अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारतं, असा दावा करणाºया सुनेला तिची मैत्रीण भोंडला गीतातून आपलं सासर कसं वाईट आहे हे सांगताना याच भोंडल्यात आणखी एक गाणं म्हणते. समान वयाच्या सगळ्या सुना आपल्या माहेरचे कौतुक आणि सासरचा धिक्कार करण्यासाठी या भोंडल्यातील गीतांचा आधार घेतात.
आपल्या मनातला सासरवरचा राग व्यक्त करण्यासाठी त्या आक्रमक होतात आणि आपली बंडखोरी दाखवण्यासाठी आणखी एक गाणं म्हणतात, ‘काऊ आला बाई’
कोणे एके दिवशी काऊ आला, बाई काऊ आला।
त्याने एक उंबर तोडले, बाई उंबर तोडले।।
सईच्या दारात नेऊन टाकले, बाई नेऊन टाकले।
सईने उचलून घरात आणले, बाई घरात आणले।।
कांडून कांडून राळा केला, बाई राळा केला।
राळा घेऊन बाजारात गेली, बाई बाजारात गेली।।
त्याच पैशांची घागर आणली, बाई घागर आणली।
घागर घेऊन पाण्याला गेली, बाई पाण्याला गेली।।
उजव्या हाताला मधल्याच बोटाला विंचू चावला, बाई विंचू चावला।
आणा माझ्या सासरचा वैद्य
अंगात अंगरखा फाटका-तुटका।।
डोक्याला पागोटे फाटके-तुटके।
पायात वहाणा फाटक्या-तुटक्या।।
कपाळी टिळा शेणाचा।
तोंडात विडा घाणेरडा किडा।।
हातात काठी जळकं लाकूड।
दिसतो कसा बाई भिका-यावाणी बाई भिकाºयावाणी।।
आणा माझ्या माहेरचा वैद्य।
अंगात अंगरखा भरजरी।।
डोक्याला पागोटे भरजरी।
पायात वहाणा कोल्हापुरी।।
कपाळी टिळा चंदनाचा।
तोंडात विडा केशराचा।।
हातात काठी चंदनाची।
दिसतो कसाबाई राजावाणी बाई राजावाणी।।
हे सासरच्या लोकांना चिडवणारे गीत आहे. सासरी कशी भिक्कार अवस्था आहे, हे सांगण्याचा हा प्रकार या ठिकाणी दिसतो. कावळ्यानं
उंबर तोडून टाकल्यावर ते साफ करताना त्याचा राळा बनवला आणि तो राळा विकून आलेल्या पैशांतून घागर घेते. यावरून त्या काळात किती स्वस्ताई होती हे पाहा. उंबराची किंमतही किती होती हे पण समजते. उंबराच्या राळ्याची किंमत घागरी इतकी आहे याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. अशी घागर घेऊन पाण्याला गेलेल्या मुलीच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला विंचू चावला आहे. त्याचे विष उतरवण्यासाठी आता वैद्याला बोलवायचे आहे.
मग मैत्रिणी विचारतात की, कोणत्या वैद्याला बोलावू? तर ती सांगते सासरचा वैद्य अगदी भिकारडा आहे. घाणेरडा आहे. त्याचे वर्णनही ती अगदी किळसवाणे करते. त्याच्या अंगात फाटका तुटका अंगरखा आहे. पागोटे त्याचे फाटके तुटके आहे. फाटक्या वहाणा पायात आहेत. कपाळावर लावलेला टिळा हा शेणाचा आहे. तो खात असलेला विडा हा घाणेरडा आणि किडे पडलेला आहे. त्याच्या हातात असलेली काठी अगदी जळक्या लाकडासारखी आहे.
थोडक्यात असा वैद्य काय कामाचा? त्यापेक्षा माझ्या माहेरचा वैद्य बोलवा. तोअतिशय रूबाबदार आहे. त्याच्या अंगात भरजरी अंगरखा आहे. डोक्याला भरजरी कापडाचे पागोटेआहे. पायात कोल्हापुरी चपला आहेत. कपाळावर चंदनाचा टिळा आहे. तोंडात केशर घातलेला विडा आहे. हातातली काठी पण चंदनाची आहे. असा रूबाबदार राजासारखा दिसणाºया माहेरच्या वैद्याला बोलवा, तरच मला गुण येईल असे ती सून सांगते आणि सासरचं काहीच चांगलं नसतंयावर बोट ठेवते.
अर्थात सुनांच्या तोंडून हे भोंडल्याचे होणारेप्रकटीकरण म्हणचे अनेक वर्ष सोसलेल्या यातनांचा उद्रेक आहे, म्हणूनच त्याला बंड म्हटले पाहिजे.
त्यामुळे भोंडल्याचा फेर धरताना वेगवेगळ्या घरातील आलेल्या सुना आपली गाºहाणी वेगवेगळी गाणी म्हणून आपल्या भावनांना वाट करून देतात.
‘यादवराया सुनबाई रूसून बसली कैसी’, ‘कारल्याचा वेल लाव ग सुने’, ‘अक्कण माती चिक्कण माती’ यानंतर पुढची सून
‘कोणे एके दिवशी काऊ आला बाई’ म्हणते त्याला लगेच पुढच्या गीताने उत्तर येते ते म्हणजे, ‘अरडी गं बाई परडी.’ या गीतात ती अगदीच आक्रमकपणे सासरवर हल्ला चढवते. हा बंडखोरीतला कळस आहे.
प्रफुल्ल फडके/ लोकसंस्कृतीचा जागर