महिलांना आपलं माहेर कायमच प्रिय असतं. अर्थात या प्रिय असण्याची एक मर्यादा असते, म्हणजे जोपर्यंत आपल्याला सून
येत नाही, तोपर्यंत माहेर प्रिय आणि सून आल्यावर सासर माझ्या मालकीचं असे असते; पण हे माहेर प्रिय असते, कारण सासरी
तिला कसला अधिकार नसतो. अर्थात हे जुन्या काळातील आहे; पण प्रत्येक गोष्टीवर बंधन असतात. ही बंधन झुगारण्यासाठी तिला
आपल्या माहेरचे कौतुक करावेसे वाटते.
भोंडला गीतातील पुढचे गाणेआहे ते म्हणजे ‘अक्कण माती’. या गीतातून आपल्या माहेरचे कौतुक करून ही सून सासरच्यांना डिवचते आहे. ही बंडखोरी या गाण्यात जाणवते.
त्यासाठी आधी संपूर्ण गाणं काय आहे हे पाहू.
अक्कण माती चिक्कण माती खळगा तो खणावा।
अशी माती सुरेख बाई जातं ते रोवावं।।
अस्सं जातं सुरेख बाई सपिटी दळावी।
अशी सपिटी सुरेख बाई करंज्या कराव्या।
अशा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या।।
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं।
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा।।
अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी।
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं।
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं।।
यातून स्पष्टपणे ही सून कबूल करते की, माझ्या माहेरी मला स्वातंत्र्य आहे. मनसोक्त खेळायला मिळतं. त्या काळात लहान वयात लग्न होत होती. खेळण्या बागडण्याचंच ते वय; पण त्या वयात लग्नाचा भार अंगावर पडल्यामुळे तिला सासरच्या अंगणात यावं लागलं; पण या सासरी
आल्यावर तिचा फक्त कोंडमारा सुरू झाला, कारण तिला घरातील प्रत्येकाच्या बंधनात रहावं लागलं.बरं ही बंधनं घालणारी कोण कोण आहेत? तर सासू आहे, सासरा आहे, दीर आहे. जाऊ आहे, नणंद आहे, आजेसासूही आहे. घरात एखादी विधवा सोवळी म्हातारी आहे. आत्याबाई असेल कदाचित ती; पण या प्रत्येकापुढे तिला झुकावंलागत आहे. प्रत्येकाच्या बंधनात रहावं लागत आहे. हे करू नको, ते करू नको. आईनं हेच
शिकवलं का? असा उद्धारही अधून मधून होत आहे, मग या मुलीला कुठेतरी वाईट वाटते आहे, म्हणून ती या सासरला नावं ठेवते आहे.
माझं माहेर सुरेख आहे; पण सासर मात्र द्वाड आहे. मला ते अक्षरश: कोंडून मारत आहे, असा माझा कोंडमारा तिथे होत आहे. या कोंडमाºयाला
ती आपल्या भोंडल्यातील बंडखोरीतून वाट करून देत आहे.
जे काही गोडधोड करायचे ते माहेरच्यांसाठी, सासरच्यांना मी काहीही देणार नाही. त्यामुळेअगदी सासरच्या अंगणात जातंरोवायला
लावलं. सासूने त्या जात्यावरसपीटी दळायला लावली,त्या सपीटीच्या करंज्या करायला लावल्या, तरी त्या करंज्या मी तबकात छानपैकी
सजवून, ते तबक शेल्याने झाकेन आणि पालखीत ठेवून मी माहेरी तो पाठवेन.
यात आणखी एक वैशिष्ट्य आहे की, लग्नानंतर दोन्ही घरचा गोडवा मुलींना गायचा असतो. मंगळसूत्राच्या दोन वाड्या या सासर
आणि माहेर असतात. त्यांना जोडण्याचे काम ती करत असते. सासरी कोंडमारा होत असला, तरी त्याचा बोभाटा तिने माहेरी करायचा नाही,
तर मुलीने सासरहून आपल्यासाठी करंज्या पाठवल्या, आपले तोंड गोड केले म्हणजे ती सुखातच आहे, असाच संदेश ती देते आहे. सासरी
भोंडल्याच्या निमित्ताने ती गाण्यातून जरी बंडखोरी करत असली, तरी या गाण्यात सासरचेही नावाला बट्टा लागेल, असेही ती करत नाही. हा खरा संस्कार आहे. बंडखोरी करून जाच करणाºयांना तर जाणिव करून द्यायची; पण त्याची वाच्यता झाली नाही पाहिजे. शेल्यातून पाठवलेल्या करंज्या म्हणजे शालजोडीतून दिलेला तो घरचा आहेर आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
अस्सल बंडखोरी ही विधायक असली पाहिजे,हे या गाण्यातून शिकता येते. दुखवायचे, बंडखोरी, नाराजी दिसली पाहिजे; पण कुठेही कडवटपणानेमाणसं तुटणार नाहीत हे पण सांभाळायचे आहे. हे या बंडखोर गाण्याचे वैशिष्ट्य आहे.
प्रफुल्ल फडके/ जागर