माणसांचं जसं विश्व आहे तसंच प्राण्यांचंही एक विश्व आहे. या प्राण्यांच्या विश्वात एक सभा भरली होती. सगळे पशू-पक्षी, वन्यप्राणी चिंतेत होते. प्राण्यांचे नेते वाघोबा बिबटे अध्यक्ष स्थानावर होते. त्यांनी बोलायला सुरुवात केली.
एक छानशी डरकाळी फोडताच सभेला जमलेल्या प्राण्यांमध्ये चैतन्य आले आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या. वाघाने भाषणाला सुरुवात केली,
‘जमलेल्या माझ्या तमाम वन्यप्राणी बंधूंनो आणि भगिनींना, आपले जंगलसम्राट दिल्लीचे राजसिंहासन सांभाळत असल्यामुळे प्रादेशिक पातळीवरील जंगलात आम्हालाच ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे हे तुम्ही जाणता. आजकाल आमच्या सिंहासनाधिष्ठित नाही, तर साक्षात सिंह महाराजांची आयाळच या लॉकडाऊ नच्या काळात इतकी वाढली आहे की, ती कुरवाळण्यातच त्यांचा वेळ जातो आहे. त्यामुळे आपले प्रादेशिक प्रश्न आपल्या पातळीवर सोडवण्याची हीच ती वेळ आहे’. (जोरदार टाळ्या)
‘वन्यप्राणी मित्रांनो, आजच्या सभेचा मुख्य उद्देश आहे तो सध्या आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे हा. आपल्यातील एक कार्यकर्ता चुकून जंगलाची सुरक्षा सोडून मानवी वस्ती असलेल्या भागात गेला. तिथल्या हिंस्त्र माणसांनी त्याचे फोटो काढण्याचे, त्याचे टीव्हीवरून प्रक्षेपण करण्याचे प्रयत्न केले आणि त्याला फार घाबरवून सोडले. खरं तर आपला रानगवा हा गरीब प्राणी म्हणून ओळखला जातो, पण माणसांच्या ताकदीपुढे तो हिंस्त्र बनला आणि माणसांनी त्याला इंजेक्शन देऊ न जंगलात आपल्याकडे स्वगृही पाठवतो असे भासवून मारून टाकले. त्या गव्याला आपण अगोदर श्रद्धांजली अर्पण करू’. (सर्वजण एक मिनीट स्तब्धता पाळतात).
हे माणसांच्या राज्यात चालत असेल. पहाटे पहाटे गेला आणि त्यांचा झाला आणि संध्याकाळी परतला तो पुन्हा आपला झाला, पण अगदी भल्या पहाटे गेलेला आमचा गवा परत कवा आलाच नाही. त्याच्या शोधासाठी पंधरा दिवसांनी त्याचे धाकटे बंधू गेले, पण अत्यंत सुरक्षितपणे तो परत आला आणि काय परिस्थिती आहे ती आपल्याला सांगितली. खरं तर हा भूभाग आपला होता. इथल्या जंगलात आपण सगळे सुखाने नांदत होतो, पण या जंगलातून माणसांनी रस्ते काढले. महामार्ग केले. डोंगर पोखरून बोगदे केले आणि आमच्या राज्यावर अतिक्रमण केले. आम्ही आतल्या आत कोंडून पडू लागलो. चुकून कामासाठी, भक्ष्यासाठी बाहेर पडलो की लगेच बिबट्या आला, गवा आला, असा गोंधळ सुरू होतो आणि सगळे बंदुका घेऊ न आपल्या मागे लागतात. कधी कधी या भयाने पळताना आपल्यातला कोणीतरी बांधव विहिरीत पडतो, घाबरून प्राण्यांवर, माणसांवर हल्ला करतो, पण यामुळे समस्त प्राणी जमात बदनाम होत आहे. म्हणूनच आपल्याला आता पुढे काय करायचे याचा विचार करायचा आहे. या माणसांच्या राज्यात प्राण्यांना जगायला मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे आपले शौर्य आणि क्रौर्य लपवून ठेवून लपत-छपत आपल्याला जीवन जगावे लागते आहे. असे बोलून वाघोबा अक्षरश: रडायला लागले. त्यांना सावरण्यासाठी कोल्होबा आले आणि त्यांनी पुढची सूत्रं आपल्या हातात घेतली.
एक जोरात कोल्हेकुई केली आणि त्याला प्रतिसाद मिळाला आहे की नाही याचा विचार न करताच तो बोलायला लागला. ‘ही माणसं स्वत: लबाड आहेत. एकमेकांना फसवतात आणि कोल्हा, लांडगा लबाड आहे अशा बाता मारतात. यांना सत्ता मिळाली नाही आणि विरोधात बसावं लागलं तरी कोल्ह्याला द्राक्ष आंबट असे म्हणतात. आम्हाला बदनाम करणाºया या माणसांचा मी समस्त कोल्हे कुटुंबीयांतर्फे निषेध व्यक्त करतो. मला वाटतं कोणीतरी सामान्यांच्या प्रतिनिधीने इथे मनोगत व्यक्त केले पाहिजे’.
वर बराच वेळ ऐकत बसलेले गिधाड पंख हलवत खाली आले आणि म्हणाले, ‘मलाही या माणसांचे नवलच वाटते. हे लोक कधी आमच्याबरोबर राहिले आहेत का? आमचे स्वभाव यांना माहिती आहेत का? मग माहीत नसताना आपण क्रूर आहोत, भयानक आहोत असे चित्र यांनी का निर्माण केले आहे? एखाद्या मुलीवर अत्याचार झाला तर हे लोक म्हणतात, तिच्या शरीरावर ते नराधम गिधाडासारखे तुटून पडले. अरे गिधाडांनी बलात्कार केल्याचे कधी ऐकले आहे का? मग आम्हाला का बदनाम करतात? माणसाइतका दुष्ट प्राणीच या भूतलावर नाही’.
एवढ्यात ‘व्हॉ…व्हॉ… व्हॉ’ असा आवाज करत गाढव आले. त्याला पाहून सगळे हसायला लागले, पण अत्यंत निर्विकारपणे गाढव म्हणाले, ‘तुम्ही माझ्यावर हसाल, तर तुम्हीच खरे फसाल. जरी असलो मी माणसांचा प्राणी, तरी जाणतो मी त्यांची करणी’. गाढव आपल्या नेहमीच्या काव्यमय भसाड्या आवाजात बोलू लागले. ‘ही माणसं करतात चुका आणि म्हणतात सगळेजण काय हा गाढवपणा? म्हणून या समस्त माणसांना आवाहन करतो आहे की, तुम्हाला जर गाढव व्हायचे नसेल तर एक दिवस गाढवासारखे जगून बघा. तुमचं ओझं आम्ही वाहतो. तुमचं काम आम्ही करतो. वर फटके आम्हाला मारता आणि गाढवं लाथा मारतात म्हणता? ही माणसांची मुलं-मुली आजकाल कशीही हिंडतात, रस्त्यात चाळे करतात. त्यांच्यावर टीका करणारी माणसं म्हणतात, काय हे गाढवीप्रेम? आता प्रत्येक वेळा यांना प्राणीच दिसतात का वाईट ठरवायला?’
गाढवाचे बोलणे ऐकून वाघोबा अगदी धाय मोकलून रडायला लागले. म्हणाले, ‘जमलेल्या माझ्या तमाम प्राणी मित्रांनो, आपण आता फक्त फोटो काढण्यापुरते, चित्र रंगवण्यापुरते राहणार असे दिसतंय. हा विषय कधीच न संपणारा आहे, पण आज आपल्यातला एक गवा बांधव शहीद झाला आहे. आपल्या जंगलात माणसांनी अतिक्रमण केले आणि त्यालाच दहशतवादी ठरवून जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. माणसं ही एकमेकांशी अशीच वागतात. कारण त्यांच्याइतका क्रूर प्राणी देवाने बनवलेला नाही. यावर नेमका काय निर्णय घ्यायचा आहे हे आजच्या सभेत तरी आपण ठरवू शकत नाही. माणसांच्या फारच जवळ जाऊ न आपल्याही सभा, चर्चा या तोडगा आणि निर्णयाविनाच होत आहेत, पण लवकरच आपल्या अस्तित्वासाठी एक जंगल देशव्यापी मेळाव्याचे आयोजन केले जाईल असे जाहीर करून ही सभा आपण संपवूया. जय जंगल, होऊ दे मंगल’.