Monday, June 16, 2025
spot_img

देऊळबंद

काशीबाई नावाच्या एक आजी होत्या. पती निधनानंतर मुलाला मोठे केले होते. सगळं व्यवस्थित लागी लावलं होतं. मुलाचे लग्न झाल्यावर संसारातून निवृत्ती घेणे स्वाभाविक होते. सुनबाई घरी आल्या तशा त्यांनी काही दिवसांतच आपली वाट अध्यात्माकडे वळवली. आता माणसं अध्यात्माकडे नेमकी कशी वळतात, तर सगळं करून झाल्यावर वळतात, तसेच सगळे सर्वांचे लागी लागल्यावर त्या देव देव करू लागल्या.

अर्थात त्यांनी अवडंबर माजवलं नव्हतं काही; पण दिवस दिवस देवळात जाऊन बसायच्या. तिथेच डोळे मिटून जप करायच्या. सतत त्यांच्या नामस्मरणाने येणारे जाणारेही कौतुकाने बघत. एखादी साध्वी असावी, अशी ख्याती काही दिवसांतच काशीबार्इंची झाली. मंदिरात नियमित येणारे लोक असतात. त्यांची तोंड ओळख, हळूहळू विचारपूस सुरू झाली. त्या मंदिराच्या वातावरणातच त्या रमून जात. एक छान देवभक्त आजी देवळात बसतात याचे कौतुक आणि आकर्षण सगळ्यांना वाटायचे. कित्येक जण देवाला नमस्कार केल्यावर काशीबार्इंनाही नमस्कार करायचे. त्यावेळी मला कशाला नमस्कार, देवाला करा असे त्या सांगायच्या; पण पुढे पुढे त्यांना सवय झाली आणि कुणीही नमस्कार केला, तरी काही न बोलता आशीर्वादाचा हात वर करायच्या. गणपतीचे देऊळ हेच त्यांचे विश्व झाले होते. खूप उशीर झाल्यावरच त्या घरी जात असत. घरी गेल्यावर सुनेने वाढून ठेवलेले असेल ते जेवायचे आणि बाहेर झोपायचे. मुंबईतील चाळीतील घर. छोट्याशा दोन खोल्या होत्या. त्यात सगळा वर्षानुवर्षाचा पसारा, भांडी कुंडी, फ्रीज, टीव्ही, कॉट, कपाट, पुस्तकं खचाखच भरलेली. त्यामुळे छोट्या जागेत हा मुलगा सूनेचा संसार चाललेला होता. त्यामुळे आजीबार्इंना बाहेरच झोपायला लागत होते. रात्री ठिक होते; पण दिवसाचे काय? दिवसा ऊन यायचे वºहांड्यात.

आपलाच उभा केलेला संसार, सुनेच्या हातात दिला खरा; पण आपल्याच घरात आपण परके झाल्यासारखे वाटायला लागले काशीबार्इंना. मुलगा सुनेला एकांत मिळावा, यासाठी आपणच जास्त वेळ बाहेर रहायचे, असा निर्धार करून त्या देवळात जाऊ लागल्या. देवळात जाणारा प्रत्येक माणूस भक्तच असतो असे नाही. तर देऊळ ही अनेकांची अशीही सोय असते. घरात अडगळ नको म्हणून देवाला जाणारेही खूप असतात. म्हणजे देवळात किंवा मंदिरात येणारे भक्त असतात. नवस बोलणारे, गाºहाणे घालणारे असतात. आपली प्रार्थना करणारे असतात. देवाने आपली मागणी पूर्ण केली, म्हणून देवाचा नवस फेडणारे असतात. पण ते येतात जातात, दर्शन घेतात, हार फुले प्रसाद अभिषेक आदी कर्मकांड करतात आणि निघून जातात; पण काही असेही असतात की, ते नामस्मरण, देवाच्या दारात बसण्याच्या निमित्ताने केवळ वेळ काढण्यासाठी आलेले असतात. चांगल्या घरचे असतात, परिस्थिती बरी असते; पण घरात अडचण होते म्हणून जास्तीत जास्त काळ मंदिरात बसणारेही असतात. त्यापैकीच एक काशीबाई होत्या.

पण गेल्यावर्षी मार्च महिन्यात मंदिरे बंद करण्याची घोषणा झाली. काशीबाई अक्षरश: वेड्यापिशा झाल्या. मी देवाचे नामस्मरण करते, मी देवळात बसते; पण ती केवळ सोय म्हणून बसते. घरात अडचण होते, मुलगा सुनेला एकांत मिळावा त्यांना संकोच नको म्हणून मंदिरात येऊन बसते. माझ्या अध्यात्माचा अर्थ मुलगा सुनेच्या अध्यात मध्यात नको यायला हाच होता; पण आता करायचे काय? छोट्याशा चाळीतल्या घरात, खचाखच भरलेल्या सामानात मुलगा सून असताना आपण कुठल्या कोपºयात बसायचे याचीच चिंता त्यांना लागली होती. कोरोनाच्या संकटाने आता बाहेर वºहांड्यातही झोपणे शक्य नव्हते. सुरुवातीचे दिवस तर फारच कडक बंदोबस्त होता. जरा बाहेर पडलं की, पोलीस काठी आपटत होते. सगळं बंद होतं. अशात घरातच कोंडून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात मुलगाही घरात आणि सूनही घरात. आपली अडगळ होणार या कल्पनेनेच काशीबार्इंना चक्कर आली. कोसळून पडल्या खाली.

मुलाने तातडीने डॉक्टरांना फोन केला. आईला चक्कर आली आहे; पण डॉक्टरांनी सध्या कोरोनाचे पेशंट खूप आहेत. कोरोना टेस्ट केल्याशिवाय कोणताही पेशंट घेणार नाही, असे सांगितले आणि नकार दिला. थोड्या वेळाने शुद्धीवर आलेल्या काशीबाई सांगत होत्या, मला काही होणार नाही. मी ठिक आहे. नको डॉक्टरकडे जायला; पण म्हातारीला तसे सोडून चालणार नव्हते आणि दोघांची अडचणही झाली असती. काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. शेवटी सरकारी दवाखान्यात म्हातारीला नेले. तिच्या इच्छेशिवाय नेले. तिथल्या डॉक्टरांनी सांगितले की, कोरोनाच्या सगळ्या टेस्ट करणार. तोपर्यंत अलगीकरण कक्षात रहावे लागेल. घरच्यांना भेटायला मिळणार नाही. १४ दिवसांनी चौकशी करा. मुलगा खूशच झाला. तसं आईच्या जवळचं नात्याचं कोणीही नसल्यामुळे ती कधीच बाहेर गावीही जात नव्हती. आता आयतीच तिला ही कोरोनाच्या निमित्ताने माहेरपणाची संधी मिळाली आहे. म्हातारीला हॉस्पिटलला पाठवलं आणि मुलगा, सून घरी आले.

काशीबाई डॉक्टरांना एकेदिवशी म्हणाल्या, तुम्ही देताय ते मी खातेय, देताय ते पितेय, पालथं झोपा म्हणता म्हणून झोपते आहे. वाफारा घेते आहे. सगळं ठिक आहे; पण मला काहीच झालेले नाही. देऊळबंद झाल्यामुळे माझी बसण्याची अडचण झाली, म्हणून मी इथे आली आहे; पण तुम्ही काळजी करू नका. याचा तुम्हाला फायदाच होईल. तुमच्या परिश्रमाने एक रुग्ण बरा झाला याचे श्रेय तुम्हाला मिळेल. डॉक्टरही हसले आणि त्यांनी १४ दिवस ठेऊन घेतले; पण लॉकडाऊन उठण्याचे कसलेही चिन्ह दिसेना. मंदिर उघडल्याची बातमी येईना. आता करायचे काय? शेवटी म्हातारीने निर्णय घेतला. डॉक्टर तुम्हाला लागेल ती मदत मी करते, रुग्णांची सेवा करते, इथली साफसफाई करते; पण मला घरी पाठवू नका. अजून थोडे दिवस इथं राहू द्या. म्हातारीचं म्हणणं डॉक्टरांनी ऐकलं. त्या काळात म्हातारीच्या लक्षात आले की, आपल्यासारखे अनेक जण इथे आहेत. क्वारंटाईन होणे, विलगीकरण कक्षात राहणे हे बहाणे आहेत; पण त्यांना घरात स्थान नाही असेच इथे बहुतेक आहेत. ज्यांना खरोखरच लागण झाली आहे किंवा पॉझिटीव्ह आहेत ते होम क्वारंटाइन होऊन उपचार घेत आहेत. हे लक्षात आल्यावर काशीबार्इंनी मनापासून आता देवाची प्रार्थना केली, देवा आता आमच्यासारख्यांसाठी तरी तुझी मंदिरं उघडू देत.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी