Tuesday, September 8, 2026

करिअरच्या आंधळ्या शर्यतीत धापा टाकणारी तरुण पिढी


भारत हा तरुणांचा देश आहे. साहजिकच अशा देशाच्या चिंता खूप वेगळ्या आहेत. येथील बहुसंख्य लोकसंख्या ही शिक्षण, रोजगार आणि चांगल्या जीवनाची आकांक्षा बाळगते. त्यांच्या महत्त्वाकांक्षा, संधींसाठीची स्पर्धा आणि धडपड, यश मिळवण्याचा आनंद आणि ते न मिळाल्याचा राग, हे सर्व समान आहे. करिअरमधील यश, झटपट यश आणि बरेच काही मिळवण्याची इच्छा ही या युगाची मूल्ये आहेत. या परिस्थितीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोन्हींना गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. संकटाचे ढग दाटून येत आहेत. उपाय मात्र अगदीच कमी आहेत.


सरकारी नोकरीच्या संधी कमी होत आहेत. बहुतेक नोकºया खासगी क्षेत्रात आहेत. कायमस्वरूपी नऊ ते पाचच्या नोकºया आता एक स्वप्न बनल्या आहेत. त्यांची जागा गिग इकोनॉमीने (फ्रिलान्स आणि कंत्राटी काम) घेतली आहे. आर्थिक स्वातंत्र्याबद्दल तर विसरूनच जा, हे मॉडेल भविष्याबद्दल अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरतादेखील आणत आहे, ज्यामुळे मानसिक ताण आणि नैराश्य वाढत आहे आणि संकट अधिकच गंभीर होत आहे. भारताची कार्यपद्धती पूर्वी वेगळी होती. कुटुंब हे त्याचे जीवनरक्त होते. कुटुंबातील एक सदस्य नोकरी करत असे, तर बाकीचे सदस्य आपापल्या घरी, परिसरात आणि गावांमध्ये स्थानिक पातळीवर काम करत असत. कुटुंबाच्या छायेत सुरक्षितता आणि संरक्षण होते आणि मुलांमध्ये संस्कार रुजवण्यासाठी कौटुंबिक उपक्रम राबवले जात होते. नवीन व्यवस्थेने एकाच कुटुंबात अनेक कुटुंबे निर्माण केली आहेत. यामुळे एकाऐवजी चार कुटुंबे, चार स्वयंपाकघरे आणि चार व्यवस्था सांभाळण्याची गरज निर्माण झाली आहे. तुम्ही कितीही कमवा ते अजूनही अपुरेच आहे. यामुळे नवीन पिढी ईएमआयच्या दुष्टचक्रात अडकली आहे आणि नवीन व्यवस्थांची गुलाम बनली आहे. कुटुंब व्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. ती मूल्यांची शाळासुद्धा आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) आपल्यासमोर नवीन आव्हाने उभी केली आहेत. ते एका चांगल्या मदतनीसापेक्षा तणावाचे अधिक स्रोत बनले आहेत. AI मुळे नोकरी गमावण्याची आणि अप्रासंगिक होण्याची भीती तरुणांना वाटत आहे. ते हे संपूर्ण चित्र मोठ्या चिंतेने पाहत आहेत. नवीन कौशल्ये शिकण्याच्या दबावामुळे त्यांच्यात प्रचंड भीती निर्माण होत आहे. यामुळे साहजिकच मानसिक थकवा येत आहे. सध्या सर्वात मोठी चिंता कार्य-जीवन संतुलनाची आहे. घरून काम (वर्क फ्रॉम होम) आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीने सर्व काही बदलले आहे. कामाचे तास आता जवळपास २४ तास झाले आहेत. तरुण रात्री उशिरापर्यंत ई-मेल, अहवाल आणि संदेशांना प्रतिसाद देत ‘नेहमी कार्यरत’ (always on)  राहतात. याचा परिणाम कौटुंबिक जीवन, वैयक्तिक वेळ आणि झोपेवर होतो. वाढता बर्नआऊटचा दर, अनियमित कामाचे तास, स्पर्धात्मक वातावरण आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याचा दबाव, यांमुळे ही समस्या अधिकच गंभीर होते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बर्नआऊटला एक व्यावसायिक आजार म्हणून मान्यता दिली आहे. ही आता भारतीय कॉर्पोरेट जगतातील एक मोठी समस्या बनली आहे.


या नव्या युगाने तरुणांना उद्योजकतेची कौशल्ये दिली आहेत. ही पिढी जोखीम पत्करणारी आणि यशाची नवी उंची गाठणारी आहे. त्यांचा मंत्र वेगळा आहे. त्यांना यशाची नवी उंची लवकर गाठायची आहे आणि ते तसे करतही आहेत. तरुण वयातील त्यांचे यश आश्चर्यकारक आहे. त्यांचे स्टार्टअप्स धुमाकूळ घालत आहेत, यशाच्या उत्तम कथा लिहित आहेत आणि प्रेरणा देत आहेत. याची दुसरी बाजू विचारात घेणेही महत्त्वाचे आहे. आपल्याला माहीत आहे की, ९० टक्क्यांहून अधिक स्टार्टअप्स विविध कारणांमुळे त्यांच्या सुरुवातीच्या वर्षांत अयशस्वी होतात. अपयशाची भीती, गुंतवणूकदारांचा दबाव आणि निधीची कमतरता या सर्वांमुळे संस्थापक आणि सुरुवातीच्या कर्मचाºयांवर मानसिक ताण येतो.

एवढ्या मोठ्या देशात दरवर्षी लाखो तरुण कामाच्या शोधात येतात. त्यांच्याकडे पदव्याही असतात, पण कौशल्यांची कमतरता असते. त्यांच्याकडे पदव्या असतात पण ते निरुपयोगी ठरतात. बाजाराची मागणी वेगळी असते, त्यांची कौशल्ये वेगळी असतात. परिणामी, उच्चशिक्षित व्यक्तींनाही चांगल्या पगाराच्या नोकºया तर सोडाच, पण पसंतीच्या नोकºया मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. तरुणांच्या बहुतेक समस्या खºया आहेत. ते माहितीच्या महासागरात बुडालेले आहेत, त्यांच्यासाठी संधींची लोकशाही आहे. त्यांच्या आकांक्षा अगणित आहेत. ते माहितीच्या भाराखाली दबून गेले आहेत. माहितीच्या या विपुलतेमुळे दु:ख आणि गोंधळही निर्माण होत आहे. आकांक्षांचे आकाश जितके विशाल, तितकी संधी अधिक. यामुळे तीव्र निराशा येते. आयआयटीचे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, ही काही सामान्य गोष्ट नाही. अशा प्रतिभावान विद्यार्थ्यांचे निधन हे त्यांच्या कुटुंबीयांसाठी, देशासाठी आणि समाजासाठी एक मोठे नुकसान आहे. परीक्षांमधील अपयश, प्रश्नपत्रिका फुटणे, परीक्षांच्या सचोटीला तडा जाणे आणि गैरप्रकार रोखण्यात सरकार व प्रशासकीय यंत्रणेचे अपयश, यांमुळे तरुणांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे. शिक्षणाचे खासगीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या व्यापारीकरणामुळे परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. महागड्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी कुटुंबे कर्जात बुडत आहेत. बुद्धिमत्ता पलायनाचे (ब्रेन ड्रेनचे) संकट निश्चितपणे अस्तित्वात आहे. या देशात प्रतिभावान तरुणांना स्थान नाही, ही कल्पना समाजात खोलवर रुजलेली आहे. हे सत्य नाही, तर एक खोलवर रुजलेली धारणा आहे. या व्यवस्थेत जुगाड केल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. अशा धारणा कोणत्याही राष्ट्राच्या जीवनात योग्य नाहीत. आपण हे समजून घेतले पाहिजे की, राष्ट्रासाठीच्या आपल्या सामूहिक आकांक्षा केवळ संयुक्त प्रयत्नांतूनच पूर्ण होऊ शकतात. भारताच्या स्वातंत्र्याची आठ दशके ही अभूतपूर्व प्रगती, एकता आणि एका सशक्त लोकशाहीची साक्ष आहेत. प्रत्येक राष्ट्रासमोर आव्हाने असतात आणि त्यांचा सामना करूनच आपल्याला आपल्या समस्यांवर उपाय सापडतात. देशाची तरुण पिढी स्वत:च्या संकटांमध्येही आपल्या राष्ट्रासमोरील आव्हानांवर निश्चितपणे ठोस आणि व्यवहार्य उपाय शोधून काढेल. या तरुणांची बुद्धिमत्ता, नावीन्यता आणि आत्मविश्वास पाहून हा विश्वास सहजच दृढ होतो.

दशक दुसरा : समास पाचवा : रजोगुण लक्षण


दासबोधातील दुसºया दशकातील पाचव्या समासात समर्थांनी रजोगुण लक्षणे सांगितली आहेत. गुण किती व कोणते, ते ओळखावे कसे, त्यांचा शुद्ध व शबल असा भेद यांचे वर्णन ते येथे करतात. मुळात आपला देह सत्त्व, रज व तम या तीन गुणांचा बनलेला आहे. त्यांपैकी सत्त्वगुण उत्तम होय. सत्त्वगुणामुळे भगवंताची भक्ती उत्पन्न होते. रजोगुणामुळे पुन: जन्म घेऊन यावे लागते. तमोगुणामुळे प्राणी खालच्या योनीत जन्म घेतात.


येथे गीतेतील चौदाव्या अध्यायातील अठराव्या ओवीचा दाखला स्वामी देतात. ते म्हणतात की, सत्त्वप्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या गतीस जातात. रज:प्रधान माणसे मध्ये राहतात, हीनगुण असलेल्या स्वभावाची तम:प्रधान माणसे खाली जातात. गुणांमध्ये शुद्ध आणि शबल असा भेद आहे. तो सगळा सांगणार आहे. जे निर्मल असते ते शुद्ध व जे मिश्रित असते ते शबल होय. शबल बाधक असते. शुद्ध व शबल यांची लक्षणे आता येथे समर्थ सांगतात. शुद्ध गुण पारमार्थिक असतो तर शबल गुण सांसारिक असतो. प्रापंचिक माणसाची स्थिती अशी असते की, त्याच्या देहामध्ये तिन्ही गुण काम करतात. एका गुणाचा जोर झाला की, दुसरे दोन मागे जातात. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या योगाने जीवन चालते. रजोगुणाचे कार्य कसे चालते ते आता समर्थ येथे सांगतात.

समर्थ म्हणतात की, जीवनामध्ये जी गतिमानता आहे, परिस्थितीवर स्वामित्व गाजविण्याची लालसा आहे, बदलण्याची हौस आहे, ती रजोगुणाचे व्यक्तिरूप समजावे. कोणतेही मोठे ध्येय गाठण्यास रजोगुणाची मोठीच मदत लागते. पण तो प्रपंचाकडे वळला की, त्याचा दुरुपयोग होतो. त्याचे वर्णन श्री समर्थ करतात. शरीरांत रजोगुण प्रबळ झाला म्हणजे माणूस कसा वागतो अगदी लक्ष देऊन ऐकावे. हे घर माझे, हा संसार माझा आहे. त्यात देव श्रेष्ठ म्हणून कुठला आणला! असा जो खात्रीने ठरवतो तो रजोगुण होय.


मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर असून सर्वांत मीच थोर आहे, असे जो समजतो तो रजोगुण होय. माझा देश, माझे गाव, माझा वाडा, माझे ठिकाण असा अभिमान जो मनात वागवतो तो रजोगुण होय. रजोगुणी माणूस प्रपंचामध्ये माझेपणाने, ममत्वाने कसा गुंतलेला असतो याचे वर्णन झाले. आता वासना गुंतल्यामुळे तो कसा दु:ख भोगतो ते समर्थ सांगतात. दुसºयाचे सगळे नाहीसे व्हावे पण माझेच मात्र चांगले असावे असे स्वाभाविकपणे ज्याचे मन चिंतन करते तो रजोगुण होय. ज्याच्या मनात कपट असते, जो दुस‍ºयाचा मत्सर करतो, ज्याच्या अंतर्यामी कामाची वासना उद्भवते आणि जो दुस‍ºयास तुच्छ समजतो तो रजोगुण होय. ज्याला मुलाबद्दल आपलेपणा असतो, प्रेमामुळे बायको मनापासून आवडते, सर्वांचा लोभ असतो तो रजोगुण होय. आपल्या निकटच्या नातेवाइकाबद्दल जेव्हा मनास अस्वस्थता येऊन दु:ख वाटते, तेव्हा रजोगुण जोराने अंतरी शिरला आहे असे समजावे.

संसारामध्ये फार कष्ट आहेत, तो शेवटपर्यंत कसा जाईल, या विचारांनी मन चिंता करू लागले आणि आता ते भोग नाहीत म्हणून दु:ख वाटू लागले म्हणजे तो रजोगुण होय. दुसºयाचे वैभव पाहिले व आपल्याला ते असावे अशी इच्छा मनात उत्पन्न झाली. त्या इच्छेपायी जो दु:ख करतो तो रजोगुण होय. जे जे डोळ्यांनी पाहिले ते ते हवे म्हणून मनाने मागितले. परंतु ते मिळाले नाही तर जे दु:ख होते तो रजोगुण होय. ज्याचे मन विनोदाच्या वृत्तीने भरून जाते जो शृंगारिक गाणी गातो, राग, स्वर, ताना आणि हावभाव यांनी गायनात रंगून जातो, त्याच्या अंतरी रजोगुण भरला असे समजावे. जो दुस‍ºयाची टवाळी करतो, थट्टा करतो, निंदा करतो, ज्याच्या बोलण्याने वाद माजतो, जो सदा सर्वकाळ हास्यविनोद करतो त्याच्या अंतरी रजोगुण भरला असे मानावे. ज्याच्या अंगांत अतिशय आळस शिरतो, जो नाना प्रकारच्या करमणुकीचे खेळ खेळतो किंवा जेथे व्यसनांचा गदारोळ, धुमाकूळ चालतो तो रजोगुण होय.


जो कलावंत असतो, निरनिराळी सोंगे घेऊ शकतो, नाटक पाहण्याचा फार शोकीन असतो, निरनिराळ्या खेळांत पैसा घालवितो त्यांच्या अंतरी रजोगुण असतो. अंमल किंवा धुंदी आणणा‍ºया पदार्थांवर अतिशय प्रेम, गावगुंडीचे किंवा गावच्या भानगडीचे सारखे चिंतन, हलकट लोकांच्या संगतीची आवड, या गोष्टी जेथे असतात तेथे रजोगुण असतो.

रजोगुणी माणूस नुसता प्रपंचात गुंतलेला असतो इतकेच नव्हे तर देहाला व इंद्रियांना सुख देण्याच्या सारखा मागे असतो. हे वर्णन झाल्यावर त्याला भक्ती, वैराग्य, सत्समागम ही आवडत नाहीत असे श्री समर्थ सांगतात.


चोरी करण्यास शिकावे असे मनातून वाटते, दुस‍ºयाचा कमीपणा किंवा दोष बोलून टाकावा असे वाटते आणि उपासनेच्या नित्य नियमाचा कंटाळा येतो तो रजोगुण होय. देवाचे कार्य करायला लाज वाटते पण पोटासाठी पुष्कळ कष्ट करतो आणि प्रपंचामध्ये ज्याचे मन गुंतून जाते तो रजोगुण होय. गोड खाण्याची मनापासून आवड असते, देहाला पोसण्याबद्दल मोठा आदर असतो, आणि उपवास केला तर तो सहन होत नाही तो रजोगुण होय. शृंगारिक विषय स्वाभाविकपणे आवडतात, भक्ती व वैराग्य मनापासून नको वाटतात आणि मोठ्या रसिकपणे कलेचे कौतुक करण्यात हुशार असतो तो रजोगुण होय.

परमात्म्याचे ज्ञान नसल्यामुळे सर्व दृश्य वस्तूंवर खरे प्रेम असते आणि पुन:जन्म नको असला तरी ज्याच्या जबरदस्तीने तो घ्यावा लागतो तो रजोगुण होय. रजोगुण हा असा आहे. मन आसक्तीत गुंतल्यामुळे तो जन्ममरण भोगायला लावतो. प्रपंचामध्ये त्याचा जोर असतो. तो भयंकर दु:ख भोगायला लावतो. रजोगुणामुळे वासना प्रपंचात गुंतून राहते. तेथून ती सुटण्यास भगवंताची भक्तीहाच खरा उपाय आहे. आपले मन भगवंताला अर्पून त्याच्यावर प्रेम करायला शिकावे. शबल रजोगुण संसारिक बनवतो तर शुद्ध रजोगुण भक्तीचा मार्ग दाखवतो.


आता रजोगुण हा तर सुटता सुटत नाही, संसाराची बंधने तर काही तुटत नाहीत, वासना तर प्रपंचात गुंतून राहते. यावर काय उपाय करावा! याला एकच आहे, तो म्हणजे भगवंताची भक्ती साधण्यास वैराग्य हवे, म्हणजे प्रपंच्यात मन आसक्त नसावे, हे जर साधलेले नसेल तर आपल्या शक्तीप्रमाणे भगवंताचे भजन करावे.

कायेने, वाचेने आणि मनाने पान, फूल, फळ व पाणी अगदी मनापासून ईश्वराला अर्पण करावे व सार्थक करून घ्यावे, आपणास शक्य असेल तेवढे दान करावे, पुण्यकर्म करावे. परंतु भगवंताशी अगदी अनन्य असावे. तसेच संसारामधील सुखदु:खे भोगीत असता फक्त भगवंताचेच चिंतन करावे. या दृश्य विश्वाच्या आधी आणि नंतर एक देवच शिल्लक उरतो. मध्येच तेवढी ही माया दिसते. म्हणून तिला खरी न मानता फक्त भगवंतावर पूर्ण भरवसा ठेवावा.


शुद्ध रजोगुण परमार्थाकडे नेणारा असतो हे ध्यानात ठेवावे. शुद्ध रजोगुणाच्या खुणा सत्त्वगुणात आढळतात. तोच संपूर्णपणे भगवंताच्या भक्तीचे मूळ आहे.

प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा


आर्थिक प्रगतीवर अनावश्यक प्रश्न


अलीकडेच, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी आकडेवारी जाहीर झाल्यावर सरकार आणि अनेक अर्थतज्ज्ञांनी आनंद व्यक्त केला. ७.८% जीडीपी वाढीसह भारत पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला. तथापि, ही आकडेवारी जाहीर होताच, काही निवृत्त नोकरशहांनी विशेषत: माजी अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी ही आकडेवारी चुकीची असल्याचा आरोप करत गदारोळ केला.


नवीनतम जीडीपी आकडेवारीनुसार सेवा, उत्पादन आणि बांधकाम यांसारखी क्षेत्रे वेगाने वाढत आहेत. वाढलेल्या उपभोगानेही जीडीपी वाढीस हातभार लावला. हे सर्वज्ञात आहे की, जी क्षेत्रे आज आर्थिक वाढीस हातभार लावतात, तीच क्षेत्रे दशकानंतरही वाढीला चालना देत राहतीलच असे नाही. म्हणूनच, दर दहा वर्षांनी जीडीपी अंदाजांवर आधारित क्षेत्रांची एक नवीन यादी प्रसिद्ध केली जाते. असे होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

हे साधारणपणे दर दहा वर्षांनी घडते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आयएमएफ देखील हे मान्य करते. हे आश्चर्यकारक आहे की, निवृत्त नोकरशहांना हे साधे सत्य समजत नाही आणि ते जीडीपीच्या आकडेवारीबद्दल शंका व्यक्त करतात. जीडीपीच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे निवृत्त नोकरशहा केवळ आपली निराशा व्यक्त करत आहेत, असे मानण्यास ठोस कारणे आहेत. विरोधकांकडून अपेक्षा नाही कौतुकाची, पण नोकरशहांनी समजून घेतले पाहिजे.


परदेश दौºयावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी जीडीपीच्या आकडेवारीवर एका पोस्टमध्ये म्हटले होते की, ही आकडेवारी निराशावाद्यांसाठी एक धक्का आहे. हा विरोधी पक्षनेत्यांवर विशेषत: राहुल गांधींवर केलेला एक टोला होता, ज्यांनी अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ‘भारतीय अर्थव्यवस्था मृत झाली आहे’ या दाव्याला पाठिंबा दिला होता. माजी नोकरशहांनी जीडीपीच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल करत वास्तविक जीडीपी वाढ केवळ २.६ टक्के असल्याचा दावा केला. हा अंदाज हास्यास्पद आहे, कारण कोविडनंतर देशात झालेली प्रगती सर्वांनाच माहीत आहे.

ही प्रगती पाहता केवळ २.६ टक्के जीडीपी वाढीचा दावा असमर्थनीय आहे. जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक नीलकंठ मिश्रा यांच्यासह इतर अर्थतज्ज्ञांनी जीडीपीची आकडेवारी अचूक असल्याचे ठामपणे सांगितले. त्यांनी सरकारच्या आकडेवारीला तथ्यांसह पाठिंबा दिला. नीलकंठ मिश्रा यांच्या मते दोन वेगवेगळ्या मालिकांमधील जीडीपीच्या आकडेवारीची तुलना करणे मुळातच चुकीचे आहे.


त्यांच्या मते नवीन जीडीपी मालिकेत आकडेवारी आणि कार्यपद्धती या दोन्हींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि सुधारित आधारभूत वर्षाची आकडेवारी नवीन अंदाजांच्या खूप आधीच प्रसिद्ध करण्यात आली होती. अखेर, आॅगस्टमध्ये कार आणि एसयूव्हीच्या विक्रीत ३५ टक्क्यांनी, दुचाकींच्या विक्रीत २० टक्क्यांहून अधिक आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दर्शवणारी आकडेवारी कोणी कशी नाकारू शकेल? हे लक्षात घेतले पाहिजे की, वाहन विक्रीची आकडेवारी सरकारकडून गोळा केली जात नाही. मजबूत कर संकलन, कर्जवाढीचा वेग आणि बांधकाम क्षेत्रातील सातत्यपूर्ण वाढ यांसारख्या ठोस निर्देशकांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, जीडीपीची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर, जपानच्या रेटिंग एजन्सीने JRC भारताचे सार्वभौम रेटिंग पूर्वीच्या BBB + वरून A - पर्यंत श्रेणीसुधारित केले. JRC सह इतर रेटिंग एजन्सी, भारतासह अनेक देशांसाठी रेटिंग जारी करतात. इतर कारणांव्यतिरिक्त हे रेटिंग देशाला परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत करते.


JRC ही जागतिक स्तरावर एक विश्वसनीय एजन्सी आहे आणि एखाद्या देशाला मिळालेले A- रेटिंग हे सूचित करते की, तो देश आर्थिक जबाबदारी जपण्यासाठी विश्वासार्ह आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, गेल्या महिन्यात S&P आणि फिच या दोन इतर जागतिक रेटिंग एजन्सींनी देखील भारतीय अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला होता. भारताची धोरणात्मक स्थिरता आणि पायाभूत सुविधांवरील प्रचंड खर्चाचा हवाला देत दोन्ही एजन्सींनी भारताला गुंतवणुकीसाठी एक योग्य ठिकाण म्हणून घोषित केले होते. जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग A- पर्यंत श्रेणीसुधारित करणे ही काही लहान गोष्ट नाही; हे एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकण्यासारखे आहे.

१९८८ पासून भारत कधीही A श्रेणीत आलेला नाही. १९९०-९१ मध्ये भारत व्यवहार तोलाच्या संकटात सापडला होता, ज्यामुळे देशाच्या आर्थिक पतमानाला धक्का बसला. हे पतमान पुन्हा मिळवण्यासाठी देशाला बराच काळ लागला. आता हे पतमान आणखी मजबूत करणे आवश्यक आहे. रेटिंग एजन्सीकडून A रेटिंग मिळण्याचा अर्थ असा आहे की, भारतावरील जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास लक्षणीयरीत्या वाढला आहे. यामुळे देशात अधिक परदेशी गुंतवणूक येण्याची शक्यता वाढेल. परिणामी, रोजगाराच्या संधी वाढतील. या मजबूत रेटिंगमुळे भारत सरकार आणि भारतीय कंपन्यांना परदेशातून स्वस्त व्याजदरात कर्ज किंवा निधी मिळवणे शक्य होईल.


भारतीय बँकांचे अनुत्पादक कर्ज (एनपीए) कमी झाले असून, ते आता २ टक्क्यांपेक्षा कमी आहे, या वस्तुस्थितीमुळेही रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे. त्याचप्रमाणे वित्तीय तूट गेल्या वर्षीच्या ४.७ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. जीडीपीच्या अंदाजे ५६.१ टक्के असलेले केंद्र सरकारचे कर्ज आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. अनावश्यक अनुदान कमी करण्याचे आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक वाढवण्याचे सरकारचे प्रयत्न हे आर्थिक संसाधनांचे कार्यक्षम व्यवस्थापन दर्शवतात.

जर सरकारने कर्ज आणि खर्च नियंत्रणात ठेवले, तर जागतिक संस्था भारताचे मानांकन आणखी सुधारू शकतात. आता भारताचे मानांकन सुधारत असल्याने कोणाच्याही दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन करणे कठीण आहे. जीडीपीमधील घसरणीबद्दल बोलणे विचित्र आहे. जीडीपीच्या आकडेवारीबाबत नकारात्मक वातावरण निर्माण करणाºया नोकरशहांनी आणि काँग्रेस नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, रेटिंग एजन्सी अनेक मापदंडांच्या आधारे आपले रेटिंग ठरवतात.


माजी नोकरशहा आणि काँग्रेस नेते हे रेटिंग एजन्सींपेक्षा आर्थिक बाबींमध्ये स्वत:ला अधिक जाणकार सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत का? सरकारने आकडेवारीमध्ये फेरफार करून कमी आर्थिक वाढ अतिरंजित केली, असे म्हणणे ही त्यांची निराशाच आहे, हे स्पष्ट आहे.

दशक दुसरा : समास चौथा : भक्ती निरूपण


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील मूर्खलक्षणनाम दुसºया दशकातील चौथ्या समासात भक्ती निरूपण केलेले आहे. यात त्यांनी भाग्याच्या चढत्या पाय‍ºया सांगितल्या आहेत. समर्थ म्हणतात की, अनेक जन्मी जी सत्कर्मे केली त्यांचे फळ म्हणून हा नरदेह आपल्याला मिळतो. त्यामध्ये भाग्य फळले तरच माणूस सन्मार्गास लागतो. आधी नरदेह हे भाग्य, त्यात ब्राह्मण, त्यावर स्नानसंध्या, त्यावर उत्तम वासना, त्यावर भगवंताचे भजन, या गोष्टी पूर्वपुण्याईने घडतात. भगवंताची भक्ती ही उत्तमच पण त्यात संतांचा समागम मिळणे हे त्याहून उत्तम होय. अशा रीतीने आयुष्याचा काळ सार्थकी लागतो. हाच सर्वश्रेष्ठ लाभ समजावा. अंतर्यामी भगवंताबद्दल खरे प्रेम आणि बाहेर संगतीला भक्तांचा समूह असावा. मग कुठे उत्सव होऊन जेव्हा अखंड हरिकथा चालते त्याने भगवंताचे प्रेम दुप्पट वाढते.


समर्थ सांगतात की, या जन्मात आत्महित साधण्यासाठी काय काय उपयोगी पडते त्याचे वर्णन आता करतो. आपल्याला नरदेह मिळाला आहे. काही तरी त्याचे सार्थक करून घ्यावे. तसे केले तर अति दुर्लभ असणारा परलोक प्राप्त होतो. यथासांग ब्रह्मकर्म करावे किंवा दया, दान, धर्म करावा किंवा सोपे असे भगवंताचे भजन करावे. पश्चात्तापाने संसाराचा त्याग करावा किंवा भक्तीच्या मार्गास लागावे किंवा संतांचा समागम करावा.

अनेक शास्त्रांचा खोल अभ्यास करावा किंवा तीर्थयात्रा तरी कराव्यात किंवा पापक्षय होण्यासाठी चांगली पुरश्चरणे करावी. अथवा परोपकार करावा किंवा ज्ञानमार्गाचा विचार करावा किंवा संत आणि सद्गुरू यांच्याकडून ऐकलेल्या प्रवचनांतील सारासार शोधून पाहावे. वेदांची आज्ञा पालवी, कर्मकांड पाळावे, उपासना करावी, म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार येतो, पात्रता येते. कायेने, वाचेने आणि मनाने, तसेच पान, फूल, फळ किंवा पाणी यापैकी कशाने तरी भगवंताची पूजा करावी आणि सार्थक करून घ्यावे.


समर्थ म्हणतात की, जन्मास येऊन जर आत्महित साधले नाही तर ते जगणे मृतप्राय समजावे. आपण मनुष्य म्हणून जन्मास आलो त्याचे काही तरी फळ पदरात पाडून घ्यावे. असे जर केले नाही तर जन्म आपला वाया जातो आणि आपला देह केवळ भूमिभार होतो. काही तरी आत्महित करून घ्यावे हेच या नरदेहाला अत्यंत योग्य आहे. आपली शक्ती असेल त्याप्रमाणे आपले मन आणि धन आपण भगवंताकडे लावावे.

यापैकी काहीच मनावर घेऊन जो करीत नाही तो जगात जिवंत असून मेल्यासारखे जगतो. जन्म घेऊन त्याने आपल्या आईला उगाच कष्ट दिले. अशा प्रकारची जिवंत असून मेल्याप्रमाणे जगणारी माणसे कशी असतात त्यांचे वर्णन येथे समर्थ करतात. त्यांच्यापाशी स्नान, संध्या, भजन, देवपूजा, मंत्र, जप, ध्यान आणि मानसपूजा यांपैकी काहीच नसते. भक्ती, प्रेम, निष्ठा, नेम, देव, धर्म, पाहुणा यांपैकी काहीच नसते. सद्बुद्धी, सद्गुण, हरिकथाश्रवण, अध्यात्मनिरूपण, यांपैकी काहीच नसते. त्यांच्यापाशी भल्यांची संगती नाही, शुद्ध, चित्तवृत्ती नाही, खोट्या गर्वामुळे, अहंकारामुळे त्यांना मोक्षाची प्राप्ती होत नाही. नीती, न्याय, पुण्याचा उपाय, परलोकाची सोय आणि योग्य अयोग्य कृतीबद्दल विचार यापैकी काहीच नसते. विद्या, वैभव, चातुर्याचा विलास, कला व सुंदर सरस्वतीचा वाग्विलास यापैकी काहीच नसते. शांती, क्षमा, दीक्षा, म्हणजे एखादे घेतलेले व्रत, मैत्री, शुभ व अशुभ यांचा विवेक आणि साधना यापैकी काहीच नसते.


पावित्र्य, स्वधर्माचरण, सदाचार, सद्विचार, इहलोक आणि परलोक यांपैकी काहीच नसते. त्याच्यापाशी फक्त मनाला येईल त्याप्रमाणे वागण्याची स्वच्छंदता असते. कर्म, उपासना, ज्ञान, वैराग्य, योग, धारिष्ट, यापैकी काहीच आढळत नाही.

समर्थ पुढे सांगतात की, विरक्ती, त्याग, समता, उत्तम लक्षणे आणि परमेश्वराबद्दल आदर किंवा प्रेम यापैकी काहीच नसते. त्याला दुस‍ºयाचा गुण पाहून संतोष वाटत नाही, परोपकार केल्याने होणारे सुख नाही, त्याच्या अंतर्यामी हृदयामध्ये भगवंताच्या भक्तीचा लेशदेखील आढळत नाही.


रामदास स्वामी या समासात सांगतात की, अशी अपवित्र माणसे टाळावीत. भक्ती घडविण्यास पुण्य लागते. अशा तºहेची माणसे पाहिली म्हणजे ती जिवंत प्रेतासारखी वाटतात. पवित्र माणसाने त्यांच्याशी बोलू सुद्धा नये. ज्याच्यापाशी हवी तेवढी पुण्यसामग्री असते त्यालाच भगवंताची भक्ती घडते. जे जसे वागतात, कर्म करतात तसेच त्यांना त्याचे फळ मिळते. याठिकाणी मुर्खलक्षणनाम दुसºया दशकातील चौथ्या समासाची ते समाप्ती करतात.

प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा



Sunday, September 6, 2026

अर्थव्यवस्थेची ताकद


३१ आॅगस्ट रोजी आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीतील विकासाची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. शैक्षणिक समुदायाच्या एका गटाने या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न आणि जीडीपीची गणना करण्यासाठी वापरल्या जाणाºया पद्धतीमध्ये काही समस्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण होते. याची चौकशी होणे आवश्यक आहे.


आर्थिक वर्ष २०२६-२७च्या पहिल्या तिमाहीत नोंदवलेली ७.८ टक्के वास्तविक जीडीपी वाढ ही प्रमुख आणि सातत्याने उपलब्ध असलेल्या आर्थिक निर्देशांकांच्या भक्कम आधाराने झाली आहे. हे निर्देशांक आर्थिक विस्ताराची मजबुती दर्शवतात. उदाहरणार्थ, व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत १८.३ टक्क्यांनी वाढ झाली, जे मजबूत मालवाहतूक आणि व्यावसायिक मागणी दर्शवते. भविष्यातील मागणी वाढीच्या अपेक्षेने कंपन्या त्यांच्या वाहनांचा ताफा वाढवत आहेत. गुंतवणुकीतही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. भांडवली वस्तूंचे उत्पादन १५.२ टक्क्यांनी वाढले, तर यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या आयातीत ५१.५ टक्क्यांनी मोठी वाढ झाली.

सिमेंट उत्पादन, तयार पोलादाचा वापर आणि पायाभूत सुविधा व बांधकाम साहित्याच्या उत्पादनातही मोठी वाढ दिसून आली. तयार होणाºया ई-वे बिलांची संख्या दुहेरी अंकात वाढत राहिली. जीएसटी दरांमध्ये मोठे बदल आणि सुसूत्रीकरणानंतर एकूण जीएसटी संकलनात ८.४ टक्क्यांनी वाढ झाली. एकत्रितपणे पाहता, हे निर्देशक सूचित करतात की, वास्तविक आर्थिक क्रियाकलाप मजबूत आहे आणि आर्थिक वाढ सर्वसमावेशक आहे. पहिल्या तिमाहीतील वाहनांच्या जोरदार विक्रीवरून असे दिसून येते की, वैयक्तिक पसंती आणि गरजांवर खर्च वाढला आहे, ज्यामुळे मागणीला चालना मिळाली आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रांमध्ये बँक पतपुरवठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मजबूत गुंतवणूक, स्थिर उपभोग, मालवाहतुकीतील वाढ आणि वाढलेला बँक पतपुरवठा यांचा एकत्रित परिणाम हे दर्शवतो की, ही आर्थिक वाढ शाश्वत आहे.


वाढीबद्दलच्या साशंकतेचा एक पैलू जीडीपी डिफ्लेटरशी संबंधित आहे, म्हणजेच चालू किमतींवरील जीडीपी आणि स्थिर किमतींवरील जीडीपी यांच्यातील किंमत समायोजन. आधारभूत वर्ष बदलताना गणना पद्धतीत लक्षणीय सुधारणा केल्यानंतरही ही चिंता कायम आहे. पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर जीडीपी डिफ्लेटरबाबत उपस्थित केलेला सर्वात महत्त्वाचा तांत्रिक प्रश्न याच मुद्द्याशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेल्या सर्वोत्तम पद्धतींनुसार, सुधारित राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीत आता किमती समायोजित करण्यासाठी घाऊक किंमत निर्देशांकाऐवजी नवीन उत्पादक किंमत निर्देशांकाचा वापर केला जातो. तथापि, चलनघट पद्धत आणि किंमत डेटाचा स्रोत या दोन्हीमध्ये एकाच वेळी झालेल्या बदलामुळे जीडीपी डिफ्लेटरमधील अलीकडील बदलांचा अर्थ लावणे काहीसे कठीण झाले आहे. पहिल्या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर झालेल्या चर्चेतही यावर प्रकाश टाकण्यात आला.

भारताने उत्पादन क्षेत्रासाठी ‘डबल डिफ्लेशन’ पद्धत अवलंबली आहे. या पद्धतीत उत्पादन आणि उत्पादनात वापरल्या जाणाºया वस्तू व सेवा (मध्यवर्ती उपभोग) यांच्या किमतींमधील बदल स्वतंत्रपणे समायोजित केले जातात. या दोन वास्तविक किमतींमधील फरकाचा उपयोग नंतर वास्तविक सकल मूल्यवर्धित काढण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी जगभरात वापरली जाणारी ही सर्वोत्तम पद्धत मानली जाते. जेव्हा उत्पादनात वापरल्या जाणाºया कच्च्या मालाच्या किमती तयार उत्पादनांच्या किमतींपेक्षा अधिक वेगाने वाढतात, तेव्हा चालू किमतींवरील GVA वाढ ही वास्तविक  GVA वाढीपेक्षा कमी असू शकते. उत्पादन आणि कच्चा माल या दोन्हींच्या किमती वाढत असतानाही, सूचित GVA अवस्फीतीकारक नकारात्मक असू शकतो.


विकसित देशांमध्येही दुहेरी अवस्फीतीकारक पद्धत वापरताना असेच परिणाम दिसून आले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कच्च्या मालाच्या किमतींमधील वाढ तयार उत्पादनांच्या किमतींपेक्षा जास्त होती, ज्यामुळे GVA अवस्फीतीकारक कमी झाला. शिवाय, काही सेवा क्षेत्रांमधील अत्यंत कमी दरवाढीमुळे GVA अवस्फीतीकारक आणि सर्वसाधारण CPI व WPI यांच्यातील तफावत आणखी वाढली. स्थिर किमतींवरील GVA चे अंदाज सामान्य किंवा एकत्रित किंमत निर्देशांकांवर आधारित नसतात.

विविध प्रकारच्या उत्पादनासाठी आणि निविष्ठांसाठी ३०० हून अधिक उत्पादक किंमत आणि इतर किंमत निर्देशांकांची काळजीपूर्वक गणना केली जाते. त्यामुळे काही मोजक्या विलग आणि व्यापक माहितीच्या आधारे या GVA अंदाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अनुचित आहे. यामुळे अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सातत्याने सुधारणा करण्यात आलेल्या सांख्यिकीय प्रणालीबद्दल जनतेची दिशाभूल होऊ शकते.


एका अभ्यासाने भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी वापरल्या जाणाºया पद्धतीवर अयोग्यरीत्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, भारताची प्रत्यक्ष कामगिरी आणि एका काल्पनिक तुलनात्मक देशाची कामगिरी यांमधील तफावत ही GDP वाढीच्या कथित अतिअंदाजामुळे आहे. दिलेली व्याख्या ही खरोखरच एक ‘किमान मर्यादा’ आहे, परंतु जीडीपीची गणना करण्यासाठी वापरल्या जाणाºया पद्धतीमधील दोष नेमका कुठे आहे, हे ती स्पष्ट करत नाही. आर्थिक मूल्यांकनाच्या कोणत्याही प्रणालीवरील टीका स्वागतार्ह आहे, कारण त्यामुळे सुधारणांच्या दिशेबद्दल स्पष्टता येऊ शकते, परंतु दिशाभूल करणारी निरीक्षणे आणि सोयीस्कर निष्कर्षांद्वारे हे शक्य नाही, विशेषत: जेव्हा अर्थव्यवस्थेची जवळपास सर्व प्रमुख क्षेत्रे विकासाची चिन्हे दर्शवत आहेत, अशावेळी विरोधकांकडून होणारी टीका ही चुकीची आहे.

दशक दुसरा : समास तिसरा : कुविद्या लक्षण


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील मूर्खलक्षणनाम या दुसºया दशकातील तिसºया समासात कुविद्या लक्षणे सांगितली आहेत. सुसंस्कृत माणसास न शोभणारी ही लक्षणे आहेत, एवढे ध्यानात ठेवावे. म्हणजे त्याचे अधिक वर्णन किंवा वर्गीकरण करायची जरुरी नाही. ती अतिशय हीन व वाईट लक्षणे आहेत. माणसाने त्यांचा त्याग करावा. ती ऐकली म्हणजे त्याचा त्याग घडतो. कुविद्येचा माणूस कसा असतो ते समर्थ येथे सांगतात. जन्मास येऊन तो स्वत:चे नुकसान करून घेतो. येथे सांगितलेल्या लक्षणांवरून तो ओळखता येईल. कुविद्येच्या माणसाच्या अंगी खूप अवगुण असतात. या कारणासाठी कोणी स्पष्ट उपदेश करू लागला तर त्याला तो आवडत नाही.


भगवद्गीतेतील सोळाव्या अध्यायातील चौथ्या ओवीचा अर्थ असा आहे की, दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा आणि चांगल्या कुटुंबात जन्म घेऊन अज्ञान असणे, ही आसुरी संपत्ती आहे. याचाच विस्तार समर्थ येथे करतात. ते म्हणतात की, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, वासना, अतृप्ती, लोलंगता, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनीती, गुंडगिरी, सदा मस्ती, अभिमान, अवज्ञा, विपत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट, अस्वस्थता, त‍ºहेवाईकपणा, कसे तरी काम उरकायची घाई, वटवट, सदा तक्रार करायची सवय आणि उलटेसुलटे करायचा स्वभाव या लक्षणांनी प्रगट होणारी कुविद्या म्हणजे मोठा रोगच आहे.

कुविद्येचा माणूस कुरूप असून हीन लक्षणी, अशक्त असून दुर्जन आणि दरिद्री असून, अतिशय कंजुष असतो. तो आळशी असून खादाड, दुर्बळ असून लाथा झाडणारा आणि फटकून वागणारा असून, अतिशय लबाड असतो, तो मूर्ख असून तापट, वेडपट असून वाचाळ आणि खोटा असून, अतिशय बोलका असतो. कुविद्येचा माणूस असा असतो की, स्वत:ला कळत नाही पण दुस‍ºयाचे ऐकत नाही, स्वत:ला येत नाही पण दुस‍ºयाकडून शिकत नाही आणि स्वत: करीत नाही पण अभ्यासदृष्टीने निरीक्षणही करीत नाही.


समर्थ या समासात सांगतात, तो अज्ञानी असून अविश्वासी, भलतेसलते अर्थ करणारा असून दोषी आणि स्वत: अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो. तो पापी असून निंदक, दु:खी असून दुस‍ºयाचा घात करणारा आणि स्वत: क्लेश भोगीत असून अतिशय निर्दय असतो. तो हीन असून ढोंगी, रोगी असून वाईट कर्मे करणारा आणि कंजुष असून अधर्मांत रमणा‍ºया वासनेचा असतो. तो हीन देहाचा असून मोठा अभिमानी, वाह्यात असून फाटे फोडणारा. अर्थहीन बडबडणारा आणि स्वत: दुर्दैवी असून लोकांना ज्ञान सांगणारा असतो. तो भित्रा असून उद्धट, बेकार असून डौल मिरविणारा आणि डरपोक असून पराक्रमाच्या बाता मारणारा असतो. तो कमी दर्जाचा असून गर्विष्ठ, विषयासक्त असून व्यसनी आणि द्वेष करणारा असून अतिशय भ्रष्ट असतो. तो मोठा अभिमानी असून बंधन न पाळणारा, पैशांची ओढाताण असून दुष्ट वृत्तीचा आणि ढोंगी असून, अतिशय उच्छृंखल असतो.

समर्थ पुढे सांगतात की, तो वाईट असून विकारधीन, खोटा असून अनुपकारी आणि स्वत: हीन लक्षणी असून इतरांचा अतिशय तिरस्कार करतो. तो बुद्धी बेताची असून वाद करणारा, भिका‍ºयासारखा असून टोचून बोलणारा आणि धूर्त किंवा कपटी असून वाईट शब्दांनी दुस‍ºयास दु:ख देणारा असतो. तो मनाला बोचेल असे बोलणारा, अंगावर ओरडून बोलणारा, कपटाने बोलणारा, संशयाने बोलणारा, दु:ख होईल असे बोलणारा, झोंबेल असे बोलणारा क्रूर, निर्दय, दुष्ट माणूस असतो. तो दुस‍ºयाचे व्यंग बोलणारा, घातकी बोलणारा, अशुभ बोलणारा, क्षणोक्षणी बोलणे बदलणारा, द्वेषाने बोलणारा, खोटे बोलणारा आणि धिक्कार करून बोलणारा असतो. तो कपटी, वाकड्या बुद्धीचा, आतल्या गाठीचा, क्षुद्र मनाचा, अंगचोर, द्वाड, रागीट, पापद्रव्य असलेला आणि अतिशय टवाळखोर असतो.


कुलक्षणी माणूस हा तो तापट, तामसी अविचारी, पापी, अनर्थ करणारा, फेफ‍ºया आणि अंगांत भूत, समंध यांचा संचार होणारा असा असतो. तो आत्मघातकी, स्त्रीघातकी, गायघातकी, ब्राह्मणघातकी, मातृघातकी, पितृघातकी, महापापी आणि भ्रष्ट असतो. तो सर्व दृष्टीने कमी, अयोग्य, वाईट तर्क करणारा, मित्रद्रोही विश्वासघातकी, कृतघ्न, परस्त्रीशी रमणारा, नरकाला जाण्यास योग्य, आततायी आणि बडबड्या असतो.

या समासात स्वामी पुढे सांगतात की, तो संशयी, भांडण, झगडा करणारा, कलहप्रिय, अधर्माने वागणारा, जनराहाटी मोडणारा, सदैव शोक करणारा, चहाडखोर, व्यसनी, भेद उत्पन्न करणारा आणि मोठा हट्टी असतो. तो खोडकर, अपयशी, घाणेरडा, लोकांना चाळवणारा, कवडीचुंबक, लोचट, स्वार्थी, हावरा, स्वैर वर्तनाचा, घट्ट मुठीचा म्हणजे परोपकारासाठी काही न देणारा, शिरजोर आणि दुस‍ºयाचे चांगले न पाहू शकणारा असतो. तो लबाड, मठ्ठ, भित्रा, बेपर्वा, लुडबुड्या, लफंगा, उन्मत्त, पाखंडी, चोर आणि दुस‍ºयाची वस्तू लांबविणारा असतो. तो साहसी, स्वैर, उच्छृंखल, चटोर, चावट, गाजावाजा करणारा, थोतांड रचणारा, उद्धट, विषयासक्त, स्वजातीतून भ्रष्ट झालेला आणि वाईट बुद्धीचा असतो. तो मारेकरी लुटारू, दरोडेखोर, घरांना खणती लावून धन शोधणारा, घातकी, भोंदू, परस्त्रीशी रमणारा, भूल देऊन भुरळ पाडणारा आणि चेटूक करणारा असतो. तो नि:शंक, बेशरम, कळलाव्या, निरुद्योगी, पुष्ट, धटिंगण, उर्मट, चिवट, अक्षरशत्रु म्हणजे अगदी अशिक्षित, खट्याळ, नाटकी, सर्वांशी भांडणारा आणि विकारधीन असतो.


कुलक्षणी कोण हे सांगताना समर्थ पुढे सांगतात की, तो उतावळा, उगीच आळ घेणारा, अनाचारी, आंधळा, पांगळा, खोकल्याने बेजार झालेला, थोटा, बहिरा, दमेकरी असून देखील अभिमान सोडीत नाही. तो विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, भाग्यहीन, भिकारी, बळहीन, कळाहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन, विद्रूप, उक्तीहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी, भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन, सर्वहीन व क्षुल्लक असतो. त्याला वेळ कळत नाही, प्रसंग कळत नाही, अभ्यास कळत नाही, लोकांचे आर्जव करणे कळत नाही, मैत्री कशी करावी ते कळत नाही, सारांश त्याला काहीच कळत नाही, असा तो अभागी असतो.

असे अनेक प्रकारचे दोष त्याच्या ठिकाणी असतात. वाईट लक्षणांचे तो कोठारच असतो. कुविद्येचा माणूस वाचकांनी याप्रमाणे ओळखावा. आतापर्यंत सांगितलेली कुविद्येची लक्षणे ऐकावी व ऐकून ती टाकावी. उगीच अभिमानाने इरेस पडून वाईट लक्षणे न सोडण्याचा हट्ट धरणे योग्य नाही.


प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा


Saturday, September 5, 2026

मनुस्मृती ही भारताची कायदेशीर संहीता नाहीच


पंधरा दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी मनुस्मृतीचा हवाला देत, स्त्रीच्या कौटुंबिक भूमिकेशी संबंधित एका कायद्याला स्त्रीविरोधी म्हटले. पितृसत्ताक विचारांचे प्रतीक म्हणून संबोधून, त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. मनुस्मृतीचे स्वत:चे ऐतिहासिक महत्त्व आहे, परंतु सध्याच्या कायदेशीर व्यवस्थेत तिची कोणतीही भूमिका नाही. तो केवळ भारतीय सामाजिक इतिहासाचा एक ग्रंथ आहे. आज, ती भारताची कायदेशीर संहिता राहिलेली नाही. संविधान नागरिकांचे हक्क निश्चित करते. सरकार संसद आणि न्यायपालिकेद्वारे चालवले जाते. आजच्या स्त्रियांच्या स्थितीसाठी थेट मनुस्मृतीला दोष देणे ही इतिहासाची अत्यंत वरवरची समज आहे. कोणत्याही धार्मिक ग्रंथाला आधुनिक संसदेने पारित केलेला कायदा मानणे ही एक ऐतिहासिक चूक आहे. यातून राहुल गांधींचे अज्ञान आणि पोरकटपणा सिद्ध झालेला आहे.


१७९४ मध्ये सर विल्यम जोन्स यांनी मनुस्मृतीचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. वसाहतवादी राजवटीने हिंदू कायदा समजून घेण्यासाठी तिला प्राथमिक स्रोत बनवले. ब्रिटिशांनी स्थानिक परंपरा आणि चालीरीतींपेक्षा ग्रंथ-केंद्रित प्रणालीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे वसाहतवादी अर्थ आणि प्राचीन सामाजिक संदर्भ वेगळे केले पाहिजेत. मनुस्मृतीवर चर्चा करताना, तिचा ग्रंथात्मक इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. तिच्या हस्तलिखितांमधील मजकूर भिन्नता आणि प्रक्षेपांवर विद्वानांमध्ये नेहमीच मतभेद राहिले आहेत. एकाच वादग्रस्त श्लोकाला अंतिम सत्य मानणे घाईचे आहे. गैरसोयीच्या तरतुदींना केवळ प्रक्षिप्त किंवा नंतर जोडलेल्या गोष्टी म्हणून फेटाळून लावणेही चुकीचे ठरेल.

इतिहासकाराचे काम स्वत:च्या पसंतीनुसार ग्रंथाची निवड करणे नाही. त्या ग्रंथाचे त्याच्या काळाच्या आणि संदर्भाच्या संदर्भात परीक्षण करणे ही त्याची जबाबदारी आहे. भारतीय समाजाचा इतिहास केवळ ग्रंथांवर आधारित नव्हता. या ग्रंथांसोबतच लोकरीती आणि प्रादेशिक परंपरादेखील अस्तित्वात होत्या. एखाद्या ग्रंथातील लिखित कायदे आणि समाजाचे वर्तन नेहमीच सुसंगत नसतात. मनुस्मृती स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालत असली तरी, ती स्त्रियांच्या संपत्ती आणि कुटुंबाच्या हक्कांनाही मान्यता देते. तिचे मूल्यांकन एकतर्फी असू शकत नाही. तिला आधुनिक हक्कांचा जाहीरनामा किंवा शोषणाचा दस्तऐवज म्हणूनही मानता येणार नाही.


भारतीय संस्कृतीचा अनुभव विशाल आहे. ऋग्वेदात लोपामुद्रा, घोष आणि अपाला यांसारख्या ऋषीमुनींची स्तोत्रे आहेत. उपनिषदांमध्ये गार्गी आणि मैत्रेयी यांचे तात्विक प्रश्न आहेत. गार्गी आणि यज्ञवल्क्य यांच्यातील वादविवाद हा आपल्या बौद्धिक जागृतीचा पुरावा आहे. मनुस्मृतीमधील एक कायदा संपूर्ण संस्कृतीची व्याख्या करू शकत नाही. प्राचीन कायद्यांना थेट सध्याच्या राजकारणाशी जोडणे हे तर्कहीन आहे. सध्याच्या सरकारवर त्यांच्या धोरणांच्या, निर्णयांच्या आणि कृतींच्या आधारावर टीका केली पाहिजे. सध्याच्या सरकारच्या धोरणांचा आधार एक प्राचीन ग्रंथ आहे हे सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्याची गरज आहे. केवळ राजकीय आरोप पुरेसे नाहीत.

राहुल गांधी निवडणुकीच्या काळात मंदिरे आणि धार्मिक चिन्हांबाबत सहज वावरताना दिसतात. ते निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडताच, परंपरांवर तीव्र हल्ले होतात. राजकीय वातावरणानुसार श्रद्धा बदलू शकत नाही. महिलांचा सन्मान आणि स्वातंत्र्य ही कोणत्याही एका धर्माची किंवा पंथाची बाब नाही. ती वैश्विक घटनात्मक मूल्ये आहेत. याच निकषाची तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर चाचणी झाली. २०१९ मध्ये काँग्रेसने तिहेरी तलाकला शिक्षापात्र ठरवणाºया कायद्याला विरोध केला होता. जर महिलांचा सन्मान आणि स्वातंत्र्य ही वैश्विक मूल्ये असतील, तर त्यांच्या संरक्षणाचे निकषही वैश्विक असले पाहिजेत. जर एखादी प्रथा केवळ हिंदू परंपरेशी जोडलेली आहे म्हणून तिच्यावर होणारी टीका तीव्र असेल आणि तीच तीव्रता इतरत्र कमी होत असेल, तर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. घटनात्मकतेचा अर्थ सोयीसाठी मापदंड बदलणे असा नाही.


महिला सक्षमीकरणाची खरी कसोटी आजच्या राजकीय आणि सामाजिक सहभागात आहे. २०२३चा नारी शक्ती वंदन कायदा हे या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. द्रौपदी मुर्मू यांच्यापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंत, लष्कर, न्यायपालिका आणि अर्थव्यवस्थेतील महिलांची वाढती भूमिका बदलत्या भारताचे चित्र दर्शवते. हा भारत आपल्या भूतकाळाशी संलग्न आहे, पण त्याचा ओलीस बनत नाही. महिलांच्या प्रश्नाला केवळ मनुस्मृतीपुरते मर्यादित ठेवणे म्हणजे समस्येला संकुचित करणे ठरेल. आज शिक्षण, रोजगार, सुरक्षा आणि राजकीय प्रतिनिधीत्व हे केंद्रीय मुद्दे आहेत. राजकीय पक्षांनी या मुद्द्यांवर ठोस धोरणे तयार केली पाहिजेत. भूतकाळाचा निषेध करणे सोपे आहे.

वर्तमान बदलणे ही एक कठीण जबाबदारी आहे. हिंदू समाजात सुधारणेची गरज ओळखणे आणि संपूर्ण परंपरेला आव्हान देणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. भारतीय समाजाने राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या सुधारकांना स्वत:मधूनच जन्म दिला. परंपरेची शक्ती आत्मपरीक्षणात असते. सुधारणा ही परंपरेला विरोध करून नव्हे, तर तिच्या आतूनच शक्य आहे. मनुस्मृतीवरील चर्चेत दोन टोकाची भूमिका टाळली पाहिजे. ना आंधळा पाठिंबा योग्य आहे, ना एकाच श्लोकाच्या आधारावर संपूर्ण संस्कृतीला दोष देणे योग्य आहे. संस्कृती तिच्या उपलब्धी आणि मर्यादा या दोन्हींच्या संदर्भात समजून घेतली पाहिजे.


राहुल गांधींनी भारतीय संस्कृतीकडे ते कसे पाहतात हे स्पष्ट केले पाहिजे. त्यांना हिंदू परंपरेत केवळ ठराविक साचे दिसतात, की त्यात आत्म-सुधारणेची क्षमताही दिसते? संविधान आणि सांस्कृतिक परंपरा यांच्यातील संबंध ते कसे समजून घेतात? या प्रश्नांची उत्तरे एका घोषवाक्यात मिळू शकतात. ते या मागण्या मान्य करणार नाहीत. त्यांना एका स्पष्ट वैचारिक तत्त्वज्ञानाची गरज आहे. जर सुधारणांची चर्चा होत असेल, तर ती समान निकषांवर झाली पाहिजे. जर राजकारण होत असेल, तर ते स्पष्ट विचारांनी झाले पाहिजे. ही चर्चा मनुस्मृतीच्या पलीकडची आहे. आपण आपला इतिहास कसा वाचतो आणि कोणत्या शहाणपणाने वर्तमानात बदल घडवतो, हे यातूनच ठरेल. भारताला भूतकाळाबद्दलच्या आंधळ्या अभिमानाची किंवा त्याबद्दलच्या अपराधीपणाच्या भावनेची गरज नाही. देशाला इतिहासाची जाणीव, आत्मपरीक्षण आणि संविधानावरील अढळ श्रद्धेची गरज आहे. सभ्यतेचा आत्मविश्वास हा भूतकाळाची लाज बाळगण्यात नसून, तो समजून घेऊन पुढे जाण्यात आहे.

दशक दुसरा : समास दुसरा : उत्तम लक्षण


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील दुसºया दशकातील दुसºया समासात उत्तम लक्षणे सांगितली आहेत. यामध्ये व्यक्तिगत आणि सामाजिक नित्य व्यवहार आणि नैतिक आचरण यांचे वर्णन त्यांनी केलेले आहे. उत्तम गुण जर नीट समजले तर प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यास लागणारे सर्व ज्ञान होईल. प्रवासाला जायचे असेल तर वाट विचारल्याखेरीज जाऊ नये. फळ खायचे असेल तर ते ओळखल्यावाचून खाऊ नये. वस्तू पडलेली दिसली तरी ती चटकन उचलून घेऊ नये. फार वाद करू नये, मनामध्ये कपट ठेवून वागू नये, कुळशीलाची नीट चौकशी केल्यावाचून मुलीशी लग्न करू नये.


समर्थ म्हणतात की, विचार केल्याशिवाय बोलू नये, ध्यानात घेतल्यावाचून काम सुरू करू नये, नीतीधर्माच्या मर्यादा पाळल्याशिवाय हालचाल करू नये. प्रेम नसेल तेथे रुसू नये. चोराला ओळख विचारू नये, रात्री एकटेपणे प्रवास करू नये. लोकाशी सरळपणाचे वागणे सोडू नये, पापमार्गाने द्रव्यसंचय करू नये, नीतीधर्माचा मार्ग कधी सोडू नये.

येथे स्वामी म्हणतात की, कोणाची निंदा करू नये, कोणाचा द्वेष करू नये, वाईट संगत धरू नये, कोणाची बायको आणि संपत्ती बळजबरीने काढून घेऊ नये. वक्त्याला भलतेच प्रश्न विचारू नयेत. लोकात फूट पाडू नये, काही झाले तरी विद्याअभ्यास सोडू नये. तोंडाळ माणसांशी भांडू नये, वाचाळ माणसाशी वाद घालू नये. मनामध्ये सज्जनाची संगती विसरू नये. बेसुमार रागावू नये, प्रेमाच्या माणसांना दुखवू नये. दुसºयाकडून चांगले शिकण्याचा कंटाळा करू नये. पदोपदी रुसू नये, खोटे मोठेपण सांगू नये, केला नसेल तो पराक्रम सांगू नये. दिलेला शब्द विसरू नये, योग्य प्रसंगी बळाचा उपयोग केल्यावाचून राहू नये. आपण करून दाखवल्याशिवाय दुसºयाचा उपहास करू नये. आळसाचे सुख मानू नये, कोणाची चुगली चहाडी करण्याचे मनात सुद्धा आणू नये, सर्व बाजूंनी विचार केल्यावाचून कोणतेही काम करू नये. देहाला फार सुख, आराम देऊ नये, माणसाने प्रयत्न कधी सोडू नये, सतत श्रम करावे लागले तरी त्रासून जाऊ नये.


रामदास स्वामी या समासात सांगतात की, सभेमध्ये लाजू नये, पण आचरटपणे भलते बोलू नये, काही झाले तरी पैज मारू नये. कोणत्याही गोष्टीची फार काळजी करू नये, आळशीपणाने दिवस घालवू नये, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतलाच तर तो फेडल्यावाचून राहू नये, दुस‍ºयाला दु:ख देऊ नये, त्याचा विश्वासघात करू नये. स्वच्छतेशिवाय राहू नये, घाणेरडे वस्त्र नेसू नये, बाहेर जायला निघणाºयाला कुठे जातोस म्हणून विचारू नये. उदार दृष्टिकोन सोडू नये, दुसºयावर ओझे घालू नये, कोणाच्या आधीन होऊ नये. दस्तऐवज केल्याशिवाय कोणाशी देणे-घेणे करू नये, हलक्या माणसाकडून कर्ज घेऊ नये, साक्षीपुराव्याशिवाय कोर्टकचेरी करू नये. खोटी हुज्जत घालू नये, सगळी सभा खोटी ठरवू नये, जेथे आपल्याबद्दल आदर नाही तेथे साहजिकच आपण बोलू नये. महत्त्वाच्या गोष्टीची हेळसांड करू नये, अन्यायाशिवाय कोणाला त्रास देऊ नये, आपल्या अंगी शक्ती आहे म्हणून पाजीपणाने वागू नये. अतिआहार करू नये, फार झोप घेऊ नये, दुष्ट माणसाच्या घरी फार दिवस राहू नये. केवळ आपला माणूस म्हणून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये, आपला मोठेपणा आपण सांगू नये, गोष्टी सांगत असताना आपणच हसू नये.

येथे समर्थ सांगतात, धूम्रपान करू नये, मादक पदार्थ सेवू नयेत, बोहोचक किंवा चोंबड्या माणसाशी मैत्री करू नये. उद्योगावाचून राहू नये, कोणी टाकून बोलला तर सहन करू नये, वडिलांचेही अन्न मिंधेपणाने खाऊ नये. तोंडात शिवी असू नये, दुस‍ºयाला पाहून कुत्सितपणे हसू नये, चांगल्या कुळांतील माणसाच्या अंगी हीनपणा चिकटवू नये. पाहिलेली वस्तू चोरू नये, फार कंजुषपणा करू नये, प्रेमाच्या माणसांशी कलह करू नये.


स्वामी सांगतात की, कोणाचा नाश होईल असे त्याचे नुकसान करू नये, खोटी साक्ष देऊ नये, वेद, शास्त्र, संत आणि व्यवहार यांना अमान्य असे वर्तन कधीही करू नये. चहाडीची किंवा चोरीची इच्छा कधीही धरू नये, कोणाचेही कमीपण त्याच्या मागे बोलू नये.

समर्थ दासबोधात सांगतात, नुसत्या नीतीमान व्यवहाराने परमार्थ साधत नाही. त्यामध्ये भगवंताला स्थान हवे. प्रसंग पडेल तेव्हा दुस‍ºयास मदत देण्यास चुकू नये, सात्विक वृत्ती टाकू नये, शरण आलेल्या शत्रूला शिक्षा करू नये. थोडा अधिक पैसा मिळाला तर उन्मत्त होऊ नये, भगवंताच्या भक्तीला कधी लाजू नये, पवित्र अशा संतांच्या समोर अमर्यादेने कधी वागू नये. मूर्खाशी संबंध ठेवू नये, अंधारात हात घालू नये, निष्काळजीपणाने आपली वस्तू विसरू नये. स्नानसंध्या सोडू नये म्हणजे नित्योपासना सोड नये, कुळाचार मोडू नयेत, आळसाने व चुकारपणाने, अनाचाराने वागू नये. हरिकथा सोडू नये, प्रवचन टाळू नये, प्रपंचाच्या पायी परमार्थाकडे दुर्लक्ष करू नये.


देवाचा नवस फेडल्यावाचून राहू नये, आपल्या धर्माला विरोध करू नये, त्याला वाईट म्हणू नये, नीट विचार केल्यावाचून भलते काम करण्याच्या भरीला पडू नये. कठोरपणा करू नये, फार पाऊस असता किंवा वेळ योग्य नसता प्रवासाला जाऊ नये. योग्य वेळी उत्तर देण्यास टाळू नये. गुरूवाचून असू नये. ऐश्वर्य आणि आयुष्य कायम राहणारी समजू नयेत. खरा मार्ग सोडू नये, खोट्या मार्गाने जाऊ नये, खोट्याचा अभिमान कधी धरू नये. अपकीर्ती बाजूला सरावी, सत्कीर्ती वाढेल ते करावे, सत्याचा मार्ग विवेकाने घट्ट धरावा. जो मनुष्य हे उत्तम गुण घेत नाही तो अवलक्षणी बनतो, असे सांगून या समासाची समाप्ती समर्थ करतात.

प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा



Friday, September 4, 2026

आंधळ्या विरोधाची वैचारिक युती

पाश्चात्त्य जगाने नवउदारमतवादी हक्क, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, हवामान बदल आणि शाश्वत विकास यांसारख्या मुद्द्यांवर स्वत:ला जागतिक नैतिकतेचे रक्षक म्हणून दीर्घकाळापासून सादर केले आहे. तथापि, जेव्हा या आदर्शांची प्रत्यक्ष आचरणाशी पडताळणी केली जाते, तेव्हा त्यांच्या तथाकथित नैतिक श्रेष्ठत्वामागे लपलेला दुटप्पीपणा वारंवार उघड होतो. हा विरोधाभास आता केवळ त्यांच्या परराष्ट्र धोरणापुरता मर्यादित राहिलेला नाही. पाश्चात्त्य समाजांमध्ये डाव्या-उदारमतवादी विचारसरणी आणि मूलगामी राजकारण यांच्यातील वाढत्या वैचारिक एकत्रीकरणाचा परिणाम स्वातंत्र्य, बहुलवाद, धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक स्वातंत्र्य यांसारख्या मूल्यांच्या अर्थावरही होत असल्याचे दिसते. अमेरिकेत, जिथे अनेक दशकांपासून अभिव्यक्तिस्वातंत्र्याला आपल्या लोकशाहीचा आत्मा आणि मतभेद व्यक्त करण्याच्या अधिकाराला आपली सांस्कृतिक ओळख मानले जाते, तिथे एखाद्या विचाराची, संघटनेची किंवा व्यक्तीची स्वीकृती अनेकदा ती तेथील प्रचलित वैचारिक कथानकाशी सुसंगत आहे की, त्याच्याशी विसंगत आहे यावर अवलंबून असल्याचे दिसते.


न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे २९ आॅगस्ट रोजी आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ हा या बदलत्या चर्चेचा एक उल्लेखनीय नमुना होता. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक समुदायांमध्ये संवाद, सहअस्तित्व आणि ऐक्य वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण झाले. हा कार्यक्रम ‘अमेरिकन हिंदुज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’द्वारे आयोजित करण्यात आला होता आणि त्याला विविध हिंदू-अमेरिकन संघटनांनी पाठिंबा दिला होता. अमेरिकेतील विविध शहरांमधून आणि ३१ देशांमधून आलेल्या सुमारे ६,००० प्रतिनिधींच्या, तसेच २५०हून अधिक हिंदू-अमेरिकन संघटनांच्या सहभागाने या कार्यक्रमाची व्याप्ती अधोरेखित झाली. असे असूनही, न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी या कार्यक्रमावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि तो रद्द करण्याची मागणी केली. अखेरीस हा कार्यक्रम पार पडला आणि त्याने आपले घोषित उद्दिष्ट साध्य केले, परंतु त्याने एक मूलभूत लोकशाही प्रश्न उपस्थित केला. वक्त्याचे विचार आणि संघटना न ऐकताच अस्वीकार्य घोषित करणे, हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि बहुलवादाच्या तथाकथित अमेरिकन परंपरेशी सुसंगत आहे का?

या आंदोलनात ‘हिंदू फॉर ह्युमन राइट्स’ ही संघटनाही सक्रिय होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नावामध्ये ‘हिंदू’ हा शब्द असलेली ही संघटना भारत, हिंदुत्व आणि आरएसएसशी संबंधित मुद्द्यांविरुद्ध प्रचार करते. आरएसएस-भाजपला होणारा विरोध हा हिंदू समाजातूनच येत आहे, असे सुचवण्यासाठी या संघटनेचे नाव जाणीवपूर्वक निवडले गेले असावे, असे दिसते. त्याच्या कार्यकारी संचालक, सुनीता विश्वनाथ, या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ‘हाउडी, मोदी’ विरुद्धच्या आंदोलनांमध्येही सहभागी होत्या आणि ‘डिसमँटलिंग ग्लोबल हिंदुत्व’सारख्या मोहिमांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. २०२३ मध्ये वॉशिंग्टन येथे राहुल गांधींच्या थिंक-टँक संवादातही त्या उपस्थित होत्या. यावरूनच त्यांनी आरएसएस प्रमुखांच्या कार्यक्रमाला विरोध का केला हे सहज स्पष्ट होते.


न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी पंतप्रधान मोदी आणि इस्रायलशी संबंधित मुद्द्यांवर सातत्याने स्पष्ट राजकीय भूमिका घेतली आहे. २०२३ मध्ये त्यांच्या अमेरिका दौºयादरम्यान पंतप्रधान मोदींविरुद्ध जारी केलेले संयुक्त निवेदन, नागरिकत्व सुधारणा कायद्याला आणि जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याला असलेला त्यांचा विरोध, उमर खालिदला दिलेला त्यांचा पाठिंबा, आणि हमासला दहशतवादी संघटना म्हणून मान्यता देण्यास नकार व ‘ग्लोबलाईज द इंतिफादा’सारख्या घोषणांचा निषेध करण्याची त्यांची भूमिका, यावरून त्यांचा राजकीय दृष्टिकोन समजण्यास पुरेसे आहे. त्यांची मूलभूत श्रद्धा अमेरिकेच्या लोकशाही तत्त्वांवर आहे की, एखाद्या विशिष्ट धर्माच्या श्रद्धांवर, असा प्रश्न विचारणे अवास्तव ठरणार नाही. याच प्रकारच्या आंदोलनाच्या धर्तीवर, २६ आॅगस्ट रोजी, आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकी आयोगाचे पाकिस्तानी वंशाचे अध्यक्ष आसिफ महमूद यांनी मोहन भागवत यांच्या अमेरिका दौºयाला विरोध केला. आयोगाने भारताविषयीच्या आपल्या पूर्वीच्या विधानांमध्ये सीएए, एनआरसी, जम्मू आणि काश्मीर, उमर खालिद आणि शरजील इमाम यांनाही धार्मिक स्वातंत्र्याच्या चर्चेशी जोडले आहे. आंदोलनांची ही संपूर्ण मालिका म्हणजे केवळ काही तुरळक घटनांचा योगायोग आहे असे मानणे म्हणजे वास्तवाकडे दुर्लक्ष करण्यासारखे ठरेल.

न्यूयॉर्कमधील स्थानिक राजकारण, कार्यकर्त्यांच्या संघटना, भारतविरोधी मोहिमा आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली कार्यरत असलेल्या संघटनांमध्ये एक वैचारिक परिसंस्था दिसून येते, जिथे एका व्यासपीठावरील आरोप दुसºया व्यासपीठावर पुरावा बनतात. मग या आरोपांना तिसºया व्यासपीठाद्वारे वैधता दिली जाते आणि अखेरीस, एक सुनियोजित कथानक प्रस्थापित सत्य म्हणून सादर केले जाते. पण या सर्व आंदोलनांच्या दरम्यान, एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे मोहन भागवत न्यूयॉर्कमध्ये काय म्हणाले? त्यांनी स्पष्ट केले की, एकतेसाठी एकसारखेपणा आवश्यक नाही. मानवी श्रेष्ठत्व इतरांवर वर्चस्व गाजवण्यात नाही, तर जगाप्रति आपली जबाबदारी समजून घेण्यात आहे. त्यांचा संदेश हा भारताच्या शाश्वत सभ्यताविषयक दूरदृष्टीचे जागतिक सादरीकरण आहे, ज्याचे सार ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेत सामावलेले आहे.

दशक दुसरा : समास पहिला : मूर्खलक्षण


दासबोधातील दुसरा दशक हा मूर्खलक्षणनाम दशक म्हणून ओळखला जातो. यातील पहिल्या समासात मूर्खांची लक्षणे समर्थांनी सांगितलेली आहे. समासाचा आरंभ गणपती, शारदा व श्रीसद्गुरू यांना वंदन आणि श्रीरामस्मरण करूनच इथे समर्थांनी केलेला आहे. रामदास स्वामींनी या समासात, मूर्खांचे प्रकार आणि त्यांची अपार लक्षणे सांगितली आहेत. ते म्हणतात, जगातील मूर्खाचे प्रकार दोन, एक मूर्ख व दुसरा पढतमूर्ख. दोघांची लक्षणे ऐकून गंमत वाटेल. श्रोत्यांनी आदराने ती ऐकावीत आणि तयार विचार करावा. पढतमूर्खाची लक्षणे दहाव्या समासात सांगितली आहेत.


ज्यांना आत्मज्ञान नाही, जे अगदी अज्ञानी आणि म्हणून प्रपंचात जे संपूर्णपणे गुंतलेले असतात, अशा लोकांची ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. कामवासनेपायी अत्यंत स्त्रीअधीन जीवित जगणारा तो मूर्ख. ज्या आईबापांच्या पोटी जन्म घेतो त्यांच्यावरच उलटतो, आपल्या बायकोला जो एकमेव मित्र मानतो, इतर सर्व नातेवाइकांना बाजूस सारून जो बाईलबुध्या बनतो, आपले अंत:करण फक्त बायकोपाशीच उघड करतो, जो परस्त्रीवर प्रेम करतो, आपल्या सासुरवाडीस अनाहुत जाऊन राहतो, कुलशील न पाहता कोणत्याही मुलीशी लग्न करतो, तो माणूस मूर्ख समजावा.

मोठा अहंकरी, बढाईखोर, निंदक आणि व्यसनी असणारा तो मूर्ख असतो. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या माणसासमोर जो मोठ्या अहंकाराने वागतो, तो व आपण बरोबरीचे आहोत असे मनात समजतो, तसा अधिकार नसताना जो दुसºयावर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो, जो आपण स्वत:च आपली तारीफ करतो, एकीकडे घरी दुर्दशा भोगीत असतो तर दुसरीकडे आमचे पूर्वज व वाडवडील असे होते तसे होते, वगैरे बढाई मारतो तो मूर्ख.


काही कारण नसता जो उगाचच हसत सुटतो, दुस‍ºयाने दिलेला योग्य सल्ला जो ऐकत नाही, जो पुष्कळ लोकांशी वाकडा असतो. स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो, येता-जाता दुस‍ºयाची निंदा करतो, पुष्कळ जण जागत बसले असता जो मध्ये हातपाय ताणून झोपतो, दुस‍ºयाच्या घरी भरमसाट जेवतो, आपला मान किंवा अपमान जो स्वत:च्या तोंडाने उघड करतो, पुढील सात व्यसनांत (जुगार, बाहेरख्याल, चोरी, चहाडी, परस्त्री, पांखरांची झुंज आणि नायकिणीचे गाणे) मग्न असतो. तो माणूस मूर्ख समजावा.

स्वत:पेक्षा श्रेष्ठ असणा‍ºया माणसाशी जो फार सलगी करतो, हिताच्या गोष्टी कोणी सांगू लागला तर कंटाळतो, न ऐकणा‍ºया लोकांना जो शिकविण्याच्या प्रयत्न करतो, वडील माणसांपुढे आपला शहाणपणा मिरवतो, सज्जन माणसाला भानगडीत अडकवितो, कामवासना भोगण्यापायी जो एकाएकी लाजमर्यादा सोडतो आणि अत्यंत बेलगाम वागू लागतो, तो माणूस मूर्ख समजावा.


आपल्या पदरचा नोकर श्रीमंत झाला तर जो त्याचा गुलाम बनतो, सदासर्वकाळ अस्थिर चित्त असतो, कारणाचा नीट शोध न करता अपराध नसून जो शिक्षा करतो, थोडक्या खर्चासाठी भारी कंजूषपणा करतो, देवाची व वडील माणसांची जो पर्वा करीत नाही, अशक्त असला तरी वाचाळपणा करतो, काही घरबंध न पाळता जो अश्लील शब्द सर्रास वापरतो, जो घरांतील माणसांवर दातओठ खातो, पण बाहेर मात्र दिनपणे नरमाईने वागतो. तो माणूस मूर्ख समजावा.

दुस‍ºयाच्या बायकोशी एकांत करतो, रस्त्याने खात खात जातो, आपण कोणावरही उपकार करीत नाही, दुस‍ºयाने उपकार केला तर त्याची फेड जो अपकाराने करतो, करतो पण बोलतो फार, जो तापट, आळशी, खादाड, दुर्वर्तनी, कपटी आणि धारिष्टशून्य असतो, विद्या, वैभव, धन, पराक्रम, सामर्थ्य किंवा मान यांपैकी काही देखील जवळ नसून जो उगीच अभिमान मिरवतो, उद्धट, खोटा, लबाड, दुराचारी, वाकड्या बुद्धीचा व बेशरम असून जो बेसुमार झोप घेतो, जो उंच जागी जाऊन वस्त्र नेसतो, चव्हाट्यावर परसाकडेस बसतो, सदा बहुतेक नग्नप्राय असतो किंवा फिरतो, ज्याचे दात, डोळे, नाक, हात, कपडे व पाय नेहमी अस्वच्छ असतात, तो मूर्ख.


अपशकुनाने दुस‍ºयाचा घात करतो, तो माणूस मूर्ख समजावा. चंचल बुद्धीचा, स्वार्थी, पैशाला सर्वस्व मानणारा, ईश्वराला विसरणारा, दुर्जन संगतीत राहणारा, निंद्य वस्तू अंगीकारणारा, रागाने स्वत:चे नुकसान करणारा तो मूर्ख असतो. जो बुद्धीने अस्थिर असतो, जिवलग माणसांना जो अति दु:ख देतो, त्यांच्याशी कधी गोड शब्दही बोलत नाही, कोणी आश्रयाला आला तर त्यास दूर लोटतो, संपत्ती टिकेल या भरवशावर राहतो, भरदिवसा डोळे झाकतो म्हणजे ज्ञान असून मुद्दाम अज्ञानासारखा वागतो, तो मूर्ख.

दुसºयाच्या दु:खाने जो सुखी होतो, दुस‍ºयाच्या सुखाने दु:खी होतो, कोणाशी बोलताना आदर न ठेवता बोलतो, निंद्य वस्तूचा जो अंगीकार करतो, जो सरळ अनुमान सोडून बोलतो, आडमार्गाने जातो, जो आपली पत राखू जाणत नाहीं. अवघड पैज मारतो, कारण नसताना बडबडतो, पण जरूर असते तेव्हा जो मुक्यासारखा गप बसतो, तो मूर्ख.


हलक्या लोकांशी जो बरोबरीने वागतो, त्यांच्याशी बरोबरीने वाद घालतो, उत्तरास प्रत्युत्तर देतो, जो श्रेष्ठ माणसांचा मत्सर करतो, जी वस्तू मिळणे अशक्य आहे तिच्यासाठी हेवा करतो, स्वत:च्या घरात चोरी करतो, ईश्वराला सोडून जो माणसावर भरवसा ठेवतो, काही सार्थक न करिता आयुष्याचे दिवस वाया घालवितो, संसारात भोगाव्या लागणा‍ºया दु:खासाठी जो देवाला शिव्या देतो, आपल्या मित्राचा दोष लोकांत उघड करतो, श्रेष्ठ माणसांच्या मनातून जो उतरतो, सभेमध्ये किंवा बैठकीमध्ये जो नकोसा वाटतो, क्षणाक्षणाला ज्याचे मन बदलते, ज्याच्या सभेला आवरणारा नसतो, जो भ्रष्ट मार्गाने द्रव्य मिळवितो, आपला पैसा दुस‍ºयापाशी ठेवून जो लोकांच्या पैशाची हाव धरतो, घरी आलेल्या पाहुण्यास जो मदत करीत नाही, जो सदा सर्वकाळ चिंताग्रस्त असतो, दोन्ही हातांनी डोके खाजवितो, जलाशयांत जो चूळ टाकतो, पायाने पाय खाजवितो, तो मूर्ख असतो.

बायकोशी व मुलांशी जो फाजील बरोबरीने वागतो. जो परस्त्रीशी भांडणतंटा करतो, मुक्या प्राण्यांना शस्त्राने मारतो, मूर्खाची संगत करतो, कोणाचे भांडण चालू असेल तर जो पाहत उभा राहतो, ते सोडविण्याऐवजी त्याची गंमत पाहतो, जे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो, तो मूर्ख.


श्रीमंत झाल्यावर पूर्वीच्या माणसांची ओळख जो विसरतो, आपले काम होईपर्यंत जो अगदी नम्रपणे वागतो, पण दुस‍ºयाच्या कामाला उपयोगी पडत नाही, कांही वाचताना जो मुळांतील अक्षरे सोडून देतो किंवा स्वत:च्या पदरची घालून ते वाचतो, जो पुस्तकांची जोपासना करीत नाही, जो स्वत: कधी पुस्तक वाचीत नाहीं, दुसºया कोणाला वाचायला देत नाही, नुसते दप्तरात बांधून ठेवतो, तो माणूस मूर्ख समजावा.

समर्थ सांगतात की, ही मूर्खलक्षणे ऐकून मनुष्य चतुर होतो. शहाण्याने त्यांचा त्याग करावा. अशी ही मूर्खलक्षणे आहेत. ती ऐकल्याने मनुष्य चतुर बनतो. शहाणी माणसे लक्ष देऊन ती सदा ऐकतात. वास्तविक मूर्ख लक्षणे अगणित आहेत. श्रोत्यांनी त्यांचा त्याग करावा म्हणून माझ्या बुद्धीला सुचली ती लक्षणे मी येथे सांगितली. त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. आपण उत्तम लक्षणे घ्यावी. मूर्ख लक्षणे सोडून द्यावी.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


Thursday, September 3, 2026

मतभेद टोकाच्याही मर्यादा ओलांडत आहेत


जेव्हा पंतप्रधान मोदींनी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ७.८ टक्के जीडीपी वाढीच्या दरावर आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, जागतिक अनिश्चितता आणि आव्हाने असूनही, ही वाढ देशातील लोकांच्या सामूहिक शक्ती आणि आर्थिक आत्मविश्वासाचा परिणाम आहे, तेव्हा काँग्रेस यावर पूर्णपणे नाराज झाली. त्यांनी अर्थव्यवस्थेतील विविध कमकुवतपणा दाखवून मोदी सरकारला लक्ष्य केले. आर्थिक आघाडीवर समस्या नाहीत असे नाही, पण काँग्रेस पक्षाचा उद्देश त्या समस्यांची यादी करणे हा नव्हता, तर जीडीपी वाढ ही काही उपलब्धी नव्हती हे सिद्ध करणे हा होता. हे काम त्यांनी पूर्ण ताकदीनिशी केले आणि त्यासाठी अनेक प्रवक्त्यांना कामाला लावले. अर्थात, विरोधी पक्षाने सरकारची प्रशंसा करावी अशी अपेक्षा कोणीही करू नये. त्यातून काँग्रेसकडून तर कधीच अपेक्षा ठेवता येणार नाही.


सरकारच्या उणिवा दाखवून देणे आणि त्यांच्या चुकांसाठी सरकारला जबाबदार धरणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. यामुळेच सरकारांवर दबाव येतो आणि त्यांना योग्य कृती करण्यास भाग पाडले जाते. तथापि, गेल्या दोन दशकांत, विरोधाच्या राजकारणाने आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि केवळ विरोधासाठी विरोधाच्या राजकारणात त्याचे रूपांतर झाले आहे.

केवळ विरोधासाठीच्या या विरोधाच्या राजकारणामुळे राजकीय वातावरण इतके कटु, टीकात्मक आणि नकारात्मक झाले आहे की, जर एखाद्या नेत्याने ‘नियमांचे पालन करा’ आणि संयम व शिस्त बाळगा असे काही म्हटले, तर विरोधी पक्षाचे नेते त्याला विरोध करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांच्याकडे विविध प्रकारचे युक्तिवादही असतील. कटू आणि नकारात्मक राजकीय चर्चेचा सामाजिक चर्चेवरही परिणाम होत आहे. ही एक वस्तुस्थिती आहे की, सोशल मीडिया नावाच्या डिजिटल माध्यमांवर चर्चेची जागा शिवीगाळीने घेतली आहे. याचे कारण असे की, राजकीय पक्षांचे आयटी सेल विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वारंवार खालच्या पातळीचे, अपमानजनक हल्ले करतात. आता असे हल्ले करण्यासाठी एआयचा वापर केला जात आहे, ज्यात अनेकदा महिला नेत्यांना लक्ष्य केले जाते. परिणामी, राजकीय आणि सामाजिक वातावरण गंभीरपणे प्रदूषित होत आहे. हे प्रदूषण कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कटू राजकारणाने थोर पुरुषांमध्येही फूट पाडली आहे. राजकीय आणि सामाजिक पातळीवर, लोकांना आता कोणत्याही राष्ट्रीय जबाबदारी किंवा मोहिमेवर एकमत आणि एकजूट साधणे कठीण जात आहे, जरी देशाच्या अनेक समस्या, जसे की सार्वजनिक ठिकाणची घाण साफ करणे, केवळ सामूहिक सार्वजनिक सहभागातूनच सोडवता येतात.


स्वच्छ भारतसारख्या मोहिमा निष्प्रभ ठरत आहेत, कारण पूर्वीसारखा जनतेचा सहभाग आता राहिलेला नाही. जेव्हा ही मोहीम सुरू झाली, तेव्हा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी सामान्य जनतेमध्ये स्पष्ट रस आणि सहभाग दिसून येत होता, पण आता तो नाही. ही एक अशी मोहीम आहे, जी सामान्य जनतेच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी जर लोक सक्रियपणे आणि दक्षतेने सहभागी झाले नाहीत, तर सरकार आणि त्यांच्या यंत्रणांनी काहीही केले तरी त्याचा उपयोग होणार नाही.

गंमत म्हणजे, ही मोहीम सुरू झाल्यापासून, क्वचितच एखाद्या विरोधी पक्षनेत्याने आपल्या लोकांना ती यशस्वी करण्यासाठी सहभागी होण्यास प्रेरित केले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या मोहिमांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. विरोधी राजकीय पक्षांना वाटते की, ज्या पक्षाने या मोहिमा सुरू केल्या आहेत, केवळ त्याच पक्षाच्या लोकांनी त्यात सहभागी होण्याची गरज आहे. कदाचित यामुळेच ‘हर घर तिरंगा’सारख्या मोहिमांमध्येही सर्व राजकीय पक्षांचा सहभाग नसतो. विरोधी राजकीय पक्ष आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी कोणताही उत्साह दाखवतील की नाही, याबद्दल गंभीर शंका आहे. मोदी सरकार हटवताच या दिवसाचे आयोजन बंद केले गेले, तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. मोदी सरकारने घेतलेले सगळे निर्णय बदलले जातील. अगदी ३७० कलम पुन्हा लादून काश्मीरला भारतापासून तोडण्याचे कामही विरोधक सत्तेत आल्यावर केल्याशिवाय राहणार नाहीत.


ही वस्तुस्थिती आहे की, सार्वजनिक सहभाग असलेल्या अनेक सामाजिक मोहिमा केवळ मोदी सरकारच्या मोहिमा बनल्या आहेत. ही परिस्थिती अशा वेळी निर्माण झाली आहे, जेव्हा देशाला अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, ज्या केवळ सार्वजनिक सहभागातूनच सोडवल्या जाऊ शकतात. संकट हे आहे की, राजकीय पक्ष आता संसदेत आणि बाहेरही कोणत्याही मुद्द्यावर सहमत होत नाहीत. जरी या उद्देशासाठी राष्ट्रीय एकात्मता परिषद नावाचे एक व्यासपीठ असले तरी, ते बºयाच काळापासून निष्क्रिय आहे. या निष्क्रिय व्यासपीठाला सक्रिय करण्याची हीच योग्य वेळ आहे. राष्ट्रीय एकात्मता परिषद ही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील एक घटनाबाह्य संस्था आहे.

त्याच्या सदस्यांमध्ये सर्व मुख्यमंत्री, राजकीय पक्षांचे नेते, विविध आयोगांचे अध्यक्ष आणि उद्योग, व्यापार, प्रसारमाध्यमे व कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. त्याची स्थापना १९६१ मध्ये झाली होती. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी याची स्थापना केली म्हणून हे व्यासपीठ निष्क्रिय आहे का? काहीही असो, हे लक्षात घेतले पाहिजे की, जातीयवाद, प्रादेशिकता, भाषिक श्रेष्ठत्ववाद आणि संकुचित वृत्ती यांसारख्या समस्यांवर तोडगा काढणे हा परिषदेचा उद्देश होता. आजही या समस्यांना तोंड देण्याची गरज आहे हे कोणीही नाकारू शकत नाही आणि हे केवळ सर्वांच्या सहकार्यानेच साध्य होऊ शकते.