Monday, February 2, 2026
spot_img

मानवतावादी एस. एम. जोशी

 


 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वार्थाकडे दुर्लक्ष करून देशार्थासाठी कार्यरत राहणे हे समाजवादी नेते एस. एम. जोशींनी दाखवून दिले. त्यांनी असेच वागा सांगितले नाही, मात्र आपले कार्य तसेच ठेवले. आज त्यांचा स्मृतिदिन. या राज्याने किती नीतीवान आणि चांगले नेते दिले याचा विचार केला, तर एस. एम. जोशींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. १९५७ साली ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार झाले आणि १९६७ साली ते लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून गेले, पण आपला साधेपणा हा त्यांच्या रक्तात अखेरपर्यंत होता. हे आजच्या नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

घरात दोन वेळच्या जेवणाची पंचाईत असताना आणि स्वत:चेच दु:ख डोंगराएवढे असतानाही देशहिताच्या गोष्टी करण्याची इच्छा त्यांना लहानपणापासूनच होती. जो दुबळा आहे, त्याच्या बाजूने आपल्या तत्त्वांची ताकद उभा करणारा हा लढवय्या अगदी लहानपणापासून जागृत होता. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी शिकविणाºया एका मास्तरांनी एस. एम. जोशींच्या वर्गातील एका चेहºयावर देवीचे व्रण असणाºया विद्यार्थ्याला मागे बसायला सांगितले. तेव्हा एस. एम. जोशींनी त्या शिक्षकांना जाणिव करून देण्याचे ठरवले. हा प्रसंग त्यांच्या इतरांसाठी लढण्याच्या आणि आपल्या न्यायी वृत्तीचे दर्शन घडवितो. त्या मास्तरांना त्यांच्या तासाला छान दिसणाºया मुलांनीच पुढे बसावे असे वाटायचे. म्हणून मास्तरांनी त्या विद्यार्थ्याला मागे बसायला सांगितले. एस. एम. जोशींनी याला विरोध केला. विशेष म्हणजे मास्तरांचा अपमान न करता समर्पक कारण देऊन त्यांनी त्या विद्यार्थ्याला हट्टाने पुढेच बसवायला लावले. ज्यांना समाज चुकीच्या कारणासाठी नाकारतो, त्यांना स्वीकारण्याची मानवतावादी दृष्टी एस. एम. यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भागच होती हे सांगणारा हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.

देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपापल्या परीने आणि मार्गाने प्रत्येक जण लढत होता. जहाल मवाळांच्या अखंड प्रयत्नातून आशेचा किरण सामान्यांच्या नजरेच्या टप्प्यात येत होता. हे प्रयत्न, राष्ट्रभक्तीचे वातावरण या सर्वांविषयी एस. एम. यांना विलक्षण ओढ होती. चिरोल खटला लढवून परत आलेल्या लोकमान्य टिळकांची मिरवणूक पाहण्यासाठी गेल्यामुळे त्यांना छड्या खाव्या लागल्या होत्या. हा अनुभव असतानाही १९२० साली टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींची मिरवणूक काढली गेली, त्यातही ते सामील झाले. याही वेळी त्यांना छड्या खाव्या लागल्या. पण पर्वताएवढ्या निष्ठेसमोर ती शारीरिक शिक्षा त्यांच्यासाठी नगण्य होती. पुणे येथे विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करून तिच्यामार्फत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न, मुंबईत यूथ लिग परिषदेचे आयोजन अशी कामे करत असताना त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले.

जात-पात व धर्मभेदापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे हा विचार घेऊन एस. एम. यांनी सनातन्यांचे विचार नाकारले. १९२९ मध्ये तत्कालीन अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून केलेल्या पर्वती येथील (पुणे) सत्याग्रहात त्यांनी पुढाकार घेतला. या सत्याग्रहाला विरोध करायला आलेले सनातनी हजारोंच्या संख्येत होते. पर्वती सत्याग्रहानंतर सनातन्यांनी सत्याग्रहाला विरोध म्हणून सभाही घेतली. त्या प्रचंड सभेचा रोष एस. एम. यांना स्वीकारावा लागला. पण सत्य आणि न्याय्य बाजूसाठी कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी होती.

सविनय कायदेभंग चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. या तुरुंगवासाच्या काळात ते ज्येष्ठ नेत्यांच्या सान्निध्यात आले. येथेच त्यांना मार्क्सवाद व समाजवाद या संकल्पनांचा सखोल परिचय झाला. यातूनच पुढे ते काँग्रेस-समाजवादी पक्षाच्या स्थापनेत व कार्यात पुढाकारासह सहभागी झाले. भारतात, प्रामुख्याने महाराष्ट्रात समाजवादी तत्त्वज्ञानाचा निष्ठेने प्रसार करण्याचा यशस्वी प्रयत्न एस. एम. जोशी यांनी केला. समाजवादी विचारसरणीचे एक प्रमुख अग्रणी, एक निष्ठावंत आधारस्तंभ म्हणूनच त्यांना ओळखले जात असे.

देशाला स्वातंत्र्य आणि देशबांधवांना अधिकाराचे जगणे मिळावे यासाठी त्यांनी वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष केले. १९ आॅगस्ट, १९३९ रोजी त्यांचे लग्न झाले. पण देशाच्या संसारात गुंतलेले हात घरच्या संसाराला हातभार लावायला मिळणे कठीण होते. यानंतरचे एस. एम. यांचे आयुष्य म्हणजे वाºयासारखे वेगवान होते. युद्धविरोधी चळवळीसाठी तुरुंगवास, छोडो भारत चळवळ, राष्ट्रसेवा दल अशा अनेक कार्यातल्या त्यांच्या सहभागाने प्रापंचिक कर्तव्यांना मर्यादा पडल्या.

१९४२च्या चलेजाव चळवळीत त्यांचा प्रमुख सहभाग होता. आधी महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत भाग घेतल्याबद्दल १९३० साली एक वर्षाचा आणि नंतर ‘रॉय दिना’च्या दिवशी केलेल्या भाषणाबद्दल दोन वर्षांचा असा एकूण सुमारे ३ वर्षे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. साबरमती, नाशिक व येरवडा येथील तुरुंगांमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. या काळात त्यांना समृद्ध करणारा साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे राष्ट्रसेवा दलाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. या संघटनेच्या माध्यमातून युवकांना राष्ट्रवादाचे संस्कार देणे, त्यासाठी शिबिरे-संमेलने-मेळावे भरवणे, कलापथके स्थापन करून त्याद्वारे अस्पृश्यताविरोधी प्रचार, स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचा पाठपुरावा अशी अनेक रचनात्मक कामे त्यांनी केली. राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात वसंत बापट, राजा मंगळवेढेकर, पु. ल. देशपांडे, निळू फुले, राम नगरकर, स्मिता पाटील इत्यादी दिग्गज कलावंत त्या-त्या काळात काम करत होते. यामागे प्रमुख प्रेरणा एस. एम. जोशी यांचीच होती. स्वातंत्र्य आंदोलनात काही काळ त्यांनी भूमिगत राहूनही कार्य केले. याशिवाय एस. एम. जोशी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे सक्रिय सभासद होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत आणि त्यानिमित्त झालेल्या प्रत्येक सार्वजनिक सभेत एस. एम. यांची हजेरी असे.

आणखी वाचा

5 COMMENTS

  1. 1plusph? Seems like another one of these online gaming sites. I haven’t spent a ton of time on the site, but the games seem standard. Nothing too crazy. You can find it at 1plusph if you want to judge for yourself.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी