांवर अटळपणे परिणाम करतो. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील जागरूक नेत्यांनी शिक्षणाला राष्ट्रीय प्रश्न मानून त्याला संकुचित स्वार्थाच्या विळख्यातून वाचवले पाहिजे. अन्यथा हे राष्ट्राच्या सर्वात मौल्यवान संसाधनांपैकी एकाला भ्रष्ट करण्यासारखेच ठरेल. याचे परिणाम सर्वांसाठी हानिकारक असतील.

नामस्मरण आणि वारी


एक वेळ हरि उच्चारिता वाचे। जळतील पापे जन्मांतरची।। असे संत ज्ञानेश्वर एका अभंगात म्हणतात. केवळ एक वेळ का होईना, पण अंत:करणापासून मुखाने ‘हरि’ म्हटले, तरी जन्माजन्मांतरीचे क्लेश आणि पापे नष्ट होतात. आपल्या संत परंपरेत नामस्मरणाचे खूपच महत्त्व संतांनी विविध मार्गांनी सांगितले आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी तर नवविधा भक्तीतील नामस्मरण भक्तीवर दासबोधातून फार मोठी शिकवण दिलेली आहे. त्याचप्रमाणे नामस्मरण करण्यासाठी कोणतीही विशिष्ट वेळ, तयारी, अवस्था असण्याची गरज नाही हे वेळोवेळी मनाचे श्लोकातून सांगितले आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा असे ते म्हणतात. मुखी ग्रास घेता म्हणावे श्रीराम असेही रामदास स्वामी म्हणतात. एका श्लोकात ते म्हणतात की, मना सर्वदा रामनामी जिव्हावे, असे अनेक श्लोकातून राम, हरि यांच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. सर्वात सोपा आणि प्रबळ भक्तीचा मार्ग म्हणून नामस्मरणाला महत्त्व आहे.


संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठातील २६व्या अभंगात हेच विस्तृत सांगितले आहे. एक तत्त्व नाम दृढ धरी मना। हरिसी करुणा येईल तुझी॥ १॥ ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद। वाचेसी सद्‍गद जपे आधी॥ २॥ नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा। वाया आणिक पंथा जाशील झणी॥ ३॥ ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी। धरोनी श्रीहरी जपे सदा॥ ४॥ येथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, हरिचे नाम हेच तत्त्व आपल्या मनामध्ये बळकट धरा, म्हणजे एकट्या हरिनामाचे मनाने सारखे चिंतन करीत राहा, त्या योगाने हरिला तुझी दया येईल. राम कृष्ण गोविंद हे नाम सोपे आहे, म्हणून अगोदर ते प्रेमाने घे. हरिच्या नामाखेरीज जीवाला संसारातून सोडविण्यास दुसरे साधन नाही. तू दुस‍ºया साधनांकडे जाशील तर फसशील. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, मी मौन घेऊन अंत:करणामध्ये जपमाळ धरून निरंतर श्रीहरिचा जप करीत आहे.

तर पुढच्याच अभंगात ते म्हणतात की, सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी। रिकामा अर्धघडी राहू नको॥ १॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार। वायां येरझार हरिविण॥ २॥ नाममंत्र जप कोटी जाईल पाप। रामकृष्णी संकल्प धरूनी राहे॥ ३॥ निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी। इंद्रियांसवडी लपू नको॥ ४॥ तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा। शांति दया पाहुणा हरि करी॥ ५॥ किती अधिकारवाणीने ज्ञानेश्वरांनी येथे सांगितले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. साही शास्त्रांनी हरिच्या नामांत सर्व सुखमाधुर्य आहे असे निवडून ठरविले आहे. (देह हा सादर पाहावा निश्चित। सर्व सुख येथे नाम आहे) त्याचे नेहमी तू सेवन कर, अर्धा घटकादेखील रिकामा राहू नको. कारण देहादिक संसार आणि त्यातील व्यवहार सर्व खोटा आहे, म्हणून हरिला सोडून या संसाराच्या मोहांत राहशील तर तुझी जन्म-मरणाची येरझार व्यर्थ होईल. म्हणून हरिनाममंत्राचा तू निरंतर जप करीत जा, या योगाने तुझ्या अनंत पापांचा नाश होईल, याकरिता रामकृष्णनाम घेण्याविषयीचा निश्चय तू आपल्या मनाशी पक्का करून राहा. गुरूजवळ श्रवण, मनन व निदिध्यासनाचा अभ्यास करून तिन्ही देहांतून व तिन्ही गुणाहून वेगळा जो आत्मा तो मी आहे अशी वृत्ती उत्पन्न कर आणि त्या योगाने सर्व मायाजाळाचा नाश कर. इंद्रियांच्या तादात्म्यात लपून बसू नको. तीर्थव्रतांच्या ठिकाणी तू विश्वास ठेव व नेहमी दया बाळग; कारण जेथे शांती दया असतात, तेथे देवाची वस्ती असते, म्हणून तू आपल्या हृदयांत शांती दया ठेवून तेथे श्रीहरि वस्तीला येईल असे कर. आपल्यात संतपण निर्माण करणे, आपल्या हृदयमंदिरात परमेश्वराला स्थान देण्याचे अत्यंत सहजपणे ज्ञानदेव सांगतात. याचा पाया हा नामस्मरणाचा आहे. त्यामुळे हरिनाम संकीर्तन करीत एकेक पाऊल टाकीत वारी पंढरपुराच्या सीमेवर पोहोचते. तो आनंद सोहळा म्हणजे विठ्ठल मला भेटणार की, मी विठ्ठलाला भेटणार हेच समजत नाही इतका पवित्र भाव असतो.


प्रफुल्ल फडके/संतकृपा


Thursday, July 23, 2026

असहाय्य आणि असुरक्षित दिल्ली


कोक्रोच जनता पार्टीच्या कथित संसद मोर्चादरम्यान आंदोलकांनी केलेला हिंसाचार न दाखवता केवळ पोलिसांची कठोर कारवाई पाहणाºयांना वगळता सर्वांना दिसला. या संसद मोर्चादरम्यान हिंसाचार घडला, कारण जमाव अनियंत्रित होता आणि त्यात विद्यार्थी तसेच अराजकतावादी सामील होते. या घटकांना मनमानीपणे वागण्याची संधी मिळाली, कारण संसद मोर्चाचे नेतृत्व किंवा मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नव्हते. दिल्लीच्या रस्त्यांवर गोंधळ आणि हिंसाचार सुरू असताना, सीजेपीचे दोन नेते केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात व्यस्त होते.


हे निवेदन देण्यासाठी त्यांना चार तासांहून अधिक वेळ लागला. उर्वरित नेत्यांपैकी एक जण बर्गर खायला गेला, तर जे उपस्थित होते त्यांनी कोणत्याही परिस्थितीत जमावाला संसदेपर्यंत नेण्याचा निर्धार केला होता. ते जवळजवळ यशस्वी झाले होते, परंतु या सक्तीच्या प्रयत्नात मोठ्या संख्येने पोलीस आणि आंदोलक जखमी झाले. आंदोलनादरम्यान डझनभर वाहनांचे नुकसान झाले, यावरून हे दिसून येते की, जमावात हिंसाचार भडकवणारे आणि तयारी करून आलेले लोक होते. जेव्हा जमावात असे घटक उपस्थित असतात, तेव्हा हिंसाचार टाळणे अशक्य असते. दिल्लीत हेच घडले आहे. गेल्या सात वर्षांत तिसºयांदा हे घडले आहे. सीजेपीच्या संसद मोर्चादरम्यान पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला हे खरे असले तरी, जमावाने अराजकता माजवली आणि जोरदार दगडफेक केली हेही तितकेच खरे आहे. हे स्पष्ट आहे की, पोलीस जमावाचा आकार किंवा त्यांच्या हेतूंचा अंदाज लावू शकले नाहीत. २०१९-२० मधील शाहीन बाग धरणे आंदोलनादरम्यान आणि २०२१ मधील शेतकºयांच्या आंदोलनादरम्यान, विशेषत: प्रजासत्ताकदिनी काढलेल्या त्यांच्या ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी अशाच प्रकारच्या घटना घडल्या. या प्रत्येक वेळी बाहेरच्या शक्ती, दहशतवादी शक्ती, खलिस्थानी दहशतवादी असल्याचे दिसून आले. तशीच ताकद इथेही सोमवारी दिसली हे नाकारता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी सावध पवित्रा घेतला.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) शाहीन बागमध्ये एक मुख्य रस्ता अडवून जवळपास शंभर दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राजधानीत असताना या आंदोलनामुळे दिल्लीत मोठी दंगल उसळली. या दंगलीतील पहिला बळी कॉन्स्टेबल रतन लाल यांचा होता. आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्यासह ५०हून अधिक लोक मारले गेले. आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहीर हुसेन यांना अलीकडेच त्यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. याच ताहीरला माध्यमांच्या एका गटाकडून आणि इतर अनेकांकडून निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. २६ जानेवारी रोजी शेतकºयांच्या आंदोलनादरम्यान दिल्लीत कथित शेतकºयांनी ट्रॅक्टर रॅली काढली तेव्हाही अशीच प्रमाणपत्रे वाटण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या बेबंद ट्रॅक्टरस्वारांनी लाल किल्ल्यावर हल्ला चढवला. त्यावेळी जवळपास शंभर पोलिसांना मारहाण करण्यात आली. तरीही, मोदी सरकार, पोलीस आणि प्रशासनासह, त्या अनियंत्रित जमावापुढे हतबल दिसले.


म्हणूनच हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, शाहीन बाग येथील धरणे आंदोलन आणि शेतकरी आंदोलकांना हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काहीही केले नाही. न्यायालयाने जे काही केले, त्यामुळे समस्या अधिकच वाढली. शाहीन बाग येथील आंदोलकांशी वाटाघाटी करण्यासाठी न्यायालयाने एक समिती स्थापन केली. त्याचप्रमाणे, तीन कृषी कायद्यांची कायदेशीरता न तपासता त्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. यातून आंदोलकांना आणि त्यांच्या समर्थकांना असा संदेश गेला की, त्यांची भूमिका योग्य आहे, आणि त्यानंतर त्यांनी जवळपास एक वर्ष दिल्लीला ओलीस ठेवले. जेव्हा मजबूत मानल्या जाणाºया मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली, तेव्हाच ते परतले. यावेळी काय होईल हे सांगणे कठीण आहे, कारण सीजेपी समर्थक अजूनही जंतरमंतरवर जमलेले आहेत. त्याच वेळी, पंजाबच्या शेतकरी संघटनांना अचानक जाणवले की, अमेरिकेसोबतच्या संभाव्य व्यापार करारात त्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते, आणि त्यामुळे ते दिल्लीला जाण्यास उत्सुक झाले.

संसद अधिवेशन सुरू असताना, विरोधकांना नीट पेपरफुटी प्रकरणाव्यतिरिक्त इतर मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे. आता त्यांच्यासमोर एक नवीन मुद्दा आहे. सीजेपी संसद मोर्चादरम्यान झालेला हिंसाचार. विरोधकांना ही संधी मिळाली, कारण सरकारने सुरुवातीला जंतरमंतर येथील आंदोलनाकडे दुर्लक्ष केले होते आणि ज्या दिवशी संसद अधिवेशन सुरू होणार होते, त्या दिवशी त्यांना कॉक्रोज जनता पार्टीच्या नेत्यांशी बोलण्याची गरज आठवली. हे आधी का केले गेले नाही, आणि विशेषत: ज्या दिवशी लडाखमधील उपोषणकर्ते कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवून रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्या दिवशी तर का नाही चर्चा केली, असा प्रश्न आहे.


यात काही शंका नाही की, नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थी संतप्त झाले आणि कॉक्रोज जनता पार्टीला, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या एका अकारण टिप्पणीचा वापर करून, स्वत:ला एका राजकीय पक्षात रूपांतरित करण्याची संधी मिळाली, जरी ती उपाहासात्मक असली तरी. पण आता प्रत्येक जण या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार आहे. सरकार हे कसे हाताळते हे त्यांच्यावर अवलंबून आहे, पण यात काही शंका नाही की, ते पुन्हा एकदा परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात अपयशी ठरले. दिल्लीला याची किंमत मोजावी लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार जे काही करत आहे, ते जर आधीच केले असते, तर कदाचित दिल्ली संकट आणि अराजकतेच्या अवस्थेपर्यंत पोहोचली नसती. आज कॉक्रोज जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी मीडिया स्पेस घेतल्यामुळे इतर आंदोलनजीवी आणि विरोधक चिंताग्रस्त झालेले आहेत. आपल्यावरचा कॅमेरा हटल्यामुळे ते त्या आंदोलनात घुसून आपला पाठिंबा दर्शवत आहेत. यातून अराजकता वाढत आहे. त्यामुळे सरकारने आता कठोर पावले उचलून या आंदोलनजीवींना थांबवले पाहिजे.

संत मुक्ताबार्इंचे तत्त्वज्ञान


तुम्ही संत मायबाप। कृपेचे सागर।। असे संत मुक्ताबाई म्हणतात. संत हे जगाचे मायबाप आहेत. त्यांच्या मनात केवळ कृपेचा सागर असतो. संतांच्या संगतीत राहिल्याने मानवी जीवन धन्य होते. ही संतांची संगत आपल्याला वारीत दिसते. त्यालाच सत्संग असे म्हणतात. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक अत्यंत श्रेष्ठ, आदरणीय आणि ज्ञानी स्त्रीसंत होत्या. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या त्या धाकट्या बहीण होत्या. वयाने लहान असूनही त्यांचे आध्यात्मिक ज्ञान, विचार आणि प्रगल्भता अथांग होती. संत मुक्ताबार्इंचा जन्म १३व्या शतकात आपेगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यामुळे चौघा भावंडांनी अत्यंत खडतर आणि उपेक्षापूर्ण परिस्थितीचा सामना केला. वयाने सर्वात लहान असूनही मुक्ताबार्इंनी आपल्या भावांची (विशेषत: ज्ञानेश्वर महाराजांची) मातेच्या ममतेने काळजी घेतली आणि त्यांना कठीण प्रसंगात आध्यात्मिक धीर दिला.


१४०० वर्षे जगलेल्या आणि तपस्वी असलेल्या चांगदेव महाराजांचे गर्वहरण करून त्यांना आत्मज्ञानाची अनुभूती मुक्ताबार्इंनीच दिली. चांगदेवांनी मुक्ताबार्इंना आपले गुरू मानले. मुक्ताबार्इंचे अभंग आणि ‘ताटीचे अभंग’ हे खूप मार्गदर्शक असे आहेत. संत मुक्ताबार्इंचे अभंग सोपे, सरळ परंतु गूढ आध्यात्मिक अर्थ आणि व्यावहारिक विवेक सांगणारे आहेत. ज्या वेळी समाजाने केलेल्या छळाला कंटाळून संत ज्ञानेश्वर महाराज दु:खी होऊन झोपडीचे दार (ताटी) बंद करून आत बसले होते, तेव्हा मुक्ताबार्इंनी ताटीबाहेर उभे राहून त्यांची आळवणी केली. या प्रसंगी रचलेल्या अभंगांना ‘ताटीचे अभंग’ म्हणतात.

यातील अभंगात मुक्ताबाई म्हणतात, संत जेणे व्हावे। जग जगबोली सहवे।। म्हणजे ज्याला संत व्हायचे आहे, त्याने जगाचे बोल आणि अपमान सहन केले पाहिजेत. त्या म्हणतात, योगी पावन मनाचा। साहे अपराध जनाचा।। म्हणजे खरा योगी तोच, ज्याचे मन पवित्र आहे आणि जो लोकांचे अपराध पोटात घालतो आणि माफ करतो. ज्ञानदेवांना मुक्ताबाई विनवतात, ताटी उघडा ज्ञानेश्वरा..., हे ज्ञानेश्वरा, दाराची ताटी उघडा आणि जगाच्या कल्याणासाठी बाहेर या. यातील जगाच्या कल्याणाचा विचार हा फार महत्त्वाचा आहे.


त्यांनी अद्वैत ज्ञान, भक्ती आणि सद्गुरूंचे महत्त्व यांवर अनेक कूट अभंग म्हणजे गूढ अर्थ असलेले अभंग आणि विराण्या रचल्या आहेत. ‘मुंगी उडाली आकाशी, तिणे गिळिले सूर्याशी' यांसारख्या कूट अभंगांतून त्यांनी कठीण आध्यात्मिक संकल्पना सहजतेने मांडल्या आहेत. मुक्ताबार्इंच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा म्हणजे सहनशीलता हा आहे. समाजाने कितीही त्रास दिला, तरी संतांनी रागावू नये; उलट जगाला प्रेमाने आणि ज्ञानाने जवळ करावे. मुक्ताबार्इंच्या विचारानुसार, ईश्वर हा वेगळा नसून तो प्रत्येकाच्या आत्म्यात वास करतो. जात, पात, वय किंवा लिंग या गोष्टी आत्मज्ञानाच्या मार्गात अडथळा ठरत नाहीत, हा विचार त्यांनी आपल्या वर्तनातून सिद्ध केला. वयाने लहान असूनही त्यांचे विचार अत्यंत प्रौढ आणि विवेकवादी होते. संन्यासाचा अतिरेक किंवा जगाचा त्याग करण्यापेक्षा जगात राहून निष्काम वृत्तीने कार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत होते. १३व्या शतकात स्त्रियांना धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात अधिकार नसताना मुक्ताबार्इंनी आपल्या अथांग ज्ञानाच्या बळावर वारकरी संप्रदायात आणि संपूर्ण समाजात आदराचे स्थान मिळवले. म्हणूनच संत मुक्ताबाई केवळ एक संत नव्हत्या, तर त्या ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची मूर्ती होत्या. त्यांनी रचलेले ‘ताटीचे अभंग’ आजही मानवी मनाला शांतता, संयम आणि क्षमाशीलतेचा मार्ग दाखवतात. तापी नदीच्या तीरावर तापी-प्रकाशा संगमाजवळ मुक्ताईनगर (कोथळी) येथे त्यांनी ऐहिक जगाचा त्याग केला. त्या काळात स्त्रियांच्या हक्कासाठी आणि आजच्या भाषेत सांगायचे तर जेंडर इक्विटीसाठी लढणाºया त्या समाजसुधारक अशा संत होत्या. वारकरी संप्रदाय हा समाजसुधारकांचा संप्रदाय आहे. वारीत समानतेची शिकवण दिलेली आहे. त्यात मुक्ताबार्इंचे तत्त्वज्ञान फार मोठे आहे.

प्रफुल्ल फडके/ संतकृपा



Wednesday, July 22, 2026

तीन महिन्यात संसदेचे चित्र बदलले


नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा राजकीय धक्का बसला. २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकलेल्या भाजपची संख्या २०२४ मध्ये २४० पर्यंत घसरली, आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत पहिल्यांदाच एक विधेयक नामंजूर झाल्याने त्यांना मानहानीला सामोरे जावे लागले. लोकसभेत ५४ मतांच्या फरकाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झाले होते, पण आता संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याने परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. २०२४ मधील आपल्या दमदार निवडणूक कामगिरीमुळे उत्साहित झालेल्या विरोधी आघाडीला अधूनमधून अंतर्गत संकटांचा सामना करावा लागला, परंतु मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर करून मोदी सरकारला मोठा धक्का दिल्याने त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपर्यंत विरोधकांना बळ मिळाले होते, परंतु निकालांनी राष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप आणि सूर झपाट्याने बदलून टाकला. भाजपने बंगालमध्ये सत्ता मिळवून अशक्यप्राय गोष्ट साध्य केली असली तरी, त्यानंतर विरोधकांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत आणि हे धक्के कधी व कुठे थांबतील याची कोणतीही निश्चिती नाही.


एक आघाडी म्हणून, केरळ निवडणुकीच्या निकालांमध्ये एलडीएफकडून यूडीएफकडे सत्ता हस्तांतरित झाल्याने विरोधी पक्षांना दिलासा मिळू शकतो. तथापि, तामिळनाडूतील पराभवानंतर झपाट्याने बदलणाºया समीकरणांमध्ये, डीएमकेचे विरोधी आघाडीतून बाहेर पडणे हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का आहे आणि भाजपसाठी ही एक आनंदाची बाब आहे. बंगालमध्ये भाजपला विजयाचा विश्वास असला तरी, बहुतेक लोकांना ममता बॅनर्जींच्या पराभवाची अपेक्षा नव्हती. तथापि, निकालांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले. सत्तेतून बाहेर पडल्यावर प्रत्येकाला कधी ना कधी पराभवाला सामोरे जावे लागते, परंतु तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत विघटन अनपेक्षित आहे. या विघटनाने राष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप आणि सूर बदलण्यातही भूमिका बजावली. ममता बॅनर्जींनी ज्या प्रकारे काँग्रेसपासून वेगळी स्वत:ची तृणमूल काँग्रेस स्थापन करून साडेतीन दशके जुने डाव्या आघाडीचे सरकार उलथवून टाकले, ते त्यांच्या राजकीय चातुर्याचे आणि लढाऊ वृत्तीचे प्रतीक आहे. जेव्हा अशा नेत्याच्या खासदारांनी आणि आमदारांनी सत्ता गमावताच पळापळ केली, तेव्हा अनेक दशकांनंतर तमिळ राजकारणात तिसºया पक्षाच्या उदयाने चकित झालेल्या द्रमुक पक्षात, आणि आधीच फूट पडलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला हा बदल आश्चर्यकारक वाटू नये.

तृणमूलच्या ८० आमदारांपैकी ६० आणि २८ लोकसभा सदस्यांपैकी २० जणांचे बंड बरेच काही सांगून जाते. बंगालमधील राजकीय वातावरण आणि तृणमूलमधील अंतर्गत फूट पाहता, ममता बॅनर्जी यांचे सत्तेत परत येणे अशक्य वाटते. शिवाय, लोकसभा निवडणुका अवघ्या अडीच वर्षांवर आणि विधानसभा निवडणुका पाच वर्षांवर आहेत. इतका काळ रस्त्यावर राहिल्याने पुढील निवडणूक जिंकणे कठीण होईल, तर पक्ष बदलल्यास सत्तेचे सुख मिळण्याची शक्यता आहे. भाजपने तृणमूल काँग्रेस सोडलेल्या तीन राज्यसभा सदस्यांना आधीच पोटनिवडणुकीचे तिकीट दिले आहे. चौथ्या सदस्यालाही संधी मिळण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते बनूनही, स्वत:ला खरी तृणमूल काँग्रेस म्हणवणाºया ६० बंडखोर आमदारांचे नेते ऋतब्रता बॅनर्जी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तथापि, फारसा परिचित नसलेल्या प्रादेशिक पक्ष, राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षात सामील झालेल्या २० खासदारांपैकी एक-दोन जणांना मोदी मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलात संधी मिळू शकते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील दुसºया बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले सहा लोकसभा सदस्य सत्तेवर येतील की नाही, हे निश्चित नसले तरी, त्यांची जवळीक मात्र निश्चित आहे.


ज्या राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाकडे एकही खासदार किंवा आमदार नव्हता, त्या पक्षाला अचानक २० लोकसभा सदस्य मिळाले, आणि ज्या शिवसेनेचे सात लोकसभा सदस्य होते, त्यांची संख्या रातोरात १३ झाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ लोकसभा सदस्य एनडीएच्या संख्याबळात केव्हा आणि कोणत्या मार्गाने भर घालतील, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आधी विलीन होऊन नंतर एनडीएचा भाग व्हावे, अशी भाजपची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सध्या एनडीएमध्ये आहे. अजित यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणूनही कार्यरत आहेत. विमान अपघातात अजितदादा यांच्या मृत्यूपूर्वीही दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. आता, सुनेत्राताई आणि त्यांचे राज्यसभा सदस्य पुत्र पार्थ यांना भीती आहे की, विलीनीकरणानंतर ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय ताकदीपुढे टिकू शकणार नाहीत, परंतु त्यांचे बहुतेक आमदार विलीनीकरणाच्या बाजूने आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि गेल्या संसद अधिवेशनात मोदी सरकारला पराभूत करताना एकजूट आणि आक्रमक दिसलेले विरोधी पक्ष आता एकता आणि बचावाच्या दोन्ही संकटांचा सामना करत आहेत.

देशाच्या राजकीय पटलावर, विशेषत: संसदेत झालेला हा बदल केवळ तीन महिन्यांत घडला आहे. आणखी एक मोठा बदल म्हणजे, २२ लोकसभा सदस्य असलेल्या द्रमुक पक्षाने विरोधी पक्षांपासून वेगळे बसण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा सदस्यांचे शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरण करण्यास मान्यता दिल्याने, लोकसभेच्या संख्याबळात लक्षणीय बदल झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या विरोधात बंड करून राष्ट्रवादी पक्षात सामील झालेल्या २० खासदारांनाही स्वतंत्र संसदीय मान्यता देण्यात आली आहे. मागील अधिवेशनात विधेयक अयशस्वी झाल्याचा बदला घेण्यासाठी आणि विरोधी पक्षाला धडा शिकवण्यासाठी हे एक धोरण आहे, हे ओळखणे कठीण नाही.


जरी परिसीमन विधेयक पावसाळी अधिवेशनाच्या घोषित अजेंड्यावर नसले तरी, ते मंजूर करण्यासाठी पुन्हा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ३७ खासदार असलेल्या समाजवादी पक्षाला आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न आतापर्यंत यशस्वी झालेले दिसत नाहीत, परंतु सरकार दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याच्या निश्चितच जवळ पोहोचले आहे. तटस्थ राहणे आणि सभात्याग यांसारख्या पर्यायांमधून सभागृहात बहुमत मिळवण्याचा हा उद्देश आहे. सीमांकन विधेयकाविरोधात दक्षिण भारतीय राज्यांना संघटित करणारे डीएमके प्रमुख एम.के. स्टॅलिन, आता सर्व राज्यांमध्ये जागांमध्ये ५० टक्के वाढीची तरतूद असलेल्या या विधेयकाचे तितकेसे प्रखर विरोधक राहिलेले दिसत नाहीत. दुधाने तोंड भाजलेला माणूस ताक सावधगिरीने पितो. त्यामुळे, दोन-तृतीयांश बहुमताची खात्री झाल्याशिवाय मोदी सरकार सीमांकन विधेयक संसदेत परत आणणार नाही, पण त्यांनी निश्चितपणे विरोधी पक्षाला बचावात्मक पवित्र्यात आणले आहे.

हरिपाठ आणि नामस्मरणाची किमया


जाणोनी नेणते करी हे मन। हरिपाटी दोन प्रहर उभा।। असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आपले मन कितीही चंचल किंवा हुशार असले, तरी देवासमोर ते लहान मुलासारखे ‘नेणते’ करावे आणि हरिपाठात स्वत:ला झोकून द्यावे. किती निरागसपणे हे सांगितले आहे. हा भावच अत्यंत निर्मळ वाटणारा आहे.


हरिपाठात ज्ञानेश्वर म्हणतात की, सात पाच तीन दशकांचा मेळा। एक तत्त्वी कळा दावी हरि॥ १॥ तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ। तेथे काही कष्ट न लागती॥ २॥ अजपा जपणे उलट प्राणाचा। येथेही मनाचा निर्धार असे॥ ३॥ ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ। रामकृष्णी पंथ क्रमियेला॥ ४॥ म्हणजे ज्ञानेश्वर सांगतात की, हा संसार कोणी सात तत्त्वामक आहे, कोणी पाच तत्त्वात्मक आहे, कोणी तीन तत्त्वात्मक आहे, तर कोणी दहा तत्त्वात्मक आहे असे मानतात. सात अधिक पाच अधिक तीन अधिक दहा मिळून पंचवीस तत्त्वात्मक संसार मानतात. ही सर्व तत्त्वेही हरि आपल्या एका चैतन्य तत्त्वावर दाखवतो. असा तत्त्वविचार करण्यापैकी हरिचे नाम नाही. ते सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. ते घेण्याला काही कष्ट पडत नाहीत. रात्री व दिवसा मिळून एकवीस हजार सहाशे वेळा सोहं सोहं असा आपले हृदयात प्राणाच्या वरती जाण्यात आणि अपानाच्या खाली जाण्यात होणा‍ºया उभयतांचे भेटीत सहज जप होत असतो, त्यास अजपाजप म्हणतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, हरिच्या नामस्मरणावाचून जगणे मला व्यर्थ वाटते, म्हणून मी रामकृष्णाच्या भजनमार्गाचे क्रमण केले आहे, म्हणजे निरंतर हरिचे भजन करीत आहे.

जप तप कर्म क्रिया नेम धर्म। सर्वांघटी राम भाव शुद्ध॥ १॥ न सोडी हा भावो टाकी रे संदेहो। रामकृष्ण टाहो नित्य फोडी॥ २॥ जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात। भज का त्वरित भावनायुक्त॥ ३॥ ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी। वैकुंठभुवनी घर केले॥ ४॥ या अभंगातून संत ज्ञानेश्वर म्हणतात की, जपतपादी कर्मे व अनेक नियमधर्म ज्या भावनेने करतो त्या भावनेपेक्षा सर्व देहामध्ये एक आत्मारामालाच पाहणे ही भावना शुद्ध आहे. जप, तप, कर्म, क्रिया, नेम धर्म इत्यादी साधने सर्व भूतांचे ठिकाणी अभिन्नत्वेकरून परमात्मरूपाला पाहणे, या शुद्ध भावनेच्या पायावर उभारली गेली पाहिजेत. म्हणून अशा शुद्ध भावाचा त्याग करू नको. या भावामध्ये बिघाड आणणा‍ºया सर्व संशयास फेकून दे आणि रामकृष्ण नामाचा सारखा टाहो फोडीत राहा. अशा प्रकारचा शुद्ध भाव त्या साधनादिकेकरून साध्य आहे, तरी त्या साधनानुष्ठानाचे भरात या साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये. सर्व संशय टाकून हा शुद्ध भाव वृद्धिंगत होण्याकरिता जीवाने रामकृष्णाचा निरंतर टाहो फोडला पाहिजे. जातीच्या, पैशाच्या, गोताच्या, कुळस्वभावादी गोष्टीच्या भानगडीत पडू नको. शुद्ध भावनेने युक्त होऊन त्वरेने हरिला जप. या शुद्ध भावनेने त्वरित युक्त होऊन जातीला, पैशाला व कुळगोत्रजाना तू भज, म्हणजे जातीस, गोतास, कुळशीलास योग्य अशी कर्में कर व द्रव्यार्जन, संगोपनादी व्यवहार मोठ्या दक्षतेने कर म्हणजे अशा करण्याने प्रापंचिक बाधा होणार नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, माझ्या ध्यानात मनात नेहमी रामकृष्णाची वस्ती आहे, त्यामुळे वैकुंठलोकी माझे घर झाले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, आमचे घर वैकुंठभुवनांत झाले आहे, म्हणजे वैकुंठरूप हरिचे ठिकाणी आमची वस्ती झाली आहे.


त्यानंतर संत ज्ञानेश्वर सांगतात की, जाणीव नेणीव भगवंती नाही। हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा॥ १॥ नारायण हरि उच्चार नामाचा। तेथे कळिकाळाचा रीघ नाही॥ २॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी। ते जीवजंतूंसी केवी कळे॥ ३॥ ज्ञानदेव फळ नारायण पाठ। सर्वत्र वैकुंठ केले असे॥ ४॥ म्हणजे, भक्त ज्ञानी आहे किंवा अज्ञानी आहे हे भगवंत पाहत नाहीत, तर त्यांच्या नामस्मरणाने दोघांनाही सारखीच मुक्ती मिळते. नारायणहरि या नामाचा उच्चार करणाºयाकडे कळीकाळाचा प्रवेश होत नाही. हरिच्या यथार्थस्वरूपाचा विचार वेदांनाही कळत नाही. मग ते स्वरूप सामान्य जीवांना कसे जळेल? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, हरिच्या नामस्मरणाने सर्व मृत्युलोक वैकुंठ केल्याचे फळ मला मिळाले आहे. नामस्मरण, नामजपाची सर्वोच्च ताकद येथे दिसून येते.

प्रफुल्ल फडके/संतकृपा



Tuesday, July 21, 2026

संत सोपानदेव यांचे विचार


सदा सर्वकाळ नाम विठ्ठलाचे। तेणे सुखाचे भरते आले।। असे संत सोपानदेव म्हणतात. म्हणजे जो सर्वकाळ विठ्ठलाच्या नामात मग्न असतो, त्याच्या आयुष्यात सुखाची मोठी भरती येते. संत सोपानदेव जे संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचे बंधू होते. संत सोपानदेव हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होते. त्यांनी अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत अध्यात्म बहुजन समाजापर्यंत पोहोचवले. त्यांच्या अभंगांमध्ये अद्वैत भक्ती, आत्मज्ञान आणि गुरुकृपेचे महत्त्व प्रामुख्याने दिसून येते. त्यांची समाधी सासवड (पुणे) येथे कºहा नदीच्या तीरावर आहे.


संत सोपानदेवांचे अभंग हे मुख्यत्वे ‘सोपान म्हणे’ या नाममुद्रेने संपतात. सोपान म्हणे होय अंतरीं प्रकाश... हा त्यांचा अभंग अलौकिक असा आहे. सोपान म्हणे होय अंतरीं प्रकाश। जंव या सद्गुरूचा लाभ झाला॥ भवभय वाया गेले लयासी। जंव देखिलें तयासी आत्मरूपीं॥ म्हणजे या अभंगात संत सोपानदेव गुरुकृपेचे आणि सद्गुरूंच्या महत्त्वाचे वर्णन करतात. ते म्हणतात की, जेव्हा जीवनात खºया सद्गुरूंचा लाभ होतो, तेव्हा अंत:करणात ज्ञानाचा प्रकाश पडतो. सदु९रीच्या दर्शनाने आणि त्यांनी दिलेल्या आत्मज्ञानामुळे मनातील संसाराचे भय (जन्म-मरणाची भीती) पूर्णपणे लयाला जाते आणि स्वत:मध्येच परमात्म्याचे रूप दिसू लागते.

आणखी एका अभंगात ते म्हणतात, आम्ही दळूं हरिकथा ओव्या गाऊं गीता। चित्त ठेवूनियां हरीच्या चरणांवरता॥ इथे ते सांगतात की, हा अभंग घरगुती आणि रोजच्या कामाच्या (उदा. जाते दळणे) माध्यमातून भक्ती कशी करावी हे शिकवतो. सोपानदेव म्हणतात की, आम्ही आमचे दैनंदिन काम करत असताना देवाच्या कथांचे चिंतन करतो आणि भगवद्गीतेसारख्या पवित्र ग्रंथातील ओव्या गातो. शरीर कामात व्यस्त असले तरी आमचे चित्त (मन) मात्र सदैव हरीच्या (देवाच्या) चरणांवर स्थिरावलेले असते. म्हणजेच कर्म करत असतानाही नामस्मरण चालू ठेवणे हीच खरी भक्ती आहे. वारकरी संप्रदायातील सर्वांनीच नामस्मरणाचे महत्त्व आपापल्या शैलीत सांगितले आहे तसे हे सोपानदेवांनी सांगितले आहे.


सोपान म्हणे विठ्ठल हाची आत्मा। दुसरा नाहीं जगीं कोणी आम्हां॥ असे म्हणून संत सोपानदेवांची भक्ती ही केवळ सगुण मूतीर्पुरती मर्यादित नव्हती, तर ती अद्वैत विचारांवर आधारित होती. ते सांगतात की, हा जो विठ्ठल आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा स्वत:चा 'आत्मा' आहे. संपूर्ण जगात विठ्ठलाव्यतिरिक्त (किंवा त्या आत्मतत्वाव्यतिरिक्त) आमचे दुसरे कोणीही नाही. सर्व चराचरात एकच परमेश्वर भरून राहिला आहे, हाच या अभंगाचा मुख्य संदेश आहे. ज्ञानेश्वरांप्रमाणेच सोपानदेवांनीही आपल्या मोठ्या बंधूंना (संत निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर) गुरू मानून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. साध्या आणि सरळ मराठी भाषेत गूढ आध्यात्मिक तत्त्वज्ञान मांडणे हे त्यांच्या रचनेचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या अभंगांमधून एक प्रकारची शांतता आणि संसाराविषयीची विरक्ती प्रकषार्ने जाणवते. संत सोपानदेवांच्या अभंगांचे वाचन आणि निरूपण ऐकल्याने माणसाच्या मनातील संभ्रम दूर होऊन आत्मिक शांतता लाभते.

संत सोपानदेवांचा आणखी एक अतिशय सुंदर आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा अभंग आहे. "सुखाचा सागर विठ्ठल गा बापा। हरीनाम जपतां न बाधी पापु॥"विठ्ठल हे सुखाचे माहेरघर आहे. संत सोपानदेव या अभंगात सांगतात की, विठ्ठल (परमेश्वर) हा केवळ सुख देणारा नाही, तर तो स्वत: "सुखाचा सागर" आहे. संसारातील सुखे ही क्षणभंगुर आणि मर्यादित असतात, पण विठ्ठलाच्या भक्तीतून मिळणारे सुख हे अथांग सागरासारखे अनंत आणि कधीही न संपणारे आहे.ते पुढे म्हणतात की, जो माणूस विठ्ठलाचे किंवा हरीचे नाव सतत जपत राहतो, त्याला कोणत्याही प्रकारच्या पापाची बाधा होत नाही. नामस्मरणामुळे माणसाचे अंत:करण शुद्ध होते आणि त्याच्या हातून घडलेली वाईट कर्मे किंवा वासना नष्ट होतात. सदगुरूंच्या कृपेने जेव्हा हरिनामाची गोडी लागते, तेव्हा माणसाला संसारातील दु:खाची झळ सोसावी लागत नाही. कर्म करत असतानाही देवाचे नाव मुखात असणे, हीच खरी आणि सोपी भक्ती आहे, हेच सोपानदेवांना या अभंगातून अधोरेखित करायचे आहे.


प्रफुल्ल फडके/ संतकृपा


सुशासनाची नवी क्रांती सुरु केली पाहिजे


भारताची ओळख केवळ त्याची प्राचीन संस्कृती, सांस्कृतिक वारसा आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञानानेच नव्हे, तर लाखो लोकांच्या श्रद्धा, विश्वास आणि जीवनाचा आधार असलेल्या मंदिरांनीही परिभाषित होते. अयोध्येतील श्रीराम मंदिर, बद्रीनाथ धाम, माता वैष्णोदेवी, तिरुपती, काशी विश्वनाथ, सोमनाथ, सालासर बालाजी आणि खाटू श्यामजी यांसारखी मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नसून भारतीय आत्म्याची जिवंत प्रतीके आहेत. लाखो भक्त दररोज या मंदिरांना या विश्वासाने भेट देतात की, त्यांना केवळ देवाचे दर्शनच नव्हे, तर आध्यात्मिक शांती आणि नैतिक ऊर्जाही मिळेल. परंतु जेव्हा याच मंदिरांमधून अर्पण केलेल्या वस्तूंची चोरी, आर्थिक अनियमितता, व्हीआयपी संस्कृती, पुजारी किंवा कर्मचाºयांचे अयोग्य वर्तन आणि भक्तांना मिळणारी वाईट वागणूक यांचे अहवाल समोर येतात, तेव्हा ते केवळ एका संस्थेची बदनामीच करत नाहीत, तर लाखो लोकांच्या श्रद्धेलाही धक्का पोहोचवते. अलीकडेच श्रीराम मंदिर, बद्रीनाथ मंदिर आणि आता माता वैष्णोदेवी मंदिरातील अर्पणांशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी हे स्पष्ट केले आहे की, मंदिर व्यवस्थापन केवळ धार्मिक भावनेच्या भरवशावर सोपवता येणार नाही. भक्त देवाला अर्पण म्हणून जो पैसा देतात, ती कोणत्याही व्यक्तीची किंवा गटाची खासगी मालमत्ता नाही. त्या पैशांतील प्रत्येक रुपया हा सार्वजनिक विश्वासाचा खजिना आहे. जर अपारदर्शकता किंवा चोरीचा संशय निर्माण झाला, तर तो केवळ एक आर्थिक गुन्हा नसून धार्मिक श्रद्धेचा विश्वासघात आहे.


मंदिरांमधील वाढत्या गोंधळाचा आणखी एक गंभीर पैलू म्हणजे व्हीआयपी दर्शनाची संस्कृती. आज देशातील सामान्य भक्त तासन्तास रांगेत उभे राहतात. वृद्ध, महिला, दिव्यांग आणि लहान मुलांसोबतची कुटुंबे कठीण परिस्थितीत आपल्या पाळीची वाट पाहतात. पण जसा एखादा मंत्री, आमदार, अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्ती येते, तसे सामान्य दर्शन थांबवले जाते आणि व्हीआयपी दर्शन सुरू होते. सामान्य भक्तांची रांग थांबवली जाते, त्यांच्या दर्शनाची वेळ विस्कळीत होते आणि त्यांना याची जाणीव करून दिली जाते की, देवाच्या दरबारातही सर्व जण समान नसतात. ही परिस्थिती भारतीय संस्कृती आणि धर्माच्या मूळ भावनेच्या विरुद्ध आहे. आपले धर्मग्रंथ सांगतात की, देवापुढे राजा आणि भिकारी यांच्यात कोणताही भेद नाही. मंदिरांमध्येही सामाजिक आणि राजकीय विशेषाधिकार प्रदर्शित होत असतील, तर तो धर्माच्या मूलभूत स्वरूपाचा अपमान आहे. मंदिरे ही लोकशाही समानता आणि आध्यात्मिक सुसंवादाचे सर्वोच्च उदाहरण असायला हवीत, सामाजिक विषमतेचे व्यासपीठ नव्हे.

आजची गरज आहे ती देशभरात एकसमान मंदिर दर्शन धोरण लागू करण्याची. राष्ट्रीय सुरक्षा किंवा अपवादात्मक घटनात्मक परिस्थिती वगळता, कोणत्याही व्यक्तीला सामान्य भक्तांच्या रांगेबाहेर विशेष दर्शनाची सवलत दिली जाऊ नये. कोणत्याही कारणास्तव सुरक्षा उपाययोजना आवश्यक असल्या तरी, सामान्य भक्तांच्या दर्शनात अडथळा आणला जाऊ नये. देवाच्या दरबारातील सर्वोच्च व्हीआयपी तो असावा ज्याच्याकडे भक्ती आहे, पद किंवा सत्ता नव्हे. त्याचप्रमाणे, मंदिर देणगी पद्धतीत व्यापक सुधारणांची गरज आहे. आज डिजिटल इंडियाचे युग आहे, तरीही अनेक मंदिरांनी देणग्या आणि अर्पणांसाठी पारदर्शक प्रणाली विकसित केलेली नाही. प्रत्येक प्रमुख मंदिरात दानपेट्यांवर इलेक्ट्रॉनिक देखरेख, सीसीटीव्ही कॅमेरे, बारकोडआधारित सीलिंग, नियमित स्वतंत्र लेखापरीक्षण आणि वेबसाइट व सूचना फलकावर उपलब्ध असलेले मासिक उत्पन्न आणि खचार्चे सार्वजनिक विवरण असावे. आपला पैसा कुठे आणि कोणत्या उद्देशासाठी वापरला जात आहे, हे जाणून घेण्याचा भक्तांना हक्क आहे. याशिवाय, मंदिर प्रशासनात केवळ धार्मिक ओळखीला नव्हे, तर चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि प्रशासकीय कार्यक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. मंदिर व्यवस्थापन समित्यांमध्ये निष्कलंक सामाजिक प्रतिष्ठा, पारदर्शक सार्वजनिक जीवन आणि कोणताही भ्रष्टाचार किंवा गुन्हेगारी आरोप नसलेल्या व्यक्तींची नियुक्ती केली पाहिजे. त्यांच्या कामाचे वेळोवेळी स्वतंत्रपणे मूल्यांकन केले पाहिजे. मंदिर व्यवस्थापन हा विशेषाधिकार नसून समाजाप्रति असलेली जबाबदारी आहे. मंदिरात सेवा देणारे पुजारी, कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठी एक आचारसंहिता देखील स्थापित केली पाहिजे. भक्तांशी गैरवर्तन, अपमानास्पद भाषा, दलालांशी संगनमत, अमली पदार्थांचे सेवन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या बेशिस्त वर्तनाची घटना आढळल्यास तत्काळ कारवाई केली पाहिजे. सालासर बालाजी येथे बाऊन्सर्सकडून एका भक्ताला झालेली मारहाण आणि खाटू श्यामजी येथील मुख्य पुजाºयाशी संबंधित वाद यांसारख्या घटनांवरून हे दिसून येते की, केवळ धार्मिक ओळख पुरेशी नाही; नैतिक शिस्तही तितकीच आवश्यक आहे. मंदिरांमधील दलालांची संस्कृतीही समूळ नष्ट केली पाहिजे. दर्शन, प्रसाद, पूजा आणि विशेष विधींच्या नावाखाली होणारी अनधिकृत पैशांची वसुली भक्तांच्या श्रद्धेला कमी करते. सर्व सेवांचे दर सार्वजनिक केले पाहिजेत, आॅनलाइन बुकिंग उपलब्ध करून दिले पाहिजे आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्कावर कठोर दंड आकारला पाहिजे. यासाठी तरतूद असायला हवी. आज भारत जगाचे आध्यात्मिक केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. श्रीराम मंदिराच्या बांधकामानंतर जगभरातील लाखो लोक भारतीय मंदिरांकडे आकर्षित होत आहेत. धार्मिक पर्यटन हा देखील भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनत आहे. अशा वेळी, जर मंदिर व्यवस्थेवर भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि गैरकारभाराचे आरोप झाले, तर त्याचा परिणाम केवळ मंदिरांवरच नाही, तर संपूर्ण भारताच्या प्रतिमेवर होतो. जगाला असा संदेश मिळतो की, ज्या देशाने धर्म आणि नीतिमत्तेचा उपदेश केला, तो देश आपली धार्मिक स्थळे पारदर्शक बनवण्यात अपयशी ठरला आहे आणि तिथेही भ्रष्टाचार बोकाळला आहे.


भारत सरकारने आणि राज्य सरकारांनी आता या विषयावर एक व्यापक राष्ट्रीय धोरण तयार केले पाहिजे. प्रमुख मंदिरांमधील आर्थिक पारदर्शकता, प्रशासकीय उत्तरदायित्व, दर्शनाची व्यवस्था आणि भक्तांच्या हक्कांवर देखरेख ठेवण्यासाठी 'राष्ट्रीय मंदिर सुशासन आयोग' सारखी एक स्वतंत्र संस्था स्थापन केली जाऊ शकते. प्रत्येक मंदिरासाठी सेवेचे मानक निश्चित केले पाहिजेत आणि वेळेवर तक्रार निवारण प्रणाली स्थापित केली पाहिजे. धार्मिक संघटना आणि संत समुदायानेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. धर्म म्हणजे केवळ उपासना नव्हे, तर सत्य, प्रामाणिकपणा, सेवा आणि जबाबदारी यांचाही समावेश होतो. जर मंदिरांमधील या मूल्यांचा ºहास झाला, तर समाजाला नैतिक दिशा कोण देणार? मंदिरे केवळ उपासनेची केंद्रे न राहता, चारित्र्य घडवणाºया शाळाही असायला हव्यात.

घुसखोरांवर कठोर कारवाई आवश्यक


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बºयाच काळापासून घुसखोरांविरोधात कठोर भूमिका घेत आहेत. त्यांनी सातत्याने त्यांना ओळखून देशातून हद्दपार करण्याची बाजू मांडली आहे. पंतप्रधानांनीही वेळोवेळी घुसखोरीचा उल्लेख केला आहे. विरोधी पक्षांनी अनेकदा असा युक्तिवाद केला आहे की, गृहमंत्री आणि पंतप्रधान सीमावर्ती राज्यांमध्ये, विशेषत: बंगालमध्ये, निवडणुकीच्या फायद्यासाठी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करतात. तथापि, आता निवडणुका पार पडल्यानंतरही, जर त्यांनी घुसखोरीविरोधातील आपली मोहीम सुरू ठेवली, तर यावरून असे दिसून येते की ते या मुद्द्याबाबत गंभीर आहेत आणि तो सोडवला जावा अशी त्यांची इच्छा आहे.


सीमावर्ती भागांतील लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी पंतप्रधानांनी एका समितीची नियुक्ती केल्याने याला दुजोरा मिळतो. गृहमंत्री या समितीसोबत दोनदा भेटले आहेत. याव्यतिरिक्त, ते बंगाल, ईशान्य आणि इतर सीमावर्ती राज्यांमधील घुसखोरी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. यासंदर्भात, बंगालमधील बांगलादेशसोबतच्या सीमेवर कुंपण घालण्याच्या कामाला गती मिळाली आहे.

घुसखोरीविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान, अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका अशा नेटवर्कच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत, जे ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्थांच्या माध्यमातून परदेशातून देणग्या स्वीकारून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना देशात बेकायदा आणून स्थायिक करत होते. बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र आणि हरियाणा येथील अनेक ठिकाणी ईडीने टाकलेल्या छाप्यांवरून या नेटवर्कच्या व्याप्तीचा अंदाज येऊ शकतो.


ईडीने बंगालमधील एका मदरशातून ४० लाख रुपये आणि काही सोन्याची नाणी जप्त केली. या नेटवर्कचे धागेदोरे सुमारे दोन वर्षांपूर्वी सापडले होते, जेव्हा उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) म्यानमारमधील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना बनावट कागदपत्रे आणि आर्थिक मदत देऊन देशाच्या विविध भागांमध्ये स्थायिक करणाºया एका नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. या नेटवर्कचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचेही संकेत मिळाले होते. यूपी एटीएसच्या या तपासाच्या आधारे, ईडीने आपला तपास पुढे नेला आणि घुसखोरांचे हे नेटवर्क परकीय योगदान नियमन कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे आढळले.

ईशान्य भारत आणि बंगालमध्ये शतकानुशतके घुसखोरी होत आहे. गेल्या काही वर्षांपासून म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लीमही भारतात घुसखोरी करत आहेत. त्यांच्या प्रभावाची व्याप्ती यावरून लक्षात येते की, हे घुसखोर बंगालपासून हजारो किलोमीटर दूर, जम्मू आणि हैदराबादसह अनेक ठिकाणी स्थायिक झाले आहेत. बांगलादेशी घुसखोरांनी देशातील जवळजवळ प्रत्येक राज्यात तळ उभारले आहेत. त्यांनी केवळ आपली उपजीविकाच सुरक्षित केली नाही, तर रेशनकार्ड आणि आधारकार्डही मिळवले आहेत. अनेक प्रकरणांमधून हे उघड झाले आहे की, ते मतदारही बनले आहेत.


खरे तर, याच कारणामुळे बंगालमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनादरम्यान (रकफ)????, ते भारतीय नागरिक नसल्याच्या संशयावरून निवडणूक आयोगाला अनेक लोकांची नावे मतदार यादीतून वगळावी लागली. बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांप्रति नेहमीच अत्यंत सौम्य भूमिका घेतली गेली आहे. सुरुवातीला, काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या सरकारांनी घुसखोरीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनीही तेच धोरण अवलंबले. बंगाल, आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये किती घुसखोर भारतीय नागरिक म्हणून राहत आहेत हे सांगणे कठीण आहे, परंतु हे सर्वांना माहीत आहे की, बंगालमधील विशेष सखोल पुनरावलोकनादरम्यान, मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक आपल्या देशात परतण्यासाठी रांगेत उभे होते. घुसखोरांना हाकलून लावलेच पाहिजे, कारण ते केवळ देशाच्या संसाधनांवर भार टाकत नाहीत, तर राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण करतात. भारत एक विकसनशील देश आहे, पण तो अत्यंत गरिबीचाही सामना करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी राबवलेल्या विविध गरिबी निर्मूलन योजना हा गरिबांचा हक्क आहे, घुसखोरांचा नाही. समस्या ही आहे की, विरोधी पक्ष घुसखोरांना व्होट बँक म्हणून पाहतात. मतांच्या हव्यासापोटी ते राष्ट्रीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात.

घुसखोरांची ओळख पटू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या एसआयआर (रकफ)???? प्रक्रियेला विरोधी पक्ष विरोध करत आहेत. घुसखोरांमध्ये मोठ्या संख्येने मुस्लीम असल्याने, मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारणही केले जात आहे. एसआयआर ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. निवडणूक आयोगाला ही प्रक्रिया कोणत्याही चुकांशिवाय पूर्ण करणे कठीण आहे, पण याचा अर्थ असा नाही की, ती अजिबात होऊ देऊ नये. बंगालप्रमाणेच ईशान्येकडील राज्यांमध्येही घुसखोरी ही एक समस्या बनली आहे, याकडे दुर्लक्ष करता कामा नये.


जगभरातील अनेक श्रीमंत देश गरीब देशांमधून बेकायदा स्थलांतर करणाºयांना राजकीय संरक्षण देत असले तरी, तेथील परिस्थिती वेगळी आहे. या देशांमध्ये मानवाधिकार धोक्यात आहेत. संसाधनांची कमतरता आहे. भारतात तशी परिस्थिती नाही. भारत घुसखोरांप्रति सौम्य भूमिका घेऊ शकत नाही, कारण ते केवळ देशाच्या मर्यादित संसाधनांचा गैरवापर करत नाहीत, तर सीमावर्ती भागांमधील सामाजिक रचना विस्कळीत करत आहेत आणि स्थानिक संस्कृती व अस्मितेलाही कमजोर करत आहेत. त्यामुळे, घुसखोरांविरुद्ध कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्याच वेळी, या घुसखोरीला मदत करणाºयांवरही कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, कारण आता हे स्पष्ट झाले आहे की, लोकसंख्येची रचना बदलण्याच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या कटाचा भाग म्हणून ते पद्धतशीरपणे घुसखोरांना भारतात आणत आहेत.