Monday, June 16, 2025
spot_img

नाटक आणि मराठी माणूस

 

नाटक हा मराठी माणसाचा आत्मा आहे. आपल्या रंगभूमीने अनेक टप्पे, बदल झेलले आहेत, पण रंगभूमीपासून कोणी दूर जाऊ शकत नाही. सिनेमा आला, टीव्ही आला, विविध वाहिन्या आल्या, वेबसीरिज आल्या, नवनवीन तंत्र आली, डिजिटल प्लॅटफॉर्म आले. तरीही नाटकाचा प्लॅटफॉर्म मागे पडला नाही. म्हणजे गेल्या कित्येक वर्षांत नवनवी आव्हाने उभी राहिली तेव्हा तेव्हा नाट्यसंमेलनातून तसे विषय येत गेले, पण रंगभूमीवर काहीही परिणाम झालेला नाही. नवनवीन नाटके येतात, चालतात, प्रेक्षक पाहतात आणि आपली मराठी रंगभूमी समृद्ध होताना दिसते.

सुरुवातीला नाटक पाहणे हे सभ्यतेचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण होते. सहकुटुंब संगीत नाटक पाहणे, त्याचा आस्वाद घेणे हा एक कौटुंबिक आनंद असायचा. जसजसे चित्रपटाचे आगमन झाले तसे नवी पिढी चित्रपटाकडे वळली, पण जुनी तत्कालीन पिढी चित्रपटापेक्षा नाटक बरे म्हणून चित्रपटाला नाके मुरडत होते, पण हळूहळू जसे नाटकांचेच चित्रपटात रूपांतर होऊ लागले तसे नाटक आणि चित्रपट हातात हात घालून जाऊ लागले. नाटक आणि चित्रपट एकमेकांचे प्रमोशन करू लागले. अमुक एक चित्रपटफेम कलाकार रंगभूमीवर जिवंत अभिनय करताना पहायला मिळणार म्हणून जाहिराती होऊ लागल्या, तर या नाटकातून गाजलेला नट म्हणून चित्रपटातून त्याचा उल्लेख होऊ लागला. असे हे नाटक, चित्रपट हातात हात घालून मोठे होत गेले. किंबहुना मराठी चित्रपटातील प्रमुख कलावंतामध्ये ज्यांनी मराठी चित्रपट मोठा केला त्यातील प्रत्येक कलाकाराने रंगभूमी गाजवलेली आहे. उदाहरणादाखल काही नावे आपण पाहिली तरी लक्षात येईल.

डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली, पण पिंजरा या पहिल्या चित्रपटात काम करण्यापूर्वी ते रंगभूमीवरचे मोठे कलाकार होते. नटसम्राटसारखी नाटके त्यांनी मोठ्या उंचीवर नेलेली आहेत. अमोल पालेकर यांनी एक वेगळ्या हिंदी चित्रपटांची लाट आणली, पण ते मराठी रंगभूमीवरचे ख्यातनाम कलाकार होते. मुखवटेसारख्या नाटकातून त्यांनी चौरंगी भूमिका केलेली होती. निळू फुले, राम नगरकर, दादा कोंडके, नाना पाटेकर, अशोक सराफ, श्रीकांत मोघे, मोहन आगाशे, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, विजय चव्हाण यांच्यापासून अलीकडचे अगदी केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव आणि अनेक नवे, जुने कलाकार हे रंगभूमीने घडवलेले आहेत. म्हणूनच ते चित्रपटाइतकेच रंगभूमीवर प्रेम करत असतात. म्हणूनच चित्रपटसृष्टीला समृद्ध करण्याचे काम मराठी रंगभूमीने केलेले आहे.

असंख्य मराठी, हिंदी चित्रपट हे मराठी नाटकांवरून आलेले आहेत. इथून पुढच्या भागांतून आपण विविध नाटकांवर चर्चा करणार आहोतच, पण जाता जाता नजर मारली तर लक्षात येईल की किती गाजलेल्या मराठी नाटकांवरून चित्रपट बनले होते.

जुन्या संगीत नाटकाच्या जमान्यातील आणि अजूनही गाजत असलेले नाटक म्हणजे संशयकल्लोळ. या नाटकावरून चोराच्या मनात चांदणे हा चित्रपट आला होता. यात आशा काळे, रवींद्र महाजनी, प्रकाश इनामदार हे कलाकार होते. मधुसुदन कालेलकरांच्या अनेक नाटकांवर चित्रपट बनले आहेत. त्यापैकी चांदणे शिंपित जा या नाटकावर आधारित त्याच नावाचा चित्रपट १९८२ ला आला होता. यानंतर त्यांचे नाते युगायुगाचे या नाटकावर आधारित अनेक चित्रपट बनले. त्यापैकी हिंदीतील चोरी चोरी चुपके चुपके हा या नाटकातील कथानकावरच होता.

आजकाल नाटकावर चित्रपट काढायचे फॅडच आलेले आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांत कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, सविता दामोदर परांजपे, अशा अनेक नाटकांचे चित्रपट आले, पण हा जुनाच प्रकार आहे. कारण आपल्याकडे मराठी नाटकांनी विषयांची इतकी विविधता आणि ज्वलंत विषय उचलण्याची प्रथा आहे की, चित्रपटाला रंगभूमीचा विचार करण्याशिवाय पर्याय नाही. फेकाफेकी हा चित्रपट घरोघरी मातीच्या चुली या नाटकावर बेतलेला होता, तर रंगभूमीशिवाय चित्रपटाला पूर्णत्व नाही हे लक्षात आल्यावर अगोदर चित्रपट मग नाटक असाही प्रकार घडलेला आहे. आचार्य अत्रे यांचा ब्रम्हचारी हा चित्रपट तुफान गाजला होता. साठ वर्षांपूर्वी एक मराठी कलाकार मीनाक्षी शिरोडकर बिकिनीत येते हे पडद्यावर दाखवणे म्हणजे फार मोठे धाडस होते, पण यमुनाजळी खेळू खेळ या गाण्याने धमाका केलेला होता या चित्रपटात. मास्टर विनायक यांनी आपल्या अफलातून भूमिकेने हा चित्रपट गाजवला होता, पण तरीही यातील नाट्य रंगभूमीवरचे आहे हे आचार्य अत्रे यांना वाटत होते. जे दृश्य रंगभूमीवर दाखवणे शक्य नाही म्हणून त्यांनी चित्रपटाचे माध्यम निवडले, पण नंतर त्याचे नाटक केले. ते नाटक तितकेच गाजले. प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांनी हे नाटक इतके सुंदर केले होते की, रंगभूमीवरून रुपेरी पडद्यावर सचिनने न राहवून वर्षा उसगावकरला आणले आणि वंडरगर्ल अशी तिची प्रसिद्धी केली, पण ही नाटकाची देणगी होती.

रात्र संपली पण उजाडलं कुठं हे नाटक १९७० च्या दशकात खूपच गाजले होते. लीला फणसळकर यांच्या कादंबरीवरून आलेले हे त्यांचे नाटक त्यावेळी लोकांना कथानक म्हणून खूपच भावले होते. यावर गुलझार यांनी हिंदीत रूपांतर करून बसेरा नावाचा चित्रपट काढला होता. रेखा, राखी, शशी कपूर, पूनम धिल्लन, राजकिरण असे यात कलाकार होते. त्यामुळे एक लक्षात घेतले पाहिजे की, मराठी रंगभूमीने कायम चित्रपटसृष्टीला मोठेच केलेले आहे. आता विविध वाहिन्यांवरील विविध मालिकांमधून गाजलेले कलाकारही रंगभूमीचा एक भाग आहेत. म्हणूनच या रंगभूमीला फार महत्त्व आहे. नाटक हा सर्वांचा आत्मा आहे, आधार आहे, पाया आहे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी