‘आॅपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर कारवाई केल्यापासून पाकिस्तानच्या शेअर बाजारात घबराटीचे वातावरण आहे. भारत प्रत्येक आघाडीवर पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी रणनीती आखत आहे. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भारताला कायमचा आणि सुरक्षित मार्ग निवडावा लागेल. शत्रूच्या कमकुवत मज्जातंतूवर नेहमीच हल्ला करायला हवा. युद्धविराम झाला तरी पाकिस्तानला आता तोंड वर काढता येणार नाही, अशी त्यांची आर्थिक हालत करणे गरजेचे आहे.
पाकिस्तानचा खरा कमकुवतपणा ही त्याची अर्थव्यवस्था आहे. भारताला अशा सर्व स्रोतांवर हल्ला करायला हवा जिथून त्याला थोडेसे परकीय चलन मिळते. ज्याप्रमाणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तानसोबत सामने न खेळून आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तिथे न जाऊन त्यांना मोठा आर्थिक धक्का दिला, त्याचप्रमाणे भारत सरकारनेही सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. आज एकाचवेळी स्वातंत्र्य मिळालेल्या दोन्ही देशांमध्ये खूप फरक आहे.
अर्थव्यवस्थेच्या सर्व निकषांवर भारत पाकिस्तानपेक्षा अनेक मैल पुढे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार, जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही, पाकिस्तान अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत ४१व्या स्थानावर आहे. भारत सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश असल्याने, लवकरच अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत जर्मनीला मागे टाकून तिसºया क्रमांकावर येऊ शकतो, तर कमकुवत अर्थव्यवस्था असलेला पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र बनला आहे.
जागतिक बँकेच्या २०२४च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, भारताचा जीडीपी ३.८८ ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास आहे, जो पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या आकारापेक्षा (०.३७ ट्रिलियन डॉलर्स) दहापट जास्त आहे. भारताकडे परकीय चलनाचा साठा $६७७ अब्ज आहे, तर पाकिस्तानकडे फक्त $१५.५ अब्ज आहे आणि त्यातील एक भाग कर्ज घेतलेला आहे. पाकिस्तानमधील पॉलिसी व्याजदर म्हणजेच रेपो रेट सध्या १२ टक्के आहे. एका डॉलरचे मूल्य २८० पाकिस्तानी रुपयांइतके आहे. जागतिक बँकेने सुमारे दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानला दक्षिण आशियातील सर्वात कमकुवत अर्थव्यवस्था म्हणून घोषित केले होते. पाकिस्तानचे एकूण कर्ज सुमारे ७०.३६ लाख कोटी पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढले आहे. म्हणजेच प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीचे सरासरी कर्ज २.३४ लाख पाकिस्तानी रुपयांचे आहे. आंतरराष्ट्रीय एजन्सी फिच रेटिंग्जनुसार, पाकिस्तानला २०२४-२५ या आर्थिक वर्षात $२,२०० कोटींपेक्षा जास्त बाह्य कर्ज फेडावे लागेल.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या जवळजवळ पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर चालत आहे. पाकिस्तान हा आयएमएफ चा पाचवा सर्वात मोठा कर्जदार आहे. चीनची निर्यात-आयात (एक्झिम) बँक त्याला अतिरिक्त सवलतीचे कर्ज देण्यास कचरत आहे. आता कर्जाचा पुढील हप्ता आयएमएफकडून मिळेल की नाही याबद्दलही अनिश्चितता आहे. जर फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स च्या बैठकीत पाकिस्तान ‘ग्रे लिस्ट’मध्ये गेला तर तो कंगाल होईल. त्याला अधिकाअधिक भीकेकंगाल करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
पाकिस्तानसोबतचे सर्व व्यापारी संबंध बंद करणे हे त्याच्या विनाशाच्या दिशेने पहिले पाऊल आहे. आता भारताने पाकिस्तानला इतर देशांशी व्यापार करणे खूप महागात पाडले पाहिजे. भारतीय बंदरे ही पाकिस्तानच्या मर्यादित जागतिक व्यापार मार्गासाठी एक अतिशय महत्त्वाची लॉजिस्टिक लिंक आहे. भारताने आपल्या बंदरांवर पाकिस्तानी जहाजांवर पूर्ण बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी जहाजे पूर्वी ट्रान्स-शिपमेंट, इंधन भरणे आणि दुरुस्तीसाठी भारतीय बंदरांवर अवलंबून होती. या सेवा नाकारल्याने आता त्यांना ओमान किंवा संयुक्त अरब अमिरातीमधून लांब आणि अधिक महागड्या मार्गांनी प्रवास करावा लागेल.
पाकिस्तानसोबतचा सर्व व्यापार बंद केल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर कमीत कमी परिणाम होईल, कारण भारताच्या एकूण जागतिक व्यापारात पाकिस्तानचा वाटा ०.०६ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि भारतीय व्यापारी त्यांचे माल इतर देशांमध्ये सहजपणे विकू शकतात. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह या आर्थिक संशोधन संस्थेच्या मते, दरवर्षी सुमारे १० अब्ज डॉलर्स किमतीचा भारतीय माल सिंगापूर, दुबई आणि कोलंबो बंदरांमधून पाकिस्तानला पोहोचत असे. आता असे होणार नाही याची खात्री करावी लागेल.
आज भारत उत्पादने आणि सेवांच्या बाबतीत जगातील पाच प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे. आशियातील सर्वात खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, जिथे उद्योगाच्या बहुतेक क्षेत्रांमध्ये १०० टक्के थेट परदेशी गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. परिणामी, आज भारत सुईपासून विमानांपर्यंतच्या सर्व गोष्टींसाठी जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. पाकिस्तानच्या ६० टक्क्यांहून अधिक निर्यातीमध्ये कापड आणि संबंधित उत्पादने समाविष्ट आहेत, जी प्रामुख्याने अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन आणि इटली येथे पाठवली जातात. आज भारताचे या सर्व देशांशी चांगले संबंध आहेत. म्हणूनच, भारताला ताबडतोब कापड निर्यातीसाठी काम करावे लागेल, कारण या क्षेत्रात भारत सहजपणे पाकिस्तानला एक चांगला पर्याय बनू शकतो. अशा वेळी, ‘मेक इन इंडिया’ची भूमिका खूप महत्त्वाची बनते. आता वेळ आली आहे की, भारताने ‘मेक इन इंडिया’मधील अडथळे दूर करावे जेणेकरून भारत जागतिक निर्यातीत आपली भूमिका वाढवू शकेल आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडू शकेल.