कोणत्याही गोष्टीचा शेवट गोड केला की, सगळी दु:ख, वाईट गोष्टी विसरल्या जातात, म्हणूनच भोंडला किंवा हदग्यातून कितीही बंडखोरी केली, तरी या बंडाचा शेवट नेहमीच गोड होतो. या बंडात कुठेही वेगळे होण्याची भावना नाही. फक्त व्यक्त होण्याचे ते सासुरवाशिणींचे व्यासपीठ होते. भांडायचे, घालून पाडून बोलायचे, मनातील तळमळ व्यक्त करायची, तर तीसुद्धा अगदी तालासुरात. त्यापैकीच हा भोंडला नऊ दिवस बंडखोरीने गाजला.
भोंडल्याची तीस ते पस्तीस गीते आहेत. वेगवेगळ्या भागांत आणखीही त्यात असू शकतील, पण नऊ दिवसांच्या मालिकेसाठी त्यातील नऊच गाणी आपण पाहिली आहेत, परंतु बाकीच्या गाण्यांचा आशयही तसाच आहे. भोंडला म्हटल्यावर ऐलमा पैलमानंतर अनेकांच्या तोंडी लक्षात राहणारे सोपे गाणे म्हणून एक लिंब झेलू बाई हे येते. वेड्याच्या बायकोचे गाणे अनेकांना माहिती असते, म्हणूनच शक्यतो ती गाणी वगळून अन्य गाण्यांचा येथे उहापोह आपण गेले आठ दिवस केला. आता या बंडखोरीचा शेवट गोड केला जात आहे. कुटुंबात कितीही वैमनस्य, भांडणे, वाद असले, तरी ते एका क्षणी मिटतात आणि तो क्षण असतो गोड बातमीचा.
अंगणा तुझी पाच वर्ष, भोंडल्या तुझी सोळा वर्ष असे म्हणत सोळा वर्षांनंतर ते वय आलेले असते की, सासू-सासरे आणि कुटुंबातून सगळ्यांकडून कौतुक करायचे दिवस येतात, म्हणजे दिवस जातात आणि तिच्या गोड बातमीची चाहूल सर्वांना लागते. अशा या आनंदाच्या क्षणी या सुनेला काय होणार? तिच्या भुलोजीला म्हणजे तिच्या पतीला काय होणार, याची चिडवाचिडवी सुरू होते. हा आनंदाचा क्षण म्हणजेच कुणी तरी येणार येणार गं असा आनंद असतो. त्यातले हे भोंडल्यातले गोडवा निर्माण करणारे गाणे म्हणजे अडकीत जाऊ.
अडकीत जाऊ। खिडकीत जाऊ।।
खिडकीत होतं ताम्हन।
भुलोजीला मुलगा झाला।।
नाव ठेवा वामन।
अडकीत जाऊ।। खिडकीत जाऊ।
खिडकीत होता बत्ता।। भुलोजीला मुलगा झाला।
नाव ठेवा दत्ता।।
अडकित जाऊ। खिडकीत जाऊ।।
खिडकीत होती वांगी।
भुलोजीला मुलगी झाली।।
नाव ठेवा हेमांगी।
अडकित जाऊ।। खिडकीत जाऊ।
खिडकीत होती दोरी।। भुलोजीला मुलगी झाली।
नाव ठेवा गौरी।।
अडकित जाऊ। खिडकीत जाऊ।।
खिडकीत होती पणती। भुलोजीला मुलगी झाली।।
नाव ठेवा मालती।
अडकित जाऊ।। खिडकीत जाऊ।
खिडकीत होती घागर।। भुलोजीला मुलगा झाला।
नाव ठेवा सागर।।
अशाप्रकारे हे अमर्यादित लांब चालणारे गाणे. प्रत्येकजण काही ना काहीतरी यमक जुळवून अनेक नावं सुचवतो आणि भुलोजीच्या नावाने आनंद साजरा केला जातो. रला र, ट ला ट जोडत माहिती असतील त्या नावा अगोदर कोणती तरी वस्तू खिडकीत ठेवायची. खिडकीत ठेवले ताम्हन, मुलाचे नाव वामन, खिडकीत ठेवला बत्ता मुलाचे नाव दत्ता. अशा प्रकारे जेवढ्या वस्तू माहिती असतील, तेवढी नावे जुळवून हे गाणे लांबवले जाते.
कालांतराने भोंडल्याचे प्रमाण कमी झाले. काळाच्या ओघात ही संस्कृती पुसली जात आहे. आता तो कुठेतरी इव्हेंट म्हणून साजरा केला जातो, पण त्याची महती आणि माहिती महत्त्वाची आहे. दत्ता, वामन, केशव किंवा सरस्वती, मालती, अन्नपूर्णा अशी देव देवांची नावे ठेवण्याची पूर्वी प्रथा होती. नंतर पिंकी, रॉकी, जॅकीचा जमाना आला आणि या खिडकीतल्या वस्तू कमी होत गेल्या, पण हा भोंडल्यातला अखरेचा भुलोजी मग खºया अर्थाने मनातली सगळी तळमळ, वाईट विचार, राग, द्वेष विसरायला भाग पाडतो, म्हणून त्या अर्थानेही तो भुलोजी आहे. शेवटचा दिवस गोड करणारे हे गाणे भोंडला होत असलेल्या वाड्यात, जागेत अखेरीस मुलींच्या हासण्याचा जोरदार आवाज येतो आणि हा भोंडला समाप्त होतो. आता येथे खिरापतींनी नाही तर आनंदानेच सर्वांचे पोट भरलेले असते. कुरापतींनी व्यक्त केलेल्या भावनांसाठी खिरापत लागते, पण प्रेमाने, आनंदाने व्यक्त झालेल्या भावनांनी पोट भरलेले असते. असा हा शेवटचा दिवस गोड करणारा भोंडला पूर्ण होतो.
प्रफुल्ल फडके/ जागर