Sunday, February 1, 2026
spot_img

तेव्हापासून…

 

 

राजकारण म्हटलं की महत्त्वाकांक्षा आलीच. मग ती तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असो वा राज्याच्या. अशीच एक महत्त्वाकांक्षा नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही व्यक्त केली. पाटील यांनी एका मुलाखतीत ‘आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं’, असं म्हटलं होतं. अर्थात तो त्या मुलाखतकर्त्याने ‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का’ विचारल्यावर त्यांनी ‘हो’ म्हटले. कोणालाही वाटणारच, पण माध्यमांनी मात्र ती फार मोठी महत्त्वाकांक्षा वगैरे असे काही नाही, पण त्यावरून एक हवा निर्माण करण्याची संधी साधली. त्यावर लगेच अजित पवारांना काय वाटते, रोहित पवारांना काय वाटते, विरोधी पक्षाच्या नेत्यांना काय वाटते, मुख्यमंत्र्यांना काय वाटते, अशा प्रतिक्रिया घेण्याचा प्रकार केला तो अत्यंत हास्यास्पद होता. नको इतके महत्त्व त्याला दिले गेले.

शरद पवारांनीही हे कारण नसताना वाढवलेल्या प्रसारमाध्यमांच्या आगाऊपणाला तसेच उत्तरे दिले. शुक्रवारी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील जी इच्छा व्यक्त केली, त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी, त्यात काय झालं? त्यांना शुभेच्छा. उद्या मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटेल, कोणी तसे करणार का? असा उलट प्रश्न पत्रकारांना विचारला. पवारांनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक असणाºया नेत्यांना द्यायचा तो संदेश दिला.

वास्तविक मुख्यमंत्री होण्याची काँग्रेसच्या राजकारणात प्रत्येकाला इच्छा असते. १९८० च्या दशकात तर काँग्रेसचा कोण मुख्यमंत्री केव्हा होईल याचा नेम नसायचा. वरून मनात आले तर कोणालाही लॉटरी लागत होती. त्यामुळे प्रत्येकाला वाटायचे आपणही मुख्यमंत्री होणार. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ मस्त कथा सांगायचे. एका सभेत त्यांनी व्यासपीठावर मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाºया काँग्रेस नेत्यांच्या समोर एक किस्सा सांगितला होता. एक राजा शिकारीला निघालेला असतो. तेव्हा वाटेत एक कुंभार त्याला नमस्कार करतो. ‘महाराज कुठे निघालात’ असे विचारतो. राजा सांगतो, ‘शिकारीला चाललो आहे’. त्यावर तो कुंभार म्हणतो, ‘पण आता पावसाचे चिन्ह आहे, शिकारीला कसे जाणार?’ तेव्हा तो राजा म्हणतो, ‘आमच्या हवामान खात्याने आज बिल्कूल पाऊस पडणार नाही, असे सांगितले आहे. मग तू कसा सांगतोस?’ असे म्हणून राजा जंगलात शिरतो. काही वेळातच ढग जमतात आणि पावसाला सुरुवात होते. राजाला माघारी यावे लागते. तो आश्चर्याने दुसºया दिवशी दरबारात त्या कुंभाराला बोलावून घेतो. ‘आजपासून तुला राज्याचा मुख्य मंत्री करणार आहे. कारण आमच्या एकाही मंत्र्याला पावसाचा अंदाज आला नाही, त्यांची यंत्रणा बरोबर नाही. त्यामुळे तू आजपासून राज्याचा मंत्री’. कुंभार म्हणाला, ‘महाराज आपल्याला त्यातलं काही कळत नाही. पण माझं गाढव आहे. ते पाऊस येणार असेल तर आपले कान हलवते आणि मला समजते’. राजा खूष झाला. त्यानं सांगितलं की, ‘ठीक आहे. मग तुझ्या गाढवालाच मी मुख्य मंत्री बनवतो’ आणि खरोखरच गाढवाला तो राजा मंत्री बनवतो, पण त्यामुळे झाले काय, राज्यातील सगळ्या गाढवांना स्वप्न पडू लागली की आपणही मुख्यमंत्री होणार. बॅ. गाडगीळांनी बस हा किस्सा ऐकवल्यावर उपस्थितांमध्ये हशा यायचाच, पण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सगळे नेतेही खजील व्हायचे, पण आज राष्ट्रवादीत असे स्वप्न पाहिले जात असले तरी ते मूळचे काँग्रेसचे रक्त आहे. त्यामुळे हा किस्सा तिथेही लागू होतो, पण कारण नसताना माध्यमांनी राईचा पर्वत बनवल्याने जयंतरावांना मात्र मनस्ताप झाला असण्याची शक्यता आहे.

खरं तर राजकारणात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाकांक्षा लागते, पण नुसती महत्त्वाकांक्षा नाही तर सतत कर्म करत राहणे महत्त्वाचे असते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७ या गीतेतील श्लोकाप्रमाणे फळाची अपेक्षा न करता जो काम करतो त्याला फळ मिळते. तसे मुख्यमंत्री बनण्यासाठी राष्ट्रवादीत किती उत्सुक आहेत याची गणतीच नाही. या सगळ्यांना आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. त्यात अजितदादा पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील असे अनेकजण होते. मोहिते-पाटील यांनी पक्ष बदलला असला, तरी राष्ट्रवादीची ही यादी काही कमी झालेली नाही. आता नव्या इच्छुकांच्या यादीत जयंत पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे असे कितीतरी आहेत, पण हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोणत्याही पक्षाला आपले संख्याबळ जास्तीत जास्त वाढवण्याची गरज असते. नाहीतर मग फळाची अपेक्षाच करायची नाही. जे काही पदरात पडते आहे ते गोड मानून काम करायचे तत्त्व असले पाहिजे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी गहिवरून सांगितले होते की, सुरुवातीला सरपंच झालो होतो, पण काँग्रेसने मला सरपंचपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवले. तेव्हापासून राज्यातल्या प्रत्येक सरपंचाला वाटू लागलं होतं की, आपणही कधीतरी मुख्यमंत्री होऊ. त्यामुळे स्वप्न पाहणं वाईट नाही, पण ते पूर्ण होणं मात्र सुप्रिमोंच्या हातात असते, कोणत्या गोष्टीने ते दुखावतील आणि आमटीत पडलेल्या झुरळाप्रमाणे झटकून दूर करतील हे सांगता येत नसते. त्यामुळे असे स्वप्न जरी असले तरी त्याची जाहीर वाच्यता राजकारणात करणेही आजकाल अवघड होऊन बसले आहे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी