चित्रपटांमधून विविध सामाजिक विषय समर्थपणे हाताळणाºया ज्येष्ठ दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या सुमित्रा भावे , पण चित्रपटातून केवळ रंजन नाही, तर विचार देणारा भाव त्यांनी कायम प्रकट केल्याने सुमित्रा भावे यांची एक वेगळी ओळख चित्रपटसृष्टीला आहे. त्यांच्यातील खरे भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर हेरले गेल्यानेच त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आणि त्यांना विविध पुरस्कार मिळाले, पण पुरस्काराव्यतिरिक्त त्यांची कामगिरी खूप उंचीची आहे आणि होती. म्हणूनच अशा विचारवंत दिग्दर्शिकेच्या निधनाने एक पोकळी निर्माण झालेली आहे.
सुमित्रा भावे यांनी १९८४ मध्ये लघुपटाच्या माध्यमातून चित्रपट कारकीर्द सुरू केली. ‘दोघी’, ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘संहिता’, ‘अस्तू’, ‘कासव’ यांसारखे एकूण १४ चित्रपट सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केले आहेत. रोजच्या जगण्यातील अनुभवांना भिडणाºया साध्या माणसांच्या गोष्टी आणि उत्कृष्ट व्यक्तिचित्रण हे भावे यांच्या लेखन-दिग्दर्शनाचे वैशिष्ट्य. राष्ट्रीय पुरस्कारांसह इतरही अनेक पुरस्कार त्यांच्या चित्रपटांना लाभले आहेत. याचे कारणच ते समाजाची, उपेक्षित घटकाची मानसिकता जाणून घेऊन त्याचे चित्रण प्रेक्षकांसमोर त्या आणत होत्या. प्रेक्षकांना विचार करायला लावत होत्या. सामान्य माणसांना नायक करण्याचे, सामान्यांचे विषय घेण्याचे असामान्य काम सुमित्रा भावे यांनी केले होते. म्हणून त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली होती.
सुमित्रा भावे या केवळ मराठी चित्रपट दिग्दर्शिका नव्हत्या, तर त्या निर्मात्या आणि पटकथा लेखक होत्या. त्यांनी एकूण १४ चित्रपट, ५० हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांवर काम केले. या सर्व मालिकांचे लिखाण भावेंचे आहे. त्यासाठी त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. सुमित्रा भावे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्य शासन आणि समाजशास्त्र या विषयांत दोनवेळा एम.ए. केले होते. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्सेसची ग्रामकल्याण विषयाची पदविका घेतली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुमित्रा भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले. पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिपच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या. भावे यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका होत्या. त्यांनी रंजनासाठी चित्रपट निर्मिती केली नाही, तर अंजनासाठी चित्रपटनिर्मिती केली. म्हणजे मनोरंजन न करता त्यांनी डोळ्यात अंजन घालण्याचे आणि प्रेक्षकांना वेगळी दृष्टी देण्याचे काम त्यांनी केले होते. हेच त्यांचे वेगळेपण होते. हे वेगळेपण आज आपल्यापासून वेगळे झालेले आहे. अर्थात त्यांच्याबरोबर काम करणाºया कलाकारांमध्ये त्यांच्या गुणांचा वारसा त्यांनी ठेवला आहे, विचार रोवला आहे. त्यामुळे अतुल कुलकर्णीसारखे काही कलाकार वेगळे प्रयोग करण्याचे धाडस दाखवतात, हे त्यांचे यशच आहे.
‘दहावी फ’ या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाची होणारी हेळसांड, भेदभाव यांमुळे होणारे परिणाम त्यांनी चांगल्या प्रकारे मांडलेली आहेत. अ तुकडीतील विद्यार्थी हुशार, ब मधील बरे, क मधील कच्चे, ड मधील डफ्फड, ई मधील इलाजच नाही, तर फ मधील फत्तुरडे, असा विचार दशकांपूर्वी शिक्षण व्यवस्थेने मांडला होता. या शैक्षणिक भेदभावामुळे काय परिस्थिती निर्माण होते आणि ती परिस्थिती एखादा शिक्षक छानपैकी कसा काय हाताळू शकतो हा फार मोठा विचार त्यांनी मांडला होता. त्यामुळेच या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. व्यावसायिक यश त्याला मिळाले नसले, तरी तो गाजला हे मात्र खरे, पण अशा चित्रपटांचे राज्य सरकारने महोत्सव शाळांमधून केले पाहिजेत, हेही तितकेच खरे.
सुमित्रा भावे यांचा आणखी एक चित्रपट साधारण २५ वर्षांपूर्वी आला होता. तो म्हणजे दोघी. दोघी बहिणींपैकी मोठी, गौरीचे (रेणुका दफ्तरदार) लग्न आहे आणि घरात उत्सवाचे वातावरण आहे. गावातले वडीलधारे तिला वर येण्यापूर्वीच मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा सल्ला देतात आणि म्हणूनच तिची लहान बहीण कृष्णा (सोनाली कुलकर्णी) आणि काका (सदाशिव अमरापूरकर) तिच्यासोबत असतात. परत जाताना काकांना वर्तमानपत्रात बातमी दिसते की, वºहाडाचा अपघात झाला आणि लग्नात अडचण आली आहे. त्यामुळे गौरी आणि कृष्णाच्या वडिलांना (सूर्यकांत मांढरे) धक्कादायक बातमीनंतर अर्धांगवायू होतो. सर्व ग्रामस्थ गौरीला अपशकुनी म्हणून दूर ठेवतात. लवकरच कुटुंबास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. तिला काका मुंबईला घेऊन जातो. वेश्या व्यवसाय करायला लावतो. घर चालवण्यासाठी ती देहविक्री करून पैसे कमावते, पण अशाही वेळी तिच्या आयुष्यात एकजण येतो. निवृत्ती कांबळे (सुनील सुकथणकर) हा तरुण तिचा भूतकाळ माहीत असूनही तिला लग्नासाठी मागणी घालतो. मुंबईतील वेश्या म्हणून तिच्या आयुष्यात कधीच परतू नये म्हणून गौरी गावातच राहते. अतिशय संवेदनशिल विषय त्यांनी यातून मांडला आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शोषण करणारे घटक समाजात कसे असतात हे त्यांनी यातून ठळकपणे दाखवले आहे.
‘एक कप च्या’ या चित्रपटातून एका बस कंडक्टरला आलेल्या अनुभवाचे कथानक उभे राहते. जे आपण वर्तमानपत्रातून नियमित वाचतो. कोणाला लाइटचे अफाट अव्वाच्या सव्वा बिल आले वगैरे. असाच प्रकार त्या कंडक्टरला भरमसाट वीजबिल येते. त्याविरोधात लढताना माहिती अधिकाराचा करावा लागलेला वापर आणि त्यासाठी दिला जाणारा लढा या ‘एक कप च्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून सुमित्रा भावे यांनी टिपला होता. समाजातील छोट्या घटकांचे विषय घेऊन विचार करायला लावणारे चित्रपट निर्माण करणारी दिग्दर्शिका, संवेदनशील मनाची कलाकार आपण गमावली आहे हे यानिमित्ताने सांगावे लागेल. सुमित्रा भावे यांना असंख्य पुरस्कार मिळाले होते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा गौरव झाला होता, पण त्या गौरवापेक्षा त्यांनी आपल्या कलाकृतीतून मांडलेला विचार फार महत्त्वाचा होता.