Monday, June 16, 2025
spot_img

इस्लामिक जगातही पाकीस्तान दुर्लक्षित

पाकिस्तानने व्यापलेल्या काश्मीरसह पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने चालवलेले आॅपरेशन सिंदूर हे भारताच्या लष्करी पराक्रमाचे उदाहरण आहे. इस्लामिक देशांसह जगातील अनेक देशांनी भारताच्या या कारवाईला पाठिंबा दिला असला, तरी तुर्की आणि अझरबैजान हे दोन प्रमुख मुस्लीम-इस्लामिक देश होते. ज्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. बाकी सगळ्या इस्लामी देशांनी पाकिस्तानकडे दुर्लक्ष केले आणि भारताच्या बाजूने राहिले. आज पाकिस्तानने आपल्या दहशतवादाचा वापर धर्मासाठी केलेला असला आणि पहलगाम हल्ल्यात धर्माचा वापर करून एकेक हिंदूंना मारण्याचे दुष्कृत्य केले असले, तरी अनेक विकसित आणि विकसनशील अशा इस्लामी राष्ट्रांनी पाकिस्तानच्या या कृतीचा निषेधच केलेला आहे. पाकिस्तानच्या या दहशतवादाचे समर्थन केलेले नाही. हा गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात निर्माण केलेल्या मैत्री धोरणाचा विजय आहे.

तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एदोर्गान यांनी पाकिस्तानी दहशतवादी संघटनांविरुद्ध भारताच्या कारवाईवर पाकिस्तानचे समर्थन केले आणि म्हटले की, हल्ल्यात प्राण गमावलेल्या माझ्या भावांवर मी देवाची दया मागतो. तुर्कीचा हा दृष्टिकोन आश्चर्यकारक होता, कारण २०२३ मध्ये झालेल्या भूकंपादरम्यान भारताने ‘आॅपरेशन दोस्त’अंतर्गत तत्काळ मदत पाठवली होती. तथापि, तुर्कीच्या या दृष्टिकोनाला पाकिस्तानसोबतची धार्मिक एकता म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही.

पाकिस्तान आणि तुर्की दोघेही राजकारण आणि रणनीतीला धर्माचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. एदोर्गान यांच्या नेतृत्वाखाली, तुर्की इस्लामिक जगात आपली प्रमुख भूमिका प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर पाकिस्तानदेखील इस्लामिक ओळखीला त्याचा वैचारिक पाया म्हणून सादर करत आहे. याचे उदाहरण म्हणजे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे विधान, ‘मानवतेच्या संपूर्ण इतिहासात, ‘कलिमा-ए-तय्यबा’च्या आधारे अस्तित्वात आलेले फक्त दोन देश आहेत. पहिला रियासत-ए-तय्यबा होता, ज्याला आज जग मदीना (सौदी अरेबिया) म्हणून ओळखते आणि सुमारे १३०० वर्षांनंतर, अल्लाहने या कलमाच्या आधारे दुसरा देश पाकिस्तान निर्माण केला.’ हे विधान इतर इस्लामिक देशांना पसंत पडले नाही. या विधानामुळे पाकिस्तानच्या विचारसरणीची झलक दिसते, जी तुर्कीच्या ‘नवीन आॅट्टोमन’ विचारसरणीशी जुळते, परंतु ती इस्लामिक बंधुता नाही. यामागे तुर्कीचे धोरणात्मक हितसंबंध आणि लष्करी-औद्योगिक व्यवहार आहेत. तुर्की पाकिस्तानला ड्रोन, युद्धनौका आणि संरक्षण प्रशिक्षण देणगी म्हणून नाही, तर पैशांच्या बदल्यात देते.

मध्य आशियाई देश अझरबैजानदेखील पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी पुढे आला. आॅपरेशन सिंदूरवर अझरबैजानने म्हटले की, आम्ही इस्लामिक रिपब्लिक आॅफ पाकिस्तानवरील लष्करी हल्ल्यांचा निषेध करतो. अझरबैजानचा पाकिस्तानला पाठिंबा धार्मिक भावनांमुळे नाही, तर राजनैतिक भागीदारीचे प्रतीक आहे. नार्गोनो-काराबाख संघर्षात अझरबैजानला बिनशर्त पाठिंबा देणारा पाकिस्तान हा पहिला देश होता आणि आजपर्यंत त्याने आर्मेनियाला मान्यता दिलेली नाही.

पाकिस्तानच्या पाठिंब्याच्या बदल्यात, अझरबैजानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. भारताने अझरबैजानच्या शेजारील देश आर्मेनियाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत, जे अझरबैजानला आवडत नाही. हेच कारण आहे की, अझरबैजानचा पाकिस्तानला पाठिंबा आता केवळ मैत्रीपूर्ण राहिला नाही तर तो एक गरज बनला आहे. तुर्की आणि अझरबैजानप्रमाणेच, एकेकाळी मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनीही काश्मीर मुद्द्यावर उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. तथापि, त्यांच्यानंतर आलेल्या सरकारने काश्मीरच्या बाबतीत संतुलित परराष्ट्र धोरण स्वीकारले. भारताचा राग त्याच्या आर्थिक नुकसानाचे कारण बनू शकतो. म्हणूनच ते तुर्की आणि अझरबैजानइतके उघडपणे पाकिस्तानसोबत उभे राहिले नाही.

पाकिस्तानला तुर्की आणि अझरबैजानसारख्या निवडक देशांकडून पाठिंबा मिळत असूनही, भारताने दहशतवादाविरुद्ध निर्णायक भूमिका घेतली. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीसारखे प्रमुख इस्लामिक देश पहलगाम हल्ल्याचा निषेध करणाºया पहिल्या देशांमध्ये होते. यावरून हे स्पष्ट होते की, इस्लामिक जग पाकिस्तानच्या समर्थनात एकजुटीने उभे राहिले नाही. कदाचित म्हणूनच त्यांचा पराभव झाला. यासोबतच, भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, जागतिक व्यासपीठांवरील त्याची नेतृत्व क्षमता आणि वसुधैव कुटुंबकमची विचारसरणी हा संदेश देत आहे की, भारत कोणासाठीही धोका नाही, तर शांतता, सहकार्य आणि विकासात भागीदार आहे.

पाकिस्तानला पाठिंबा देणाºया तुर्की आणि अझरबैजानबाबत भारत सरकार कोणते धोरण स्वीकारते हे भविष्यात कळेल, परंतु लष्करी संघर्ष संपल्यानंतरही या दोन्ही देशांना सामान्य भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मोठ्या संख्येने भारतीय पर्यटनासाठी तुर्की आणि अझरबैजानला जातात. इंटरनेट मीडियावर भारतीयांनी या दोन्ही देशांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली. एवढेच नाही तर एकामागून एक भारतीय प्रवासी कंपन्यांनी तुर्की आणि अझरबैजानसाठी त्यांचे बुकिंग थांबवल्याची घोषणा केली. या कंपन्यांनी भारतीयांना इतर देशांमध्ये प्रवास करण्यास प्रवृत्त करण्यास सुरुवात केली आहे. या देशांच्या पर्यटन उद्योगासह त्यांच्या विमान कंपन्यांनाही भारतीयांच्या रोषाचा फटका सहन करावा लागेल. त्यामुळे या एकंदरीत वातावरणात पाकिस्तानला सगळ्या इस्लामी जगतानेही स्वीकारलेले नाही. ते भारताच्या बाजूने आणि समर्थन करणारे देश आहेत. आज पाकिस्तानला प्रगती करण्याची कोणतीही संधी नाही, उपासमार आणि भीकेकंगाल अशी अवस्था झालेली असल्याने उपाशी मरायचे ते दहशत माजवून मरायचे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी दहशतवाद पोसला आहे. धर्मासाठी जीवावर उदार होणारी यंत्रणा निर्माण करून जगभर दहशतवाद माजवणे हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे संपूर्ण इस्लाम धर्म हा दहशतवादी आहे, असा संदेश पाकिस्तान पोहोचवत आहे. नेमके यामुळेच बाकीच्या इस्लामी देशांनी पाकला जवळ केले नाही.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी