जेव्हा लडाखी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि नीटसह केंद्रीय परीक्षांमधील अनियमितता दूर करण्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतरवर बसलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या गटासोबत उपोषण सुरू केले, तेव्हा त्यांच्या वक्तव्यावरून असे सूचित झाले की, ते दूरचा विचार करत होते; शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा ही केवळ सुरुवात आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर काही कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते त्यांना भेटू लागले. सोनम वांगचुक यांनी जंतरमंतर येथील सुरू असलेल्या मोहिमेचे राजकारण करण्यास सुरुवात केली. त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर सोमवारी हा गट संसदेच्या दिशेने मोर्चा घेऊन गेला. उपस्थितांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले. या सर्व प्रकारामुळे असा संशय निर्माण होतो की, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या नावाखाली एक राजकीय आंदोलन सुरू केले जात आहे आणि सरकार बदलण्याचा हा एक प्रयत्न आहे.
राजकीय आंदोलन सुरू करण्यात किंवा सत्तापालट साधण्यात काहीही चुकीचे नाही, परंतु यासाठी शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थ्यांना साधन म्हणून वापरणे ही दुहेरी चूक आहे. यामुळे शिक्षणासारखा गंभीर विषय पक्षीय राजकारणाचा बळी ठरतो. ज्या विषयाला राजकारणापासून दूर ठेवून सुधारण्याची आणि व्यवस्थापित करण्याची गरज आहे, तो केवळ दुर्लक्षितच राहत नाही, तर त्याची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असते.
१९७४ पासून विद्यार्थी आणि तरुणांचा पक्षीय राजकारणासाठी वापर केला जात असल्याचे वारंवार दिसून आले आहे. जर सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाºयांचा हा हेतू नसेल, तर त्यांनी शैक्षणिक विषयावर लक्ष केंद्रित करायला हवे होते आणि त्याच्या विविध पैलूंवर पूर्ण लक्ष द्यायला हवे होते. शिक्षण क्षेत्राने पक्षीय राजकारणापासून स्वत:ला पूर्णपणे वेगळे ठेवून, सुधारणेचा आराखडा तयार करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता. यामुळे धोरणकर्त्यांनाही मदत झाली असती. याउलट केवळ शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. शैक्षणिक संस्थांची पवित्रता, शैक्षणिक साहित्याचा दर्जा, प्रतिभेला योग्य प्रोत्साहन, पात्र शिक्षकांची नियुक्ती आणि सर्व समस्यांचे निराकरण याकडे लक्ष दिले गेले तरच कोणताही खरा प्रयत्न अर्थपूर्ण ठरेल.
याउलट राजीनाम्याचा आग्रह, विविध लोकांचे एकत्र येणे, हास्यास्पद चिथावणीखोर वक्तव्ये आणि राजकीय आंदोलन सुरू करण्याचे उघड व छुपे संकेत, या सर्वांमधून भोळ्या विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे शोषण करण्याचा हेतू दिसून येतो. हे शिक्षणाच्या दृष्टीने हिताचे नाही. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी तर याच मुद्द्यावर गांधीजींनाही फटकारले होते. जर शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणायची असेल आणि ते गुणवत्तापूर्ण बनवायचे असेल, तर त्याला पक्षीय राजकारणापासून दूर ठेवणे ही पहिली अट आहे. अन्यथा, पक्षीय राजकारण आणि सत्तापालटाची इच्छा सर्व लक्ष इतर गोष्टींकडे वळवेल. मूळ मुद्दा बाजूला सारला जाईल. भारतात आणि परदेशातही अनेक ठिकाणी यापूर्वीही असे अनेकदा घडले आहे. जेपी आंदोलन आणि अण्णा आंदोलन या दोन्हींचा इतिहास हे स्पष्टपणे दाखवून देतो. दोघांनीही सामाजिक प्रश्न उपस्थित केले, ज्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण सामील होते, ज्यांच्यात आदर्शाची तीव्र भावना होती. तथापि, दोन्ही वेळेस केवळ सत्तेच्या लालसेने प्रेरित झालेल्या नेत्यांनी या आंदोलनांचा गैरफायदा घेतला.
स्वार्थी नेते जेपी आणि अण्णांच्या पाठीवर स्वार झाले. जेपी म्हणजे जयप्रकाश नारायण आणि अण्णा हजारे लगेचच त्यातून मागे पडले. त्यांच्या आधीही तो मुद्दा सोडून दिला गेला आणि बाजूला सारला गेला. सत्तालोभी घटकांनी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा गैरफायदा घेतला, तर मूळ मुद्दा तसाच न सुटलेला राहिला. अण्णा हजारे यांनी १५ वर्षांपूर्वी याच जंतरमंतरवर सुरू केलेल्या भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनाचे काय झाले? तेव्हापासून भ्रष्टाचारात काही बदल झाला आहे, असे आज कोणी म्हणू शकेल का? अण्णा आंदोलन निष्फळ ठरले, कारण समस्येच्या तपशिलाचे गांभीर्याने परीक्षण करून वास्तववादी तोडगा काढण्याऐवजी केवळ प्रसिद्धी, गदारोळ आणि आवेशावर लक्ष केंद्रित केले गेले, ज्याचा अनुभवी नेत्यांनी गैरफायदा घेतला.
तो मुद्दा आणि अण्णा आंदोलन दोन्ही पार्श्वभूमीवर ढकलले गेले. वांगचुक आणि त्यांच्या सहकाºयांना या अलीकडच्या इतिहासाची जाणीव नाही का? याचे उत्तर फक्त त्यांनाच माहीत आहे, पण हे निश्चित आहे की कोणत्याही सामाजिक-सांस्कृतिक मुद्द्याला पक्षपाताशी जोडल्यास त्याचे विकृतीकरण अटळ आहे. शिक्षणाच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण होणे हे तर अधिकच दुर्दैवी ठरेल, कारण त्यामुळे हजारो निरागस विद्यार्थ्यांचा साधा विश्वास भंग पावतो. मग, पुढची पिढी आशेने उभी राहीपर्यंत जवळजवळ एक संपूर्ण पिढी निराशेच्या गर्तेत लोटली जाते.
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याला ‘सुरुवात’ म्हणणे हे राजकीय पक्षपातीपणाचा संकेत देण्यापलीकडे काहीही करत नाही. जर सीजेपीला राजकीय पक्षपातीपणा करायचा असेल, तर त्यांनी शिक्षणाचा साधन म्हणून वापर करू नये. जर सरकारला खरोखरच दर्जेदार आणि गैरव्यवहारमुक्त शिक्षणाची काळजी असेल, तर त्यांनी त्या चिथावणीखोर समर्थकांना निरोप दिला पाहिजे, जे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने केवळ सध्याच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढू इच्छितात.
जंतरमंतर येथे दूरदूरवरून आलेल्या आदर्शवादी विद्यार्थी आणि तरुणांसोबतच असेही काही जण होते जे चिथावणी देण्याच्या आणि पोलीस व प्रशासनाशी हेतुपुरस्सर संघर्ष करण्याच्या उद्देशाने आले होते. चिथावणी आणि संघर्षामुळे अनेकदा मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित होण्याचा धोका असतो. काही आंदोलकांची नेमकी हीच इच्छा असते. त्यांना केवळ प्रसिद्धी मिळवायची असते आणि सरकारला अस्थिर करायचे असते. असा उद्देश शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. खरे तर, केवळ वांगचुक आणि त्यांच्या सहकाºयांनीच नव्हे, तर सर्व जबाबदार नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, शिक्षणाचे क्षेत्र हे चिकित्सक विचारांचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. हा एक गंभीर मुद्दा आहे, जो सर्व नागरिकांवर अटळपणे परिणाम करतो. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील जागरूक नेत्यांनी शिक्षणाला राष्ट्रीय प्रश्न मानून त्याला संकुचित स्वार्थाच्या विळख्यातून वाचवले पाहिजे. अन्यथा हे राष्ट्राच्या सर्वात मौल्यवान संसाधनांपैकी एकाला भ्रष्ट करण्यासारखेच ठरेल. याचे परिणाम सर्वांसाठी हानिकारक असतील.