परबत्या पाटलाची सून कौशी झपाझप गावातल्या स्मशानाच्या दिशेनं चालली होती. आज तिला काही झालं तरी झपाटून घ्यायचं होतं. एखाद्या भुतानं, हाडळीनं झपाटावं आणि मग सगळ्या घरच्यांना इंगा दाखवावा या इराद्यानं ती झपाझप पावलं टाकत चालली होती. अमावस्येची करकरीत टळटळीत तिन्हीसांज होती. काळोख पडायला लागला होता. या काळोखात एखादं भूतखेत मानगुटीवर बसावं आणि आपल्याला चांगलं झपाटावं असं तिला वाटत होतं. म्हणून ती चालली होती.
कौशीचे लग्न झाल्यापासून तिची सासू पारूबाई, सासरा परबत्या, नवरा हणम्या हेसर्व तिचा सारखा छळ करायचे. लग्न झाल्यापासून तिनं कधी हू की चू केलं नव्हतं. पण गेल्या चार दिवसांपासून तिला छळ सहन होत नव्हता, पण प्रतिकार करण्याची ताकदही नव्हती. अशा कोणत्या तरी शक्तीची मदतीची तिला गरज होती. अन् तिला ती कल्पना सुचली.
आज सकाळीच, सासू आणि शेजारच्या हौसाबाईची चर्चा तीनं ऐकली होती. हौसाबाई सांगत होती की, गावातल्या देशमुखाच्या सुनंला म्हणे लागीर झालं. पन लागीर नेमकं व्हतं तरी कसं? कौशीला लई उत्सुकता लागली अन् ती त्या दोघींच्या बाता ऐकायला आली.
सासूनं मिश्रीची डबी हौसाबाईच्या पुढं केली अन् दोघी लागल्या मिश्री लावायला. मिश्री लावता लावता हौसाबाई अगदी तिखट मिठ लावून सांगत होती. ‘‘ तुला सागते, थू… ’’ असं म्हणून मिश्रीचा बुकणा थुंकला अन् सांगायला लागली, आतल्या आवाजात. ‘काल सांच्याला देशमुखाची सून आली अन् लागली की, घुमायला. कपाळाला ह्यो मोठा मळवट भरला. केस मोकळं सोडलं अन् खदाखदा हसायला लागली. समदी निसती हादरून गेली. मला भूक लागलीय म्हनून वरडायला लागली. आक्षी भगुलं भर भात अन् फाटीभर भाकºया फस्त केल्या. हा परकार पाहुन देशमुखाची तर दातखिळच बसली बग.’’
कौशीच्या सासूनं भिवया उंच केल्या अन् इचारलंच. ‘‘पन म्या म्हंते, असं येकायेकी लागीर झालंच कसं?’’
‘‘आगं म्हने, तिनीसांच्या वक्ताला मसणाच्या वाटेला गेली. चार दिसातली होती म्हणे… कुटंतरी झाड्याला गेली.. झालं तिवढंच निमित्त. झाड्याला गेल्याव पायाव पानी न्हाई टाकलं तर लागीर व्हनारच की…’’
बस कौशीची यकदम ट्यूब पेटली. आता भुताकडनं झपाटून घ्यायचं अन् या माणसातल्या भुतांना सरळ करायचं. या एकाच इराद्यानं ती निघाली होती. गावच्या स्मशानात पोहोचली तवा पार काळोख पडला होता. आज स्मशानात कोनीच दिसत नव्हतं. तसं दररोज गावातलं येकादं तरी मानूस खपतं. पण आज भाकड दिवस होता. कालचं जाळलेलं तसच जळत होतं. मोकळ्या हवेत नदी काठावर लई थंडी वाजायला लागली. म्हणून शेकायला म्हणून त्या चितेजवळच ती गेली. पदरात बांधून आणलेली भाकरी खाल्ली. पण येकबी भूत यीना की हडळ यीना. आता काय करावं? जवळ चिंचोकं होते. ते चिंचोके तिनं त्या सरणातल्या निखाºयावर भाजले. अन् थोड्या वेळानं आत हात घालून काडणार तिवढ्यात, गावच्या दिशेनं आवाज आला. राम नाम सत्य हैं, राम नाम सत्य हैं…. आता कौशीला लइं आनंद झाला. तिनं आनंदानं टाळ्या पिटल्या. आता या मेलेल्या माणसाचा आत्मा, प्रेत तरी आपल्या झपाटलं म्हणून तिनं आनंदानं टाळ्या पिटल्या आनी आलं आलं असं म्हणून किंचाळली.
अंधारात एक बाई केस मोकळे सोडून नाचतीय, टाळ्या पिटतीय, चितेतल्या निखाºयात हात घालतीय हे प्रेत घेऊन येणाºया लोकांनी पाहिलं अन् अबबब हाडळ म्हनून प्रेत तिरडीसकट तिथंच टाकून समदी लोक पळाली. कौशीला थोडी गंमत वाटली, पण नंतर वाईट वाटलं. त्या प्रेतानं काय केलंय? त्याला न जाळताच ही लोकं टाकून गेली. जाऊ दे आपणच त्या प्रेताला जाळून टाकूया असा विचार करून ती त्या तिरडीजवळ आली. पण हे मढं लईच ढोलं व्हतं. येकलीच्यानं तिरडी उचलनं शक्य नव्हतं. म्हनून तिनं तिरडीवरनं प्रेत सोडायला सुरुवात केली. लांबून काही लोक बघत होते, त्यांची तर आता इजारच भीतीनं वली झाली. ती हडळ प्रेताला खायला लागली म्हणून गावाच्या दिशेनं बोंबलत पळाली. तवर प्रेत सोडवून झालं होतं. आता ती ते वढायला लागली. पण जागचं हलतंय व्हय?
तिवढ्यात मागून कोणतरी बोललं, ‘‘आगं तेला बगलंत धर अन् नी फरपटत आक्षी.. ’’
‘‘हा… तसच करती… पर हे कोण बोललं? हत तर कोण दिसत नाई ’’
तसा खदाखदा हसण्याचा आवाज आला, अन् बोलू लागला, ‘‘आगं म्या तुजा आजेसासरा हाय… आग्यावेताळ बनून राहिलोय लई दिसापासनं… मला माज्या पोरानं सुनंन लई छळलं पग… आता तुला छळत्यात… त्यांना धडा शिकवायला मला शरीर न्हाई, म्हनलं आता तुलाच झपाटावं अन करूया मजा ’’
आता मात्र कौशी यकदम घाबरून गेली अन् थंडच पडली. गपकन कोसळली. जवापतुर मनात भुताची भीती नव्हती तवर काई झालं नाई. पन खरंच भूत हाय हे समाजलं तवा मात्र अंगातलं प्राणच गेलं. आता त्या मसणात दोन प्रेतं पडली होती. एक तिरडीवरचं अन दुसरी कौशीचं.