Monday, June 16, 2025
spot_img

माझा खेळ मांडू दे

भोंडला किंवा हादगा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून भोंडला साजरा केला जातो. पूर्वी वाडा संस्कृती असताना घरोघर भोंडला करत एकमेकांच्या घरी जाण्याची प्रथा होती. यातील अनेक भोंडला गीते आपल्याला गमतीशीर वाटतात; पण यातून तत्कालीन स्त्रियांचे जीवनमान दिसून येते. त्याचप्रमाणे कोंडीत सापडलेली, सासुरवासात सापडलेल्या महिलांना यातून बंडखोरी करण्याची प्रेरणा या गाण्यांनी दिलेली आहे. म्हणूनच या गाण्यांचा मतितार्थ आणि त्यातील बंडखोरी समजून घेणे महत्त्वाचे आहे.
भोंडला करताना त्याची एक पद्धत आहे. घरातील मुली, सुना, शेजारपाजारच्या मुली, विविध महिला यांनी एकत्रित येऊन भोंडला केला जातो. या भोंडल्याच्या मध्यभागी पाटावर हत्तीचे चित्र काढले जाते. त्या पाटाभोवती फुलांची रांगोळी काढली जाते. पाटावरच रांगोळीने ठिपके काढले जातात. एक गाणे म्हटले की, एक ठिपका पुसायचा आणि त्या पाटाभोवती फेर धरून भोंडला सुरू करायचा. सगळी गाणी म्हणून झाल्यावर भोंडला ज्यांनी आयोजित केला आहे, त्यांनी ठेवलेल्या खिरापती ओळखायच्या. ती ओळखतानाही सगळ्यांनी मिळून पदार्थांची नावे घ्यायची. ‘केळ, पेरू, डाळिंब, सीताफळ, रामफळ, काकडी, बत्तासे, कसल्या डाळी, कसल्या उसळी, श्रीबालाजीची सासू.’ असे एका दमात सांगून खिरापत ओळखायचा प्रयत्न करायचा. कसल्या डाळीमध्ये, आंब्याची डाळ, लिंबाची डाळ, वाटली डाळ असे समजायचे. उसळींमध्ये मटकीची, मटाराची, हरबºयाची, चवळीची यांचा समावेश असायचा. कोशिंबिरीमध्ये खमंग काकडीच असायची. ‘श्री बालाजीची सासू’ म्हणजे, ‘श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, चिरोटा, साखरभात, सुंठवडा.’मग ती खिरापत ओळखली, तर लगेच वाटायची नाही तर सगळ्यांनी हरलो आता सांगा म्हटल्यावर त्या आयोजक कुटुंबातील प्रमुख महिला विजेत्या नजरेने खिरापत फोडायची. मग सगळ्या मुलींचा अय्या… आम्हाला कसे हे सुचले नाही म्हणून कानावर हात ठेवून किंचाळायचे. या किंचाळण्यातून निर्माण व्हायचा तो स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद, कारण भोंडला हे महिलांना स्वातंत्र्य मागणारे लोकगीतांचे सार आहे.
या भोंडल्याचे पहिले गीत आहे ते म्हणजे, ‘ऐलमा पैलमा’ या गाण्यात भोंडल्याच्या मुली म्हणतात, ‘ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा’ म्हणजे घरात कोंडी झालेल्या मुलींना कुठे तरी स्वातंत्र्य हवे आहे. पूर्वीच्या काळी मुलींची खूप लवकर लग्न होत असत. त्या परकर-पोलक्यातच सासरी येत असत. त्यावेळी घरातील सासू, आजेसासू, नणंद, घरातील सोवळ्या लाल लुगड्यातील विधवा आजी, अशा अनेक सासवांचा जाच तिला सहन करावा लागायचा. याशिवाय सासरा, दीर, जावा या सगळ्यांना सांभाळून मग नवरा कधीतरी भेटायचा. या कोंडमाºयात स्वत:चे काहीतरी असावे, परस्वाधीन जीणे कधी कधी नको वाटायचे. त्यामुळे ती एकदा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा, असे त्या गणेशाला साकडे घालते. यातून वेगळे होण्याची भावना नसली, तरी लवकर मोठे होऊन माझ्या हातात संसाराची सूत्र यावीत, सत्ता असावी ही मागणी ती या गणेश देवाला करते. त्यामुळे तिच्यातील बंडखोर मुलगी यातून दिसून येते.
यात पुढे म्हटले आहे की, ‘माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवे घुमतय पारावरी’ काही ठिकाणी बुरजावरी असाही उल्लेख आहे. एकूण त्याचा अर्थ एकच की मी वेटिंग लिस्टवर आहे. माझा खेळ वेशीच्या म्हणजे मर्यादेच्या आत आहे. मी कुठलीही मर्यादा ओलांडण्याची भाषा करत नाही, पण माझा हक्क मला मिळाला पाहिजे ही भावना मात्र यात आहे.
या गाण्यात ‘गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका’ असाही उल्लेख आहे. म्हणजे उमाजी नायका म्हणजे कोण? उमा म्हणजे पार्वतीचा नायक जो महादेव आहे. तसेच ही गाणी पेशवाईच्या अंतानंतर आणि इंग्रजी राजवटीत १८ व्या शतकातील लोकगीते आहेत. त्या काळात उमाजी नाईक हे पण क्रांतिकारक होते. त्यांचेही यातून कुठेतरी अप्रत्यक्ष स्मरण करून आद्य क्रांतीची गाथा यात आहे. भोंडला गीतांमधून शूरविरांचा गौरव आहेच. यात एक गाणे ‘शिवाजी आमुचा राजा’ हे पण आहे. तसेच या गाण्यात उमेचा नायक म्हणून शंकराचे आणि उमाजी नायकांचे स्मरण करून बंडखोरीचे, क्रांतीपर्वाचे समर्थन दिसते. या गाण्याच्या शेवटी ‘अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे’ असा उल्लेख आहे. वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत त्या काळात मुलींना खेळायला अंगण असायचे. त्यानंतर लग्न व्हायचे आणि फक्त सोळाव्या वर्षांपर्यंत भोंडला करायला मिळायचा. मग मात्र संसारात मुलाबाळांमध्ये गुरफटून जायला व्हायचे. हे सांगताना या गीतामध्ये म्हटले आहे की,
‘अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या, चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे।
एकेक गोडा विसाविसाचा, साड्या डांगर नेसायच्या।
नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो।।,
म्हणजे आता परकर-पोलक्यातले स्वातंत्र्य संपणार आहे, बाहुलीसारखे खेळायचे दिवस संपणार आहेत आणि साडीत प्रवेश करायचा आहे. बंधनात अडकणार आहोत. या बंधनातून कुठे तरी सुटका हवी आहे. सासरी होणारा कोंडमारा पहिल्या गीतात गणेशाला सांगून आता माझा खेळ मांडू दे, असे साकडे घातले आहे. यावरून तत्कालीन स्त्रियांचे जीवन, त्यांचा कोंडमारा आणि त्यातून सुटकेसाठी केलेली बंडखोरीची हाक दिसून येते.
प्रफुल्ल फडके/ जागर

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी