Monday, June 16, 2025
spot_img

स्वत:च खोदलेल्या खड्डयात अडकतोय पाकीस्तान

भारतीय सैन्याने १९७१नंतर सीमेपलीकडे आॅपरेशन सिंदूरद्वारे सर्वात मोठ्या लष्करी कारवाईत पाक व्याप्त जम्मू आणि काश्मीर तसेच पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले आणि नष्ट केले. यामध्ये लष्कर-ए-तैबाचे मुरिदके आणि जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर मुख्यालय समाविष्ट आहे. पण यातून एक दिसून आले आहे की, भारताशी समोरासमोर लढायचे सामर्थ्य नसल्याने सतत दहशतवादी निर्माण करणाºया पाकिस्तानला आता त्यांनी स्वत: दुसºयासाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकण्याची वेळ येत आहे.

या हल्ल्याद्वारे भारताने केवळ पहलगामचाच नव्हे तर भूतकाळातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेतला आहे. कंदाहार विमान अपहरणाची घटना, संसदेवरील हल्ला आणि अमेरिकन-यहूदी पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या जैश कमांडर रौफ अझहरच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा बहावलपूर येथील जैशच्या मुख्यालयावर झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. या हल्ल्यांमध्ये दहशतवादी मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचाही मृत्यू झाला. भारतीय सैन्याने मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी अजमल कसाबने प्रशिक्षण घेतलेल्या लष्कर कॅम्पलाही उडवून दिले.

भारताच्या लष्करी कारवाईत सामान्य नागरिकही मारले गेले हे पाकिस्तान छाती पिटत असले तरी रात्री १.३० वाजता या दहशतवादी कॅम्पमध्ये हे तथाकथित सामान्य लोक काय करत होते हे ते सांगू शकत नाहीत. त्यामुळे हा नुसता कांगावा आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे की पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नेहमीच महिला आणि मुलांना लक्ष्य केले आहे, मग ते २००२ मध्ये कालुचक येथील लष्कराच्या निवासस्थानांवर हल्ला करून दहा मुले आणि आठ महिलांची क्रूर हत्या असो किंवा वांधवा दहशतवादी हल्ल्यात काश्मिरी हिंदू मुलांना त्यांच्या पालकांसमोर गोळ्या घालण्यासारखे क्रूर कृत्य असो. भारताने अनेक दशके हे अत्याचार सहन केले आणि संयम राखला, पण आता जेव्हा त्याने सूड उगवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याने या जुन्या घटनांचा एकाच वेळी बदला घेतला. पाकिस्तानच्या पापाचा घडा भरला असेच काहीसे हे झाले आहे. शिशुपालाचे शंभर अपराध सहन केल्यावर त्याचा नि:पात केला, त्याप्रमाणे पाकिस्तानला आता भविष्यात भोगावे लागणार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जे म्हटले होते की, भारत पृथ्वीच्या शेवटच्या कोपºयापर्यंत या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाºयांना शोधून शिक्षा करेल, ते त्यांनी केले. दहशतवाद्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह मारल्याने पाकिस्तानला स्पष्ट संदेश गेला की, भारत दशकांपूर्वीच्या दहशतवादी कृत्यांनाही विसरत नाही आणि वेळ आल्यावर नक्कीच बदला घेईल. आता या अभूतपूर्व लष्करी कारवाईनंतर काय? असा प्रत्येकाला प्रश्न पडला आहे. पण हा दहशतवाद मुळासकट उखडून टाकण्याची हीच वेळ आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाला मोदी सरकार बळी पडणार नाही आणि ते सगळे दबाव, फुकटचे सल्ले झुगारून पाकिस्तानला गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही.

पाकिस्तानी सैन्य पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करी कारवाई सहन करू शकते, परंतु पाकिस्तानी पंजाबमध्ये लष्करी कारवाई म्हणजे आपला चेहरा काळवंडण्यासारखे आहे. पाकिस्तानी व्यवस्थेत, पंजाब हा पाकिस्तानचे हृदय आणि लष्कराचा बालेकिल्ला आहे. पाकिस्तानमध्ये, सैन्य आणि त्यांच्या पंजाबी बालेकिल्ल्यांना राणी मधमाशी आणि मधमाश्यांच्या पोळ्यातील तिच्या खोलीसारखेच स्थान आहे.

द्विराष्ट्र सिद्धांताच्या नावाखाली जातीय विष ओकून, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पहलगाममध्ये जिहादी हिंसाचार सुरू केला, परंतु आता ते स्वत:च त्यांनी विणलेल्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांनी विचार केला होता की गेल्या वेळीप्रमाणे भारत जंगलातील एका दहशतवादी तळावर हल्ला करेल, जिथे मीडिया कॅमेरे पोहोचू शकत नाहीत आणि जिथे ते आठवड्यांनंतर मीडिया भेटीची व्यवस्था करतील आणि म्हणतील की भारतीय हल्ला अयशस्वी झाला.

पण मुनीर यांनी कल्पनाही केली नसेल की भारत आंतरराष्ट्रीय सीमेपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाबमधील बहावलपूरच्या मध्यभागी असलेल्या जैशच्या दहशतवादी मुख्यालयावर क्षेपणास्त्रे डागू शकतो. पाकिस्तानी सैन्याचा उर्वरित सन्मान वाचवण्यासाठी, मुनीरकडे भारताविरुद्ध कारवाई करण्याचे नाटक करण्याशिवाय पर्याय नाही. अर्थात हे देखील खूप धोकादायक आहे, कारण आॅपरेशन सिंदूरनंतर भारताने स्पष्ट केले आहे की, त्यांनी संयम बाळगला आहे आणि पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी किंवा नागरी वसाहतींना, ठिकाणांना लक्ष्य केले नाही.

पाकिस्तानी सैन्यासमोर समस्या अशी आहे की, भारतात कोणतेही दहशतवादी लपण्याचे ठिकाण नाही, जे ते प्रत्युत्तरासाठी नैतिक आधार तयार करण्यासाठी लक्ष्य करू शकते. मग अशी भीती आहे की ते भारतीय लष्करी तळांना किंवा निष्पाप नागरिकांना लक्ष्य करू शकतात. आॅपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने आपल्या सीमावर्ती गावांमधील सामान्य लोकांना देखील लक्ष्य केले आहे. बालाकोट हल्ल्यानंतरही, पाकिस्तानी सैन्याने भारतीय ब्रिगेड मुख्यालयावर बॉम्बस्फोट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

जर पाकिस्तानी सैन्याने आॅपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून कोणतेही चिथावणीखोर आणि अनैतिक पाऊल उचलले तर भारताने संधीचा फायदा घेऊन जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी घुसखोरीच्या मार्गांवर आणि विशेषत: हाजी पीर खिंडीवर नियंत्रण मिळवावे. जर पाकिस्तानने पुन्हा कोणतीही दहशतवादी कारवाई केली तर भारत आयएसआय अधिकाºयांना त्याच प्रकारे लक्ष्य करू शकतो ज्या प्रकारे अमेरिकेने इराणी जनरल कासिम सुलेमानी यांना लक्ष्य केले होते. जर पाकिस्तानी सैन्याने लष्करी तणाव वाढवला तर भारताने त्यांची लढाऊ क्षमता कमी करावी.

चीनच्या आघाडीवरही आपल्याला याचा फायदा होईल, कारण तो अनेक दशकांपासून पाकिस्तानची ढाल म्हणून वावरत आहे. यामुळे जगाला पाकिस्तानकडे असलेल्या चिनी लढाऊ विमाने आणि इतर शस्त्रांच्या खºया क्षमतेचे मूल्यांकन करता येईल. यामुळे चिनी फुगा बुडू शकतो. पाकिस्तान कोणता धोका पत्करत आहे हे चीनला समजते, म्हणूनच त्याने आॅपरेशन सिंदूरला दुर्दैवी म्हटले. पाकिस्तानी सैन्याची अवस्था आता स्वत:च खोदलेल्या खड्ड्यात पडण्याची वेळ आलेली आहे आणि ते इतके खोलात अडकले आहेत की, त्यांना बाहेर काढणे चीनलाही कठीण आहे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी